शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची सोमवारी विधानसभेत उत्तरे देताना बोलतीच बंद झाली.
मुंबई- शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची सोमवारी विधानसभेत उत्तरे देताना बोलतीच बंद झाली. विरोधकांच्या एकाही प्रश्नाला देसाई यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी देसाईंचा पहिलाच प्रश्न विधानसभेत राखून ठेवला.
त्र्यंबकराव भिसे, अमित देशमुख यांनी बंद पडलेल्या उद्योगांचा तारांकित प्रश्न विचारला होता. येथे एकूण १२०० उद्योग आहेत. त्यापैकी सुमारे ५० टक्के उद्योग पाण्याअभावी बंद पडल्याने येथील १० हजार मजुरांवर बेकारीची वेळ आली असल्याचा दावा विरोधी सदस्यांनी केला होता. तसेच सरकारने या बेकार झालेल्या कामगारांसाठी काय उपायोजन केल्या आहेत?, अशी विचारणा विरोधी सदस्यांकडून करण्यात येत होती.
उद्योगमंत्री देसाई यांनी पाण्याअभावी लातूर येथील ५० टक्के उद्योग बंद पडल्याची कबुली दिली. त्याचा आधार घेत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी सदस्यांनी देसाईंना कोंडीत पकडले. विरोधी बाकावरुन विचारल्या जाणा-या प्रश्नांमुळे उद्योगमंत्री देसाईंची बोलतीच बंद झाली. नेमके काय उत्तर द्यावे हेच त्यांना कळत नव्हते.
एकाच उत्तराची टेप ते पुन्हा पुन्हा वाजत होते. त्यावर विरोधकांनी जोरदार हरकत घेत देसाईंचा हा प्रश्न राखून ठेवण्याची मागणी केली. अखेर तालिका अध्यक्षांना उद्योग मंत्री सुभाष देसाई सभागृहातील सदस्यांना समाधानकारक उत्तरे देत नाहीत यामुळे हा प्रश्न राखून ठेवावा लागला.
सुभाष देसाईंना जेव्हा दिलगिरी व्यक्त करावी लागते..
मुंबई- राज्यातील अतिगंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विधानसभेत पुकारल्या जाणा-या तारांकित प्रश्नोत्तराच्या वेळी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्रीच गैरहजर राहिल्याने सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची नामुष्की सोमवारी विधानसभेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर ओढवली.
सोमवारी विधानसभेचे कामकाज प्रश्नोत्तराच्या तासाने सुरू झाले. सकाळी ठीक अकरा वाजता प्रश्नोत्तराचा तास तालिका सदस्य योगेश सागर यांनी पुकारला. दुष्काळी भागात पाण्याअभावी बंद होत असलेले उद्योग या गंभीर मुद्दयावर पहिलाच प्रश्न विचारला होता.
मात्र, यावेळी संपूर्ण सभागृहात केवळ तीनच मंत्री उपस्थित होते. विधिमंडळ नियमानुसार अपेक्षित मंत्र्यांची संख्या सभागृहात नव्हती. उद्योग खात्याबाबत तारांकित प्रश्न असताना उद्योगमंत्री सुभाष देसाई सभागृहात नव्हते.
त्यामुळे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य अजित पवार यांनी जोरदार हरकत घेत विधानसभा अध्यक्षपदी असलेले तालिका अध्यक्ष योगेश सागर यांच्या निर्देशनास ही बाब आणून दिली.
तेवढयात उद्योगमंत्री सुभाष देसाई सभागृहात आले. तेव्हा विरोधी पक्षनेत्यांनी मंत्र्यांनी सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची जोरदार मागणी केली. मंत्री उपस्थित नसल्यामुळे अखेर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर भर सभागृहात दिलगिरी व्यक्त करण्याची नामुष्की विधानसभेत ओढवली.