देवनार कचरा भराव भूमीतील आगीच्या धुरामुळे मुंबईकर गुदमरत आहेत. देवनार डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची सर्वच राजकीय पक्षांकडून मागणी होत असताना आता शिवसेना-भाजपात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.
मुंबई- देवनार कचरा भराव भूमीतील आगीच्या धुरामुळे मुंबईकर गुदमरत आहेत. देवनार डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची सर्वच राजकीय पक्षांकडून मागणी होत असताना आता शिवसेना-भाजपात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. सर्व राजकीय पक्षांनी आपल्या पायाची धूळ देवनारला झाडल्यानंतर शिवसेना मंत्र्यांनी, खासदार-आमदार आणि नगरसेवकांसह या कचरा भराव भूमीची पाहणी केली.
देवनार आगीमुळे मुंबईकरांचे वातावरण बिघडलेले असताना मुंबईचे कैवारी म्हणवणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र याकडे पाठ फिरवली आहे. या दरुगधीमुळे लोक गुदमरून मेले तरी चालतील, पण आम्ही आमचे पाय बंगला आणि वातानुकूलित गाडय़ांमधून बाहेर ठेवणार नाही, असाच पवित्रा त्यांनी घेतल्याचे दिसते.
देवनार कचरा भराव भूमीतील कच-याला आगी लागण्याचे प्रकार सुरूच आहेत. हा सिलसिला सुरूच असून महापालिकेच्या वतीने दिलेल्या आश्वासनांची अद्याप अंमलबजावणी केली जात नाही. केवळ आग विझवणे आणि येणा-या राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळाला सामोरे जाणे असाच कार्यक्रम सुरू आहे.
समाजवादी पक्षाने या आगीवरून बोंबा ठोकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा तसेच मनसेवाले जागे झाले. त्यांनी या ठिकाणी तीव्र आंदोलन केल्यानंतर सोमवारी शिवसेनेच्या मंत्र्यांसह सर्व आमदार, खासदार यांच्यासह महापौर आणि नगरसेवक यांनी देवनारची पाहणी केली.
या पाहणीनंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भाजपावर शरसंधान साधले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या जागेवर प्रकल्प उभारण्यास एनओसी आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी, अशी मागणी त्यांनी केली.
भाजपाचे खासदार किरीट सोमय्यांनी, देवनारमधील आगीला शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. सर्व राजकीय पक्षांनी यामध्ये उडी मारलेली असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी याबाबत मौन बाळगले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून कचरा भराव भूमीतील आगीमुळे जनता गुदमरत असतानाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी प्रत्यक्षात या भागाची पाहणी केलेली नाही.
शिवसेनेच्या मंत्र्यांसह सर्वानी या कचरा भराव भूमीची पाहणी केली, त्या वेळी उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे सहभागी होतील, असे वाटले होते.
परंतु उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी देवनारला जाणे टाळले. त्यामुळे रस्त्यांची आणि नाल्यांची हवाई पाहणी करणा-या उद्धव ठाकरेंना देवनारला जाणे कमीपणाचे वाटते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबतही असाच प्रश्न उपस्थित केला जात असून घाणीच्या वासापासून दूर राहण्यासाठी ते या विषयात उडी मारत नसल्याचेही बोलले जात आहे.