तब्बल सहा वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारताच्या दौ-यावर आलाय. तीन टी-२०, पाच लढतींची वनडे मालिका आणि त्यानंतर चार सामन्यांची कसोटी मालिका असा तब्बल ७२ दिवसांचा हा दौरा आहे. सव्वा दोन महिने चालणा-या या दौ-यात उभय संघांचा कस लागेल. मायदेशात खेळताना भारताने सातत्य राखले तरी यावेळचा प्रतिस्पर्धी तुल्यबळ आहे. दक्षिण आफ्रिका संघात कुठल्याही संघाविरुद्ध आणि कुठेही सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता आहे.
यापूर्वी २००९-१०मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतात पाऊल ठेवले होते. त्यावेळी दोन लढतींची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती. मात्र वनडेत यजमानांनी २-१ अशी निसटती का होईना, बाजी मारली. दरम्यानच्या कालावधीत भारताचा संघ दोनदा आफ्रिकेत गेला. २०१०-११ मधील तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
मात्र वनडे मालिकेत यजमान (३-२) सरस ठरले. मागील खेपेस (२०१३-१४) यजमानांनी कसोटी मालिकेत १-० आणि वनडे मालिकेत २-० असा विजय मिळवला होता. मागील तिन्ही कसोटी मालिका २, ३ आणि २ सामन्यांच्या होत्या. पाहुणा संघ भारतात प्रथमच चार सामन्यांची कसोटी मालिका खेळतोय. हल्ली सर्वच संघांच्या वाटयाला कसोटीच्या तुलनेत अधिकाधिक वनडे सामने येतात. त्यामुळे पाच लढतींची वनडे मालिका दमछाक करणारी नसेल. तीन लढतींच्या टी-२० मालिकेमुळे यावेळचा दौरा अधिक लांबला आहे, हे नक्की.
टी-२० मालिकांचा विचार करता गेल्या सात वर्षात भारत मायदेशात केवळ सात मालिका खेळला आहे. त्यातील चार दोन सामन्यांच्या होत्या. उर्वरित तीन एकमेव सामन्यांच्या होत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका ही तीन सामन्यांची आहे. म्हणजेच घरच्या मैदानावरील आजवरची सर्वात मोठी आहे.
२००७मधील पहिल्यावहिल्या टी-२० विश्वचषकाचा विजेता असला तरी मायदेशातील सात मालिकांमध्ये केवळ दोनदा भारताला जिंकता आले आहे. दोन लढतींच्या तीन मालिका १-१ अशा बरोबरीत सुटल्यात. २००७-०८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव टी-२० भारताने विजय मिळवला होता. त्यानंतर शेवटचा विजय आहे. २०१३-१४मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा आहे. दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेत श्रीलंका (२००९-१०) तसेच इंग्लंड (२०१२-१३) आणि पाकिस्तानविरुद्धची (२०१२-१३) मालिका बरोबरीत सुटली.
मात्र तीन वर्षापूर्वी (२०१२) न्यूझीलंडने दोन लढतींची मालिका १-० अशी जिंकली. त्यापूर्वी इंग्लंडविरुद्धही पराभूत व्हावे लागले होते. परदेशातील टी-२० मालिकांचा विचार करता बांगलादेशात (२०१३-१४) झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये माजी विजेत्यांचे काहीच चालले नाही. इंग्लंड दौ-यातील (२०१४) एकमेव टी-२०मध्ये पराभव पाहावा लागला. जुलैमधील झिम्बाब्वे दौ-यात पहिली लढत जिंकलेल्या भारताला मालिका विजयाची संधी होती. मात्र यजमानांनी पाहुण्यांना मालिका विजयापासून रोखले. ही मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
मायदेशातील वनडे मालिकांत यजमानांनी वर्चस्व राखले आहे. गेल्या दोन वर्षातील सहा मालिकांपैकी सलग पाच जिंकल्यात. महेंद्रसिंग धोनी आणि सहका-यांना मालिका विजयाचा ‘षटकार’ लगावण्याची संधी आहे. २०१२-१३मधील परंपरागत प्रतिस्पर्ध्याविरुद्धच्या निसटत्या पराभवानंतर इंग्लंड असो किंवा ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज असो किंवा श्रीलंकेला भारताला भारतात हरवता आलेले नाही. या वर्षात भारत तिस-यांदा पाच सामन्यांची मालिका खेळतोय. वेस्ट इंडिजविरुद्ध २-१ निसटता विजय मिळाला तरी श्रीलंकेचा ५-० असा धुव्वा उडवण्यात माजी जगज्जेत्यांना यश आले.
