विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यातील जगज्जेतेपदाची लढत नऊ नोव्हेंबरपासून चेन्नईत असली तरी देशभरातून या लढतीला सर्वाधिक प्रेक्षक इंटरनेटवरून मिळतील, असा विश्वास अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे (एआयसीएफ) खजिनदार रवींद्र डोंगरे यांनी ‘प्रहार’कडे व्यक्त केला.
मुंबई- विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यातील जगज्जेतेपदाची लढत नऊ नोव्हेंबरपासून चेन्नईत असली तरी देशभरातून या लढतीला सर्वाधिक प्रेक्षक इंटरनेटवरून मिळतील, असा विश्वास अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे (एआयसीएफ) खजिनदार रवींद्र डोंगरे यांनी ‘प्रहार’कडे व्यक्त केला.
‘‘आनंद-कार्लसन लढतीचा आनंद जास्तीतजास्त बुद्धिबळप्रेमींना घेता यावा यादृष्टीने एआयसीएफचा प्रयत्न आहे. त्यातच बुद्धिबळ हा जास्तकरून नेटवर खेळण्यात येणारा खेळ आहे. त्यामुळे इंटरनेटवरून या लढतीचा आनंद घेणारे अनेकजण असतील. त्यासाठी www.chessdom.com यासारख्या संकेतस्थळांवरून थेट लढत पाहता येईल.
डीडी स्पोर्ट्स वाहिनीशीही आमचा करार झाला असल्याने स्पर्धेतील सर्व म्हणजे १२ लढतींचे प्रक्षेपण टीव्हीवरूनही प्रेक्षकांना पाहता येईल. त्याशिवाय चेन्नईतील हयात रिजन्सी हॉटेलच्या बाहेर आम्ही मोठे व्हिडियो स्क्रीन लावणार आहोत. जेणेकरून ज्यांना तिकिटे मिळणार नाहीत त्यांनाही ही लढत पाहता येईल, ’’ याकडे एशियन झोन ३.७ चेदेखील अध्यक्ष असलेले डोंगरे यांनी लक्ष वेधले.
या लढतीच्या तिकिटविक्रीलाही चांगली सुरुवात झाल्याचे डोंगरे सांगतात. ‘‘तिकिटविक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोठया संख्येने प्रेक्षक आनंद-कार्लसनला प्रोत्साहन द्यायला उपस्थित असतील याची खात्री आहे. त्यातच विविध वयोगटातील मुलांनाही आनंद-कार्लसन लढत पाहता यावी, यासाठी प्रत्येक लढतीच्यावेळेस आम्ही ठराविक वयोगटाच्या मुलांना मोफत प्रवेश देण्यासाठी विचार करत आहोत. कारण त्या सर्व मुलांसाठी तो एक आगळावेगळा अनुभव असेल,’’ याकडेही डोंगरे यांनी लक्ष वेधले.
कार्लसन समाधानी
कार्लसनने तयारीचा आढावा घेण्यासाठी ऑगस्टमध्ये चेन्नईला भेट दिली होती. ‘‘कार्लसनला तो चेन्नईत राहणार असलेल्या हॉटेलच्या खोल्या दाखवल्या. त्याच्याशिवाय आम्ही देणार असलेल्या अन्य सुविधांचीही त्याला माहिती दिली. तेथील जेवणाबाबतीही माहिती दिली. त्यानंतर तो आम्हाला समाधानी दिसला,’’ असे डोंगरे यांनी सांगितले.
एआयसीएफचे यश
आनंद-कार्लसन यांच्यातील जगज्जेतेपदाच्या लढतीचे यजमानपद मिळवून एआयसीएफने मोठे योगदान दिले आहे. ‘‘गेल्यावेळी आनंद-गेलफॅँड यांच्यात जगज्जेतेपदाची झालेली लढत मॉस्कोमध्ये झाली त्याचे यजमानपद आम्हाला भारताला मिळवून द्यायचे होते. मात्र त्यावेळी मॉस्कोने बाजी मारली. त्याचवेळी पुढील वेळी जर यजमानपदासाठी दावा केला तर त्याचे अधिकार मिळतील, असे आश्वासन ‘फिडे’ने आम्हाला दिले होते. त्यातच पॅरिसनेही यंदा यजमानपद भूषवण्यासाठी उत्सुकता दाखवली होती. मात्र आम्ही बाजी मारली. आता या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे,’’ असे डोंगरे यांनी सांगितले.
फिडेमध्ये भारताच्या बुद्धिबळपटूंची संख्या मोठी
नवी दिल्ली- भारताने जागतिक फिडे रेटिंगमध्ये सर्वाधिक देशांचे बुद्धिबळपटू असणा-या फ्रान्सची बरोबरी केली आहे. सध्या भारताच्या ३५,२०० बुद्धिबळपटूंचा समावेश फिडे रेटिंगमध्ये आहे. फ्रान्सचाही तितकाच आकडा आहे.
चार दशकांपूर्वी फिडेमध्ये भारताकडून मॅन्युअल आरोन हे एकमेव बुद्धिबळपटू होते. मात्र विश्वनाथन आनंदच्या प्रवेशानंतर व्यावसायिक स्तरावर बुद्धिबळ खेळणा-यांची संख्या वाढली. गेल्या दशकभरात हे प्रमाण मोठया संख्येने वाढले आहे. गेल्या दोन वर्षात भारताने जर्मनी आणि रशियाला मागे टाकले आहे. आता भारत मार्च २०१४ नंतर फ्रान्सलाही मागे टाकून अव्वल होईल, असा अंदाज आहे.