प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात घातपात घडवण्याचा कट रचणा-या दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कातील १३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात मोठा घातपात घडवण्याचा कट रचणा-या दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कातील १३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. महाराष्ट्र व हैदराबादचे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि एनआयए यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत हा कट उधळून लावला.
दहशतवादविरोधी पथक आणि एनआयएने इसिसच्या संपर्कातील १३ दहशतवाद्यांसह अन्य ३५ संशयितांना अटक केली आहे. या १३ दहशतवाद्यांपैकी ४ हैदराबाद येथून, ४ बंगळुरू, २ ठाणे, २ तुमकूर आणि एकाला मंगळुरू येथून अटक केली आहे. त्यांचा मुख्य सूत्रधार मुद्दसर मुश्ताक शेख याला ठाण्यातील मुंब्रा येथे अटक करण्यात आली.
मुद्दसर इसिसच्या प्रशिक्षणासाठी मुलांना पाठवत असे. त्याने स्वत:ला इसिसचा भारतातील स्वयंघोषित म्होरक्या म्हणून जाहीर केले आहे. देशातील महत्त्वाच्या ठिकाणी स्फोट घडविणे आणि विदेशी नागरिकांना ठार मारणे, यासारखी जबाबदारी इसिसने आपल्याकडे सोपविली असल्याचे त्याने तपास अधिकार्यांना चौकशीत सांगितले.
दरम्यान, पठाणकोट हल्ल्यानंतर अचानक बेपत्ता झालेल्या आल्टो कारचा चालक विजयकुमार हा हिमाचल प्रदेशातील कांगरा येथे मृतावस्थेत आढळून आल्याने राज्यात अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यावर्षीच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी असल्याने केवळ पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनाच नव्हे, तर इसिस आणि अल् कायदा यासारख्या जहाल संघटनांनीही मोठा घातपात करण्याची योजना आखली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात दहशतवादीही भारतात घुसले असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.
एनआयएच्या अधिकार्यांनी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कर्नाटकच्या विविध भागांमधून इसिसशी संपर्कात असलेल्या सहा जणांना अटक केली आहे. यात एका केमिकल अभियंत्याचाही समावेश असून, त्याचे नाव नजमुल हुडा आहे.
मुंबईतही दहशतवादविरोधी पथक आणि एनआयएने इसिसच्या काही संशयितांना अटक केली आहे. गेल्या महिन्यात मुंबईत मालाडमधील मालवणी परिसरातील काही तरूण इसिसमध्ये सामील होण्यासाठी निघाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याआधी मे २०१४ मध्ये कल्याणमधील चार तरुण मुंबईतून सीरियाला गेले होते. त्यातील एक तरूण अरीब माजिद हा भारतात परत आला. सध्या तो एनआयएच्या कोठडीत आहे.
मात्र उर्वरित तरुण सीरियातच आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असलेल्या काही जणांना एटीएसने अटक केली आहे.
आंध्रप्रदेशच्या हैदराबादमधून चौघांना आणि उत्तरप्रदेशातील तुमकूर येथे दोघांना एनआयएने अटक केली आहे. ज्या ३५ संशयितांना एनआयएने ताब्यात घेतले आहे, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
प्रजासत्ताक दिनापर्यंत एनआयएचे धाडसत्र सुरूच राहणार असल्याने, इसिसशी संपर्कात असलेल्या आणखी काही दहशतवादी व संशयितांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.