मागील दोन वर्षातील घरच्या आणि परदेशातील (होम आणि अवे) मालिकांचा विचार करता पाच जिंकल्या तरी सहांमध्ये पराभव पाहावा लागला. त्यात बांगलादेशात (२०१३-१४) आशिया चषकासह गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या तिरंगी मालिकेसह ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या वनडे विश्वचषकाचा समावेश आहे. यंदा मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील युवा संघाने झिम्बाब्वेला झिम्बाब्वेत हरवले तरी महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदाखाली प्रमुख संघ उतरवूनही बांगलादेशविरुद्ध पराभवाची नामुष्की ओढवली. वनडेप्रमाणे कसोटीतही भारताची कामगिरी संमिश्र आहे. ऑगस्टमध्ये श्रीलंकादहन करण्यात आल्याचा आनंद असला तरी गेल्या वर्षातील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौ-यात सपाटून मार खावा लागला. इंग्लंडविरुद्ध एक कसोटी जिंकता आली तरी ऑस्ट्रेलियात पराभवच वाटयाला आले. जूनमध्ये बांगलादेश दौ-यातील एकमेव कसोटीतही पावसाने विजयापासून रोखले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने अनुभवी आणि ‘स्टार’ क्रिकेटपटूंवर अधिक भर दिला आहे. वनडे आणि टी-२० संघांत मिळून १५पैकी १३ क्रिकेटपटू ‘तेच’ आहेत. म्हणजेच संदीप पाटील यांच्या निवड समितीने सीनियर आणि गेले अनेक महिने संघात असलेल्या क्रिकेटपटूंवर अधिक विश्वास दाखवला आहे. कसोटी संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे कायम आहे. वनडे आणि टी-२० मालिकांसाठी अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर विश्वास दाखवण्यात आला आहे.
धोनी आणि कोहलीसह शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायडू, स्टुअर्ट बिन्नी, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, मोहित शर्मा, अमित मिश्रा ‘कॉमन’ आहेत. वनडे संघात नवोदित अष्टपैलू गुरकीरत सिंग मान आणि मध्यमगती उमेश यादव आणि टी-२० संघात अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंग आणि कर्नाटकचा मध्यमगती श्रीनाथ अरविंद हेच अन्य क्रिकेटपटू आहेत. कसोटी संघाची अद्याप घोषणा करण्यात आली नसली तरी वनडे आणि टी-२० संघांतील १५ पैकी किमान १३ क्रिकेटपटू कसोटी संघात असतील, हे नव्याने सांगायला नको.
एका वेळी एका मालिकेचा याप्रमाणे भारताने प्रथम टी-२० त्यानंतर वनडे आणि शेवटी कसोटी मालिकेचा विचार करण्याचे ठरवले आहे. टी-२० मालिकेला फारसे महत्त्व नसले तरी वनडे मालिकेत प्रचंड चुरस अपेक्षित आहे. भारताकडे रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, सुरेश रैना आणि पस्तिशीत असूनही कर्णधार धोनी असे तडाखेबंद फलंदाज आहेत. मध्यमगती भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, उमेश यादव तसेच ऑफस्पिनर आर. अश्विन, अमित मिश्रा आणि अक्षर पटेलमुळे गोलंदाजीही मजबूत आहे.
स्टुअर्ट बिन्नी आणि नवोदित गुरकीरत सिंगमुळे चांगले अष्टपैलूही उपलब्ध आहेत. सीनियर क्रिकेटपटूंनी सातत्य राखल्यास भारताला मायदेशातील सलग सहावा विजय मिळवण्याची संधी आहे. मात्र एबी डेविलियर्स आणि सहकारीही तितकेच खमके आहेत. डेविलियर्ससह हशिम अमला, क्विंटन डी कॉक, जेपी दुमिनी, फाफ डु प्लेसिस, डेव्हिड मिलर असे मोठी खेळी करू शकणारे फलंदाज पाहुण्यांकडे आहेत.
अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि मॉर्नी मॉर्केलला ख्रिस मॉरिस, काईल अबॉट, नवोदित कॅगिसो रॅबाडाची साथ मिळाल्यास भारताच्या फलंदाजांना रोखणे, जड जाणार नाही. भारतातील फिरकीला अनुकूल खेळपट्टया पाहता दक्षिण आफ्रिकेने लेगब्रेक गुगली इम्रान ताहीरसह डावखुरे आरोन फँगिसो आणि रिली रॉसो असे तीन ‘स्पेशालिस्ट’ फिरकीपटू सोबत आणलेत. त्यांच्या जोडीला जेपी दुमिनी, डेव्हिड मिलर हे कामचलावू स्पिनर आहेत.
कसोटी क्रमवारीत दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानी आहे. भारत पाचव्या स्थानावर फेकला गेला आहे. दोघांमध्ये तब्बल २५ रेटिंग गुणांचा फरक आहे. वनडेत भारताचे रँकिंग मात्र वरचे आहे. महेंद्रसिंग धोनी आणि सहकारी दुस-या स्थानी (११५ गुण) आहेत. द. आफ्रिका मागोमाग आहे. उभय संघांमध्ये केवळ पाच रेटिंग गुणांचा फरक आहे. त्यामुळे दोन महिन्यांनी रँकिंगमध्ये बदल होऊ शकतो.
एकूणच रँकिंग कायम ठेवण्याच्या दृष्टीने तसेच अधिक वरचे स्थान मिळवण्याच्या दृष्टीने विद्यमान मालिकेला मोठे महत्त्व आहे. सहा वर्षानंतर भारतभूमीवर खेळताना कामगिरी उंचावण्याचे आव्हान प्रतिस्पध्र्यासमोर आहेच. मात्र घरच्या मैदानावर सातत्य राखताना भारतीयांचाही कस लागेल. सांघिक कामगिरी महत्त्वपूर्ण ठरणार असली तरी फलंदाज आणि फिरकीपटूंच्या कामगिरीवरच उभय संघांचे यशापयश अवलंबून असेल, हे नक्की.