भारत ‘अ’ आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी सराव लढत गुरुवारी (१२ जानेवारी) क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) ब्रेबर्न स्टेडियमवर खेळली जाणार आहे.
मुंबई- भारत ‘अ’ आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी सराव लढत गुरुवारी (१२ जानेवारी) क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) ब्रेबर्न स्टेडियमवर खेळली जाणार आहे. प्रत्येकी तीन सामन्यांच्या वनडे आणि टी-२० मालिकेपूर्वीची शेवटची सराव लढत असल्याने दुखापतीतून परतलेला अजिंक्य रहाणे आणि सुरेश रैनाचा ‘सराव’ कसा होतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. नवोदित यष्टिरक्षक रिषभ पंतही केंद्रस्थानी आहे.
पहिल्या लढतीत मंगळवारी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारत ‘अ’ संघाला पराभूत व्हावे लागले. भारताची फलंदाजी बहरली. मात्र पाहुणा संघही त्याच त्वेषाने खेळला. त्यामुळे अंबाती रायडूसह कर्णधार धोनी, अष्टपैलू युवराज सिंग आणि डावखुरा सलामीवीर शिखर धवनची फटकेबाजी व्यर्थ ठरली. सराव सामना असल्याने हार-जीत फार महत्त्वाची नसते. दुखापतीतून सावरलेला धवन आणि पुनरागमन केलेला युवराज तसेच धोनीने फलंदाजीचा चांगला सराव केल्याने हायसे वाटले. अनेक महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळणार असल्याने सराव लढतीतील चांगल्या कामगिरीमुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. हा आत्मविश्वास प्रत्यक्ष मालिकेदरम्यान महत्त्वपूर्ण ठरेल. धोनी, युवराज आणि धवनने फॉर्म दाखवल्यानंतर अजिंक्य आणि रैनाच्या कामगिरीकडे डोळे लागले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या तिस-या कसोटीदरम्यान अजिंक्यला दुखापत झाली. त्यामुळे तो उर्वरित दोन कसोटीत खेळू शकला नाही. जवळपास एका महिन्याने रहाणे आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. अजिंक्य दुखापतीमुळे संघाबाहेर फेकला गेला, हे खरे असले तरी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला अपेक्षित खेळ करता आलेला नाही. पाच डावांत अजिंक्यला केवळ ६३ धावा करता आल्या. कर्णधार विराट कोहलीसह अन्य सहका-यांच्या सुरेख कामगिरीमुळे त्यांचे अपयश झाकले गेले. दुखापतीतून सावरल्यानंतर तंदुरुस्ती सिद्ध करताना अजिंक्यला फॉर्मही दाखवावा लागेल. सराव लढतीत त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे वैयक्तिक खेळ उंचावण्यासह सांघिक कामगिरी उंचावण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर आहे. सुरेश रैना तब्बल दहा महिन्यांनंतर खेळतोय. त्याने वनडे संघातील स्थान गमावले आहे. मात्र टी-२० संघात स्थान मिळवलेय. तरीही रैनाला आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागेल.
रहाणे आणि रैनाप्रमाणेच नवोदित रिषभ पंतच्या कामगिरीची उत्सुकता आहे. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या ज्युनियर वर्ल्डकपमध्ये उपविजेत्या भारताच्या संघात त्याचा समावेश होता. रणजी करंडक स्पर्धेतही सातत्य राखताना दिल्लीतर्फे खेळताना रिषभने महाराष्ट्राविरुद्ध त्रिशतकी तसेच झारखंडविरुद्ध शतक ठोकले. त्यामुळे निवडसमितीला त्याची दखल घ्यावी लागली. पंतचा टी-२० संघात समावेश आहे. वास्तविक पाहता रिषभ हा विकेटकिपिंगही करतो. मात्र दुस-या सराव लढतीसाठी स्पेशालिस्ट यष्टिरक्षक म्हणून इशान किशनचा समावेश करण्यात आला आहे. तोही ज्युनियर वल्र्डकपमध्ये खेळला आहे. दुस-या सराव लढतीत विजय शंकर, परवेझ रसूल, दीपक हुडा, शेल्डन जॅक्सन अनुभवी मध्यमगती गोलंदाज आर. विनय कुमार, अशोक डिंडा आणि प्रदीप संगवान तसेच डावखुरा फिरकीपटू शादाब नदीमचा समावेश आहे. या सर्वाना आपली क्षमता दाखवण्याची संधी आहे.कसोटी मालिका मोठय़ा फरकाने हरल्यानंतर इंग्लंडची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील पाहुण्यांनी पहिल्या सराव सामन्यात बाजी मारत आश्वासक सुरुवात केली. इंग्लंडचा झटपट संघ सर्वसमावेशक आहे. त्यामुळे भारताला चांगली चुरस मिळेल. दुसरा सराव सामनाही जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या निकालाचा मानसिकदृष्टय़ा चांगला परिणाम होऊ शकतो. गुरुवारी पाहुणा संघ ‘बेंचस्ट्रेंग्थ’ तपासून पाहील. त्यामुळे पहिल्या सामन्यात विश्रांती दिलेला अष्टपैलू बेन स्टोक्स, यष्टिरक्षक जॉनी बेअस्टरे, वेगवान गोलंदाज लियाम प्लंकेटला दुस-या सामन्यात संधी दिली जाईल. ज्यो रूट संघात दाखल झाल्यास तोही खेळण्याची शक्यता आहे. भारतातील खेळपट्टय़ांवर फिरकीपटू यशस्वी ठरतात. मात्र पहिल्या सराव लढतीत ऑफस्पिनर मोईन अली आणि अब्दुल रशिदला भारताच्या फलंदाजांनी सहज खेळून काढले. या स्पिन दुकलीला फॉर्म मिळवण्याची संधी आहे.
भारत ‘अ’ – अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिषभ पंत, सुरेश रैना, दीपक हुडा, ईशान किशन (यष्टिरक्षक), शेल्डन जॅक्सन, विजय शंकर, शादाब नदीम, परवेझ रसूल, आर. विनय कुमार, प्रदीप संगवान, अशोक डिंडा.
इंग्लंड – इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअस्टरे, जॅक बॉल, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, लियाम डावसन, अलेक्स हॅलेस, लियाम प्लंकेट, अदिल रशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स.
वेळ : दु. १.३० वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्सवर.