‘उद्योगमित्र समिती’ची बैठक आतापर्यंत केवळ मुंबईतच घेतली जात होती. यापुढे ती नागपूरला घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी विधानसभेत दिले.
नागपूर – ‘उद्योगमित्र समिती’ची बैठक आतापर्यंत केवळ मुंबईतच घेतली जात होती. यापुढे ती नागपूरला घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी विधानसभेत दिले. उद्योगाचे वीजदर कमी करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील हिंगणा व बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील वीजदर कमी करण्याबद्दल विचार केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
हिंगणा व बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्यांबाबत भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधीद्वारे लक्ष वेधले होते. येथे उद्योग क्षेत्रातील विजेचे दर अधिक असून पाण्याचे दरही अधिक आहेत. त्यामुळे येथील उद्योगांवर मोठा परिणाम होत आहे. हे दर कमी करावेत. तसेच ‘उद्योगमित्र समिती’ची बैठक नेहमी केवळ मुंबईतच घेतली जाते, ती नागपूर येथेही घ्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली होती. त्याला उत्तर देताना राणे म्हणाले, ‘राज्यातील उद्योगांचे वीज दर कमी करण्यासाठी माझ्याच अध्यक्षतेखाली मंत्र्यांची उपसमिती नेमायची आहे. या समितीच्या अनेक बैठका झाल्या आहेत.
या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्यातील उद्योगांच्या विजेचे दर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचा लाभ हिंगणा व बुटीबोरी येथील उद्योगांना होईल. विजेचे दर कमी झाले की पाण्याचे दरही आपोआपच कमी होतील, असे राणे यांनी सांगितले. ‘उद्योगमित्र समिती’ची बैठक मुंबईप्रमाणेच नागपूरला घेतली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.