कर्जत-नेरळवरील भिवपुरीजवळ असलेला आषाणे धबधबा ओसंडून वाहू लागल्याने पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे.
नेरळ – कर्जत-नेरळवरील भिवपुरीजवळ असलेला आषाणे धबधबा ओसंडून वाहू लागल्याने पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. दिवसेंदिवस या धबधब्यावर होणारी पर्यटकांची गर्दी पाहता ग्रामस्थांनी येथे पोलिसांच्या बंदोबस्ताची मागणी केली आहे.
मुंबई-पुण्यापासून जवळच असल्याने या धबधब्यावर दरवर्षी पर्यटक गर्दी करतात. विहंगम दृश्य आणि निसर्गरम्य उंच उंच डोंगरातून हा धबधबा खाली झेपावत असल्याने पर्यटकांची पहिली पसंती ठरला आहे. याशिवाय तब्बल दीड ते दोन किलोमीटपर्यंत खळाळणा-या ओहळातही पर्यटकांना यथोचित डुंबता येते. त्यामुळे मागील काही वर्षे हा धबधबा आकर्षण ठरत आहे.
दरम्यान, धबधब्यावर होणारी कॉलेज तरुण-तरुणींची गर्दी, मद्यप्राशन करून येणाऱ्यांचा वावर आणि त्यातून होणारी छेडछाड आणि भांडणांमुळे येथील ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. या गोष्टी टाळून केवळ पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा, यासाठी पोलिसांनी या धबधब्यावर बंदोबस्त ठेवावा, अशी मागणीही आषाणे ग्रामस्थांनी केली आहे.
याशिवाय धबधब्याजवळ पडलेल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिक कचरा याबाबतही येथील ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. परिसरात आजूबाजूला शेती असल्याने कधी कधी हा कचरा शेतातही टाकला जात असल्याने शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी या कच-याची विल्हेवाट लावता येईल, याबाबतही गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.