ब-याच वेळा सहप्रवाशी अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करणे टाळतात. कोण त्या झमेल्यात पडेल? कोण पोलिसांचा त्रास सहन करेल? कोणाला एवढा वेळ आहे तिकडे पोलिसांसोबत बसायला, अशा प्रकारची भयानक कारणे सहप्रवाशी मदत न करण्यासाठी सांगतात; पण अशावेळी मनात एक विचार येतो की, त्या अपघातग्रस्त व्यक्तीच्या जागेवर जर आपला जवळचा नातेवाईक किंवा ओळखीची व्यक्ती असेल तर आपण हीच कारणे सांगून तिथून पळ काढणार का? नाही ना!
बापरे, बघवतही नाही. अरेरे गेला वाटतं, अरे मूर्ख लेकाचा काय गरज होती याला रूळ ओलांडण्याची, अशी काहीशी वाक्ये कानावर पडली आणि मनात धस्स झाले.
नक्की काय झाले आहे हे पाहण्याकरिता गर्दीला बाजूला सारत मी पुढे आलो. रेल्वे रुळावर कोणीतरी जखमी अवस्थेत पडले होते.
कोणा अनोळखी इसमाचा रेल्वे अपघात झाला होता. त्या अपघातग्रस्त व्यक्तीभोवती वीसेक माणसांची गर्दी झाली होती.
सगळ्यांच्या वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या, ‘कोण असेल रे हा, अजून जिवंत आहे, अरे काय गरज होती याला रेल्वे रूळ ओलांडण्याची’ अशाप्रकारची बरीच वाक्ये कानावर पडत होती.
पण त्या व्यक्तीची मदत करण्यासाठी मात्र कोणीच पुढे येत नव्हते. अशावेळी मनात प्रश्न पडतो की जर या जागी आपला कोणी नातेवाईक असेल, परिचित व्यक्ती असेल, तेव्हाही आपण हीच कारणे सांगणार की त्याला मदत करायला पुढे धावणार? मग हा भेदभावी फरक का? तुमचा जर थोडा वेळ जाऊन कोणा एका व्यक्तीचा जीव वाचणार असेल तर तो वेळ कारणी लागेल असे वाटत नाही का?
मुळात रूळ ओलांडणे हाच मोठा गुन्हा आहे. असे असतानाही लोक सर्रासपणे तो गुन्हा करताना दिसतात. बरेच लोक त्याबाबत ‘रेल्वे ब्रीज पार करायला उशीर होतो म्हणून आम्ही रूळ ओलांडून जातो,’ असे स्पष्टीकरण देतात. रेल्वे रूळ ओलांडत असताना दिवसातून रोज एक तरी अपघात होत असतो. पण तरीही या विविध घटनांतून लोक काहीच बोध घेत नाहीत याबाबत खंत वाटते.
दिवसेंदिवस रेल्वे रूळ ओलांडणा-याच्या संख्येत वाढच होताना दिसते. रेल्वे रूळ ओलांडणा-यांवर पोलीस कारवाईही करतात. परंतु शिक्षेची तरतूद कमी असल्याने किंवा दंड कमी असल्याने बरेच लोक अनेकदा दंड भरून तेथून पळ काढतात. अनेक शहरात रेल्वे रुळालगत संरक्षक भिंत नसल्यामुळे अनेक जण अशा पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडताना दिसतात.
ब-याच वेळा अपघात झालेल्या व्यक्तीला कोणीच मदत करत नाही. तासन् तास ती अपघातग्रस्त व्यक्ती तेथे तशीच पडून राहते. परिणामी तातडीने उपचार न मिळाल्याने जखमी व्यक्तीला आपला प्राण गमवावा लागतो.
रेल्वे अपघातात जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचावेत याकरिता काही रेल्वे स्थानकात आपत्कालीन वैद्यकीय केंद्रे चालूही करण्यात आली आहेत. रेल्वे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला एका तासाच्या आत तातडीने उपचार मिळाले तर त्या व्यक्तीचा जीव वाचवणे शक्य असते असे अनेकवेळा दिसून आले आहे.
ब-याच वेळा सहप्रवासी अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करताना दिसत नाहीत. कोण त्या झमेल्यात पडेल, पोलिसांचा त्रास कोण सहन करेल, कोणाला एवढा वेळ आहे तिकडे पोलिसांसोबत बसायला, अशा प्रकारची कारणे मदत न करण्यासाठी ते सांगतात.
मुळात कायद्याप्रमाणे आता असे काहीही नाही. अपघातग्रस्त व्यक्तीला कोणीही मदत करू शकतो. मग रुग्णालयात कोणी भरती केले, किंवा कोण या अपघातग्रस्त व्यक्तीला येथे घेऊन आले, अशा प्रकारची काहीही चौकशी आता पोलीस करत नाहीत.
आपण फक्त नाव देऊन तिथून जाऊ शकतो. अपघातग्रस्त व्यक्तीला कोणत्याही सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार मोफत मिळतो. परंतु याबाबत फारच कमी लोकांना माहिती असते. परंतु लोकांच्या मनात पूर्वीपासूनची ती एक भीती लपलेली आहे. त्यामुळे मनात असूनही लोक मदत करायचे टाळतात. पण जर या जागी आपल्या परिचरायची किंवा नात्यातली व्यक्ती असेल तर आपण त्याला मदत करणार नाही का? अनेकदा सहप्रवासी मदत करत नाहीत म्हणून अपघातग्रस्त जीव गमावतात, असे नाही.
काही वेळा पोलिसांच्या काही क्षुल्लक चुकाही अपघातग्रस्त व्यक्तींच्या जीवावर बेततात. गेल्याच आठवडयात अशीच एक घटना बदलापूर स्थानकाजवळ झाली. लोकलमधून प्रवास करताना दगड लागून रेल्वे रुळावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेस्थानकादरम्यान ही घटना घडली. यातील धक्कादायक बाब म्हणजे या जीआरपीएफ हवालदाराच्या हट्टामुळे या महिलेला वेळेत उपचार मिळाले नाहीत, आणि तिचा मृत्यू झाला.
सीएसटी रेल्वे स्थानकातून लोकलने घरी निघालेल्या दर्शना पवार ही प्रवासादरम्यान दरवाजाजवळ उभी होती. लोकलने अंबरनाथ रेल्वे स्थानक सोडल्यानंतर संध्याकाळी ७.४५च्या सुमारास दर्शनाच्या डोक्याला दगड लागला. त्यामुळे ती लोकलमधून खाली पडली. दर्शनाखाली पडल्यानंतर गाडीतील सहप्रवाशांनी गाडी थांबवण्यासाठी साखळी खेचली मात्र लोकल बदलापूर स्थानकात थांबली.
गाडीतील प्रवाशांनी स्टेशन मास्तरांना माहिती दिली. ते तातडीने सीएसटीकडे जाणा-या लोकलने घटनास्थळी ८.१० वाजता पोहोचले. त्याच्यासोबत मधू बिरमोले नावाच्या एक सहप्रवासी देखील होत्या. त्यांनी दर्शनाला अंबरनाथ रेल्वेस्थानकात आणले. बिरमोले आणि दोन हमालांच्या मदतीने दर्शनाला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्याच ठिकाणी कल्याण स्थानकातून रेल्वेचा पोलीस हवालदार दाखल झाला. रुग्णालयातील डॉक्टरांनी दर्शनाला उल्हासनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.
मात्र संबंधित हवालदाराने त्यास नकार दिला. ज्या बिरमोले यांनी दर्शनाला सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यांनी दर्शनाची जबाबदारी घेऊन खासगी रुग्णालयात दाखल करू असे सांगितले. मात्र नियमांवर बोट ठेवत हवालदाराने त्यास नकार दिला. तसेच यात त्यांनी काही हस्तक्षेप करू शकत नाही, असे धक्कादायक विधानही केले.
रुग्णालयातील डॉक्टरांनी संबंधित हवालदाराला चांगल्या सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. बिरमोले यांनीही विनंती केली. मात्र हवालदाराने नकार दिला. तोपर्यंत साडेदहा वाजून गेले होते. बिरमोले रुग्णालयातून स्वत:च्या घरी गेल्या. त्यानंतर सरकारी रुग्णवाहिकेतून संबंधित हवालदार दर्शनाला परळ येथील केईएम रुग्णालयात घेऊन आला.
मात्र, रुग्णालयात जागा नसल्याने दर्शनाला जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत १२.३० वाजले होते. त्यानंतर पंधरा मिनिटांनी दर्शनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर वेळेत उपचार न मिळाल्याने दर्शनाचा पहाटे ४.४५ वाजता मृत्यू झाला.
धक्कादायक म्हणजे, रेल्वे पोलिसांनी ज्या ठिकाणी घटना घडली तेथे पंचनामा करण्यासाठी भेटही दिली नाही. संबंधित हवालदाराचे नाव समजू शकलेले नाही; परंतु या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
याचाच अर्थ ब-याच वेळा पोलिसांचेही चुकते आणि अशा काही आडमुठया पोलिसांच्या हट्टी स्वभावामुळे मग सामान्य माणसे सहप्रवाशाला मदत करायला घाबरतात. पण शेवटी एकच सांगू शकेन. चूक कोणाचीही असो माणूस म्हणून माणुसकी दाखवून प्रत्येकाला मदत करणे आपले कर्तव्य नाही का? देव जाणो आज कोणी तरी दुसरा अपघातग्रस्त आहे, उद्या आपलाच कोणी त्या जागी असेल तर तेव्हाही आपण असाच पळ काढणार का?
रेल्वे अपघातातील कोणत्याही अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केलीच पाहिजे. कोणीही अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करू शकतो. मदत करणा-या त्या व्यक्तीची कोणतीही चौकशी होत नाही. अपघातग्रस्ताला नजीकच्या कोणत्याही रुग्णालयात तातडीचे मोफत उपचार मिळू शकतात.
– रवींद्र सिंगल लोहमार्ग पोलीस आयुक्त, मुंबई