अनिश्चिततेच्या सावटाखाली असलेल्या इंडियन बॅडमिंटन लीगचा (आयबीएल) दुसरा पुढील वर्षी जानेवारीपासून सुरू होत आहे.
नवी दिल्ली- अनिश्चिततेच्या सावटाखाली असलेल्या इंडियन बॅडमिंटन लीगचा (आयबीएल) दुसरा पुढील वर्षी जानेवारीपासून सुरू होत आहे. २०१३ मध्ये बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने (बीएआय) व्यावसायिक सहकरी स्पोर्टी सोल्युशनसह आयबीएलला सुरुवात केली होती.
दुस-या आवृत्तीत दिल्ली, मुंबई, बंगळूरु, हैदराबाद आणि लखनौ संघांचा समावेश असेल. पुढील वर्षी पुण्याऐवजी चेन्नई संघाचा समावेश होण्याची शक्यता आहे. लीगच्या दुस-या हंगामात भारताच्या सर्वच अव्वल बॅडमिंटनपटूंचा सहभाग निश्चित आहे.
काही परदेशी बॅडमिंटनपटूही खेळण्यास उत्सुक आहेत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असे बीएआय अध्यक्ष डॉ. अखिलेश दासगुप्ता म्हणाले. आयबीएलचा पहिला हंगाम ३० जून ते १९ जुलै २०१३ दरम्यान होणार होता. मात्र अखेर २२ जुलैला ही स्पर्धा घेण्यात आली.
सप्टेंबर- ऑक्टोबर २०१४ दरम्यान दुस-या हंगामाची घोषणा करण्यात आली होती. परंतु, जानेवारी-फेब्रुवारी २०१५ पर्यंत स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. अखेर पुढील वर्षी जानेवारीमध्ये स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आयबीएलला मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र स्पोर्टी सोल्युशनसोबत मतभेद झाल्यानंतर बीआयएने स्वबळावर ही लीग खेळवण्याचा निर्णय घेतल्याचे दासगुप्ता यांनी सांगितले.