उत्तराखंडातील कुमाऊ आणि गढवाल भागातील जंगलांना लागलेली आग आता हिमालयातील काही भागापर्यंत पोहोचली असून यात पाच जणांचा मृत्यू झाला.
डेहराडून- उत्तराखंडातील कुमाऊ आणि गढवाल भागातील जंगलांना लागलेली आग आता हिमालयातील काही भागापर्यंत पोहोचली असून यात पाच जणांचा मृत्यू झाला. राज्यात २०० ठिकाणी आग लागली असून पौरी, टिहरी आणि ननिताल या भागांना या आगीचा सर्वाधिक फटका बसला आहे.
ही आग उत्तरेकडील भागात पसरत चालली असून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही भागातही ही आग पसरली आहे.
राज्यपाल के. के. पॉल यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाला (एनडीआरएफ) आदेश दिले असून त्यानुसार एनडीआरएफच्या तीन तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. यात तज्ज्ञांचा समावेश आहे.
भारतीय हवाई दलाने ही आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरमधून पाणी मारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या २४ तासांत ही आग चार पट वाढल्याचे उपग्रहांनी पाठवलेल्या छायाचित्रात दिसत आहे.
या जंगलात फेब्रुवारी महिन्यापासून आगीच्या ९२२ घटना घडल्या असून त्यात सुमारे १८९०.७९ हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.