उल्हासनगर महापालिकेत शनिवारी महापौर निवडणूक पार पडली.
उल्हासनगर- उल्हासनगर महापालिकेत शनिवारी महापौर निवडणूक पार पडली. विधानसभेत समोरासमोर उभ्या टाकलेल्या शिवसेना-भाजपने एकत्र येऊन फोडाफोडीचे राजकारण करत शिवसेनेचा महापौर बसवला, मात्र या निवडणुकीमुळे १० दिवसांवर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस यापैकी कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला फायदा होऊ शकतो, याबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती फुटली. शिवसेना आणि भाजपने सर्वच जागांवर उमेदवार उभे केले. ही फाटाफूट उल्हासनगर महापालिकेच्या महापौर निवडीच्या राजकारणातही पाहायला मिळेल, असे वाटत असतानाच, मुंबईच्या बडया नेत्यांच्या आदेशाने दोन्ही पक्ष पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आले. मात्र शिवसेना आणि भाजपने विधानसभेचे तिकीट नाकारल्याने नाराज झालेले साई पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांनी इंदिरा उदासी यांना महापौरपदाचाउमेदवार बनवत महायुतीसमोर आव्हान उभे केले. या आव्हानाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने फूस लावत हवादेखील भरली. विजय समोर दिसत असतानाच, शिवसेनेने नेहमीप्रमाणे भ्रष्टाचार करत विजय संपादन केला. त्यामुळे शिवसेनेच्या अपेक्षा पाटील महापौर झाल्या.
उल्हासनगर विधानसभेत विद्यमान भाजप आमदार कुमार आयलानी यांच्यासमोर शिवसेनेचे धनंजय बोडारे, राष्ट्रवादीच्या ज्योती कालानी, काँग्रेसचे प्रकाश कुकरेजा, मनसेचे सचिन कदम, बसपाचे संदीप गायकवाड, अपक्ष मोहन कंडारे, शेरी लुंड यांच्यासह २२ उमेदवार रिंगणात आहेत.
उल्हासनगरात सिंधी मते मोठया प्रमाणात आहेत. उल्हासनगर महापालिकेच्या महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती या तिन्ही पदांवर मराठी महिला बसल्याने उल्हासनगर शहराचा सिंधी मुखवटा उतरवला गेला आहे. त्यामुळे उल्हासनगर विधानसभेत असलेला ६० टक्के सिंधी समाज दुखावला गेला आहे. हे घडवून आणण्यात भाजपचा हात असल्याचा प्रचार विरोधक करत सिंधी मते खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेने पालिकेचे नगरसेवक धनंजय बोडारे यांना उमेदवारी दिलेली आहे. या मतदारसंघातील म्हारळ, वरप, कांबा, शहाड गांवठाण ही गावे, शिवसेनेच्या सहा नगरसेवकांचे वॉर्ड, मागासवर्गीय मतांवर शिवसेनेची मदार आहे. हीच मते मिळवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सचिन कदमही प्रयत्नशील आहेत.
सिंधी समाजाच्या नाराजीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ज्योती कालानी, काँग्रेसचे उमेदवार प्रकाश कुकरेजा आणि अपक्ष शेरी लुंड उचलण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महायुतीतून बाहेर पडलेल्या साई पक्षाचे आठ नगरसेवक याच मतदारसंघात येतात. साई पक्षाची १० ते १५ हजार मतांची ताकद आहे, मात्र साई पक्षाचे जीवन इदनानी हे राजकीय व्यापारी आहेत, ते कोणाला पाठिंबा देतात, ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे. मागील निवडणुकीत साई पक्षाच्या पाठिंब्यावरच भाजपच्या कुमार आयलानींचा विजय झाला होता. साई पक्षाच्या महापौरपदाच्या हरलेल्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मतदान केले आहे. त्यामुळे त्याची परतफेड साई पक्ष ज्योती कालानींचे निवडणुकीत काम करून करतो का, याकडे सगळय़ांचे लक्ष लागले आहे. मात्र साडेसात वर्षापूर्वी कालानींचे राजकारण संपवण्याची शपथ घेत बाहेर पडलेले इदनानी हे ज्योती कालानींना जिंकवण्यासाठी तयार होतील का? याबाबत अनेक शंकाकुशंका आहेत. या सर्व मातब्बर उमेदवारांत मतदारांच्या मनावर राज करत उल्हासनगरात विधानसभेचा झेंडा कोण फडकवतो, याकडे सगळयांचे लक्ष आहे.