दोन गटांमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारानंतर इंदोरमधल्या चंदननगर भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
इंदोर – दोन गटांमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारानंतर इंदोरमधल्या चंदननगर भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून, याप्रकरणी आतापर्यंत १०० जणांना अटक करण्यात आली आहे.
चंदननगरमध्ये मंगळवारी गायींचे मृतदेह सापडल्यानंतर दोन गटांमध्ये दंगल उसळली होती. दोन्ही बाजूंनी झालेल्या दगडफेकीमध्ये ५० नागरिक आणि वीस पोलिस जखमी झाले होते. हिंसक चकमकीनंतर लगेचच या भागात संचारबंदी लागू करण्यात आली.
संचारबंदी लागू झाल्यानंतर, कुठेही हिंसक चकमक झालेली नाही असे पोलिस अधीक्षक अनिलसिंह खुशवाह यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून या भागात मोठया प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.