उल्हासनगर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील ५० समस्यांचा पाढा ‘स्वाभिमान’ संघटनेने महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांना दिलेल्या निवेदनात वाचला होता.
उल्हासनगर – उल्हासनगर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील ५० समस्यांचा पाढा ‘स्वाभिमान’ संघटनेने महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांना दिलेल्या निवेदनात वाचला होता. या समस्या अजूनही तशाच असून याचा जाब विचारण्यासाठी उद्या ‘स्वाभिमान’ संघटनेच्या वतीने भव्य ‘पाणी पेटणार’ मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्त्व ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष, युवा आमदार नितेश राणे हे करणार असल्याची माहिती ‘स्वाभिमान’चे जिल्हा संघटक रोहित साळवे यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिका क्षेत्रात पाणी वितरण पध्दती सदोष आहे. महापालिकेला एमआयडीसीकडून १२० एमएलडी पाणीपुरवठा होतो. ते पुरेसे असतानाही उल्हासनगर पालिका हद्दीतील टोकाच्या भागातील रहिवाशांना पाणी मिळत नाही. टोकाच्या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी देण्यात आलेल्या मोफत टँकरसेवेत नळाचेच पाणी टँकरमार्फत पुरवण्यात येते. हे पाणी शहराच्या मध्यभागातील इमारतींनाही पुरवले जात असल्याचे आढळून येते. शिवाय टँकरचा आकडाही बोगस असून हे टँकर व्यावसायिकांना सर्रास पाणी पुरवतात.
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कर्मचा-यांची वानवा असून गायकवाड पाडय़ातील टँकर पॉईंटवरून दिवसाला १५० टँकर कॅम्प ४ आणि ५ साठी पाठवले जातात. यासाठी पालिका महिन्याला १६ लाख रुपये खर्च करते. नवीन पाणी वितरण योजना टाकण्यासाठी कोणार्क कंपनीला पालिकेने ३०० कोटी रुपये दिले असून या योजनेतील कराराप्रमाणे कोणार्क कंपनीने कामच केलेले नाही. मात्र तरीही पालिकेने या कामाचे थर्ड पार्टी ऑडीट केले नाही. या आणि यांसारख्या अनेक समस्या सध्या उल्हासनगरवासीयांना भेडसावत असून अशा सुमारे ५० समस्यांचे पत्र ‘स्वाभिमान’ने आयुक्तांना दिले आहे.
नागरिकांच्या या समस्या ‘स्वाभिमान’ संघटनेपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी ‘स्वाभिमान’ने हेल्पलाईन क्रमांकही जाहीर केला होता. यानंतरही या समस्या कायम असल्याने अखेर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी बुधवारी दुपारी १२ वाजता उल्हासनगर महापालिका मुख्यालयावर ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष, युवा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्चात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ‘स्वाभिमान’चे जिल्हा संघटक रोहित साळवे यांनी सांगितले आहे.