बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटवर आता सर्व सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. धकाधकीच्या या जीवनशैलीत बरेच लोक आरोग्याशी निगडित तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे न जाता इंटरनेटवरूनच आपल्या आजाराचे ऑनलाईन निदान करून घेत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अधिक श्रम व पैसा वाया न घालवता इंटरनेटद्वारे उपचार होत आहे ना? असे मानून अनेक लोक या व्यसनाच्या आहारी जाऊ लागले आहेत. इंटरनेटवरून उपचारपद्धतीचे हे व्यसन प्राणघातक ठरू शकते, याची साधी कल्पना सुद्धा या लोकांना नसावी. म्हणूनच तर डॉक्टरांचा सल्ला न घेता परस्पर उपचार करून घेणा-या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.
सध्याचे युग हे धकाधकीचे आहे. वाढते वय व सततची दगदग यामुळे आरोग्यासंदर्भातील विविध तक्रारी डोके वर काढू लागतात. डोकेदुखी, निद्रानाश, सांधेदुखी, मधुमेह, सर्दी, खोकला इत्यादी आजार बळावतात. इतिहासात मागे डोकावून पाहिल्यास लक्षात येईल की, पूर्वी एखाद्याला त्रास होत असल्यास त्याला नेमका कोणता आजार झाला आहे. याचे अचुक निदान करण्यासाठी ‘वैद्य’ असायचे. वैद्यांच्या तपासणीनंतरच रोगाचे निदान होत असे. याशिवाय, आजारातून मार्ग काढण्यासाठी काही जण ‘आजीबाईचा बटव्या’द्वारे घरगुती उपचार करत असे. पूर्वी प्रत्येकांच्या घरामध्ये ओवा, काळे मीठ असायचे. या गोष्टीमुळे सर्दी, पडसे आणि खोकला बरा होत असे. आजीचा बटवा असो किंवा विडय़ाच्या पानाचा डबा हा ‘आयुर्वेदिक’ पदार्थाचा खजिनाच असायचा. घरात कुणी आजारी पडले तर तातडीने उपचार म्हणून हेच पदार्थ कामी यायचे. देवीची लस, पोलिओ अशा अनेक लसींची गरज आजीच्या हातची घुटी भागवायची. या उपचारांमुळे आजार पटकन बराही होत होता. मात्र, आता ‘आजीबाईचा बटवा’ घराघरातून दुरापास्त झाला आहे. सध्याच्या नवीन पिढीला आजीबाईचा बटवा म्हणजे काय हेच माहीत नसते, याचीच खंत वाटते. पण, सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटद्वारे घरी बसल्या आजाराचे निदान करणे सोपे झाले आहे. त्यामुळे, धकाधकीच्या या जीवनशैलीत बरेच लोक आरोग्याशी निगडित तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे न जाता इंटरनेटवरूनच आपल्या आजाराचे ऑनलाईन निदान करून घेतात. यामुळे संसर्गजन्य आजाराचे निदान वेळेपूर्वीच करणे शक्य झाले आहे. पण, आता निदान झाल्यानंतरही एक पाऊल पुढे टाकत इंटरनेटचाच वापर करून बहुतांश लोक उपचारपद्धत जाणून स्वत: उपचार करून घेत आहेत.
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडन्स डॉक्टर्स (मार्ड) तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मुंबईत दररोज १० जणांपैकी नऊ जण आजाराचे निदान झाल्यानंतर उपचारासाठी डॉक्टरांकडे न जाता इंटरनेटद्वारे उपचारपद्धत जाणून स्वत:चा उपचार स्वत: करून घेत असल्याचे उघड झाले आहे. यात ताप, सर्दी, खोकला, हिवताप, जुलाब यांसारख्या साधारण आजारांचा समावेश आहे. मार्ड संघटनेतर्फे पालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी ४०० रुग्णांशी संवाद साधला. या ४०० रुग्णांपैकी ३२० रुग्ण आजारासंदर्भात जाणून घेण्यासाठी इंटरनेटचा वापर करत असल्याचे स्पष्ट झाले. तर ११० जण दररोज इंटरनेटचा वापर करतात. याशिवाय, डॉक्टरांचा सल्ला न घेता ५६ जण इंटरनेटच्या आधारे औषधांचे सेवन करत असल्याने यातील १२ जणांवर या औषधांचे दुष्परिणाम झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर हे रुग्ण अत्यंत गंभीर अवस्थेत डॉक्टराकडे उपचारासाठी येतात. याशिवाय ३२ जणांना डॉक्टरांच्या उपचारपद्धतीपेक्षा इंटरनेटवरील उपचार जास्त सोयीस्कर वाटत असल्याचे या सर्वेक्षणाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
‘इंटरनेट’च्या मदतीने आवश्यक ती माहिती मिळवणे यात काहीच गैर नाही. पण, याचा वापर करून आजारावर उपचार करण्याचे तंत्र शिकून स्वत:वर त्याचा प्रयोग करणे अतिशय घातक आहे. लोकांमध्ये इंटरनेटवरील उपचारपद्धतीमुळे गैरसमज वाढू लागला आहे. उदाहरणार्थ, गोड पदार्थाचे सेवन केल्यास मधुमेहाची शक्यता वाढते, असे अनेकाना वाटते. पण, गोड पदार्थ खाल्ल्याने मधुमेह होत नाही, हा निव्वळ गैरसमज आहे. जो पूर्वीपासून लोकांत पसरत आलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही पदार्थाचे अतिरिक्त सेवन करणे हे शरीरासाठी घातक असते. मात्र, प्रमाणात एखादा पदार्थ खाल्ल्यास आरोग्यावर परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे इंटरनेटवरून उपचारपद्धती जाणून स्वत:वर उपचार करता येणे, असा समज पसरू लागला आहे. हा समज एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे इंटरनेटद्वारे उपचार करता येऊ शकतो. हा गैरसमज दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता डॉक्टरांनी ‘ट्रस्ट युवर डॉक्टर, नॉट विकिपीडिया’ ही मोहीम हाती घेतली आहे. पण या मोहिमेला किती प्रतिसाद मिळणार हे वेळ आल्यावरच कळेल. पण तत्पूर्वी, या प्रकारांवर आळा घालण्यासाठी काही गोष्टी करू शकतो. जसे, काही महिन्यांपूर्वी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधांची ऑनलाईन खरेदी करण्यावरून वादंग निर्माण झाला होता. यासंदर्भात विविध स्तरातून सरकारवर टीकेची झोडही उठविण्यात आली होती.
त्यावेळी राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष वेधून ऑनलाईन वेबसाईटवरून औषधांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घातली होती. त्याचप्रमाणे इंटरनेटवर सुद्धा आजाराची माहिती व त्यावरील उपचारपद्धत जाणून घेण्यासाठी सरकारने काही ठोस नियमावली आखून दिली पाहिजे. जेणेकरून कोणती व्यक्ती कोणत्या आजाराची माहिती घेते व उपचारपद्धती जाणून घेते याची नोंद ठेवता येईल. जेणेकरून नोंद ठेवण्यात आली तर कदाचित इंटरनेटवरून आजारावर उपचार करणा-या लोकांच्या या सवयीला चाप बसेल. व भविष्यात उद्भवणारा धोका काहीसा कमी होण्यास मदत होईल.