देशी गाईच्या शेण, मूत्र आणि दुधाच्या वापरापासून जमिनीमध्ये नैसर्गिक जिवाणूंची अमाप निर्मिती करता येते.
देशी गाईच्या शेण, मूत्र आणि दुधाच्या वापरापासून जमिनीमध्ये नैसर्गिक जिवाणूंची अमाप निर्मिती करता येते. गाईच्या या तिन्ही घटकांतून जमिनीला पोषक असे जीवामृत तयार करता येते. आपल्या गोटय़ात एक देशी गाय असेल तर तिच्या जीवामृतापासून वर्षभर ३० एकर शेती बागायती करता येते.
त्याचबरोबर पाण्याचा वारेमाप वापर टाळून केवळ १० टक्के पाण्यामध्ये सर्व प्रकारची शेती बागायती करता येते. झीरो बजेट नैसर्गिक आध्यामिक शेती म्हणजे देशी गाईच्या शेण, गोमूत्र आणि दुधापासून जलामृत तयार करून ते वेळच्या वेळी शेतीत वापरणे. तसेच बाजारातून शेतीसाठी लागणा-या कोणत्याही निविष्ठा विकत न आणता या जलामृताच्या सहाय्याने मुख्य पिकाचा उत्पादनखर्च आंतरपिकांच्या उत्पन्नातून भरून काढणे आणि मुख्य पीक बोनस म्हणून घेणे म्हणजेच झीरो बजेट नैसर्गिक शेती होय.
निसर्गाच्या काष्ट पदार्थाच्या कुजण्यातून उपलब्ध होणारी अन्नद्रव्ये, केशकर्तन शक्ती, चक्रीवादळ आणि गावराणी गांडूळाच्या हालचाली या निसर्गाच्या चार प्रकारच्या यंत्रणा आहेत. निसर्गाच्या सुनियंत्रित शक्तीमुळेच नैसर्गिकरीत्या शेती बागायती बहरात येतात.
कोकणातील नारळ, सुपारीच्या बागांना नियमित पाणी दिले जाते. मात्र, आंबा, काजू, या नगदी पिकांच्या बागायतींना पाणी दिले जात नाही. ही बाब अयोग्य आहे. प्रत्येक प्राणिमात्रांना अशी पाण्याची आवश्यकता असते. तशी आंबा आणि काजूच्या बागांना नियमित पाणी देणे गरजेचे आहे. मात्र, हे पाणी ठिंबक सिंचनाद्वारे झाडांच्या मुळांशी छिद्र पाडून मडके अथवा अन्य भाज्याद्वारे देणे आवश्यक आहे. या पद्धतीचा अवलंब केल्यास या पिकांच्या उत्पन्नामध्ये दुपटीने वाढ होईल.