राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘फोन करा आणि रक्त मिळवा’ (ब्लड ऑन कॉल) हा उपक्रम राज्यभर राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई- राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘फोन करा आणि रक्त मिळवा’ (ब्लड ऑन कॉल) हा उपक्रम राज्यभर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या या उपक्रमