आसल ग्रामपंचायतीतील आसलवाडी पाणी योजना अद्याप अपूर्ण आहे, मात्र पाणी योजना बांधकामात गैरव्यवहार करणा-या कंत्राटदारावर आजपर्यंत जिल्हा परिषदेने कारवाई केलेली नाही.
नेरळ – रायगड जिल्हा परिषदेच्या पथदर्शी योजनेतून कर्जत तालुक्यात नळपाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या होत्या. यातील आसल ग्रामपंचायतीतील आसलवाडी पाणी योजना अद्याप अपूर्ण आहे, मात्र पाणी योजना बांधकामात गैरव्यवहार करणा-या कंत्राटदारावर आजपर्यंत जिल्हा परिषदेने कारवाई केलेली नाही.
पथदर्शी योजनेतून आसल ग्रामपंचायतीतील ५० घरांची वस्ती असलेल्या आसलवाडीसाठी पाणी योजना मंजूर झाली होती. मात्र आसलवाडी डोंगराळ भागात असल्याने पाणवठा असलेल्या ठिकाणी विहीर खोदून आदिवासी लोकांची तहान भागवण्यात येणार होती. साडेचार लाख रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद असलेल्या या योजनेसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने कंत्राटदारही नेमला होता. ग्रामस्थांनी कापुर्दी भागात असलेल्या जुन्या पाणवठय़ाच्या ठिकाणी विहीर खोदण्याची सूचना केली. पूर्वी तेथे मे महिन्यापर्यंत पाणी असायचे. त्यामुळे आदिवासी ग्रामस्थांनी तेथे विहिरीचे काम सुरू करण्यास परवानगी दिली, मात्र झटपट पैसे कमवण्याच्या उद्देशाने कंत्राटदाराने तेथे आदिवासी ग्रामस्थांचा विरोध असताना सुरुंग स्फोट केले. परिणामी येथील नसर्गिक झरे गायब झाले. त्यामुळे तोंडाशी असलेले पाणीही या आदिवासींना गमवावे लागले आहे.
दरम्यान, येथे थेंबभरसुद्धा पाणी मिळालेले नसताना, दोन फुटांचा खड्डाही खोदलेला नसताना व काहीही बांधकाम केलेले नसताना रायगड जिल्हा परिषदेने कर्जतमधील लघुपाटबंधारे कार्यालयाने दिलेल्या बिलाप्रमाणे तब्बल अडीच लाखांचे बिल अदा केले आहे. मात्र आजतागायत एक नवीन दगडही कंत्राटदाराने लावलेला नाही. या गरव्यवहार प्रकरणी अनेकदा चर्चा झाली, मात्र कोणताही अधिकारी किंवा कंत्राटदारावर जिल्हा परिषदेने कारवाई केलेली नाही. पाणी योजना पूर्ण होऊ शकली नसल्याने आसलवाडीतील महिलांना दूरवर जाऊन पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे येथील महिलांनी ही पाणी योजना पूर्ण होण्यासाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.
या प्रकरणी जिल्हा परिषद निर्णय घेईल. कंत्राटदारावरील कारवाईविषयी आपण काही सांगू शकत नाही. – एस. पी. गांगुर्डे, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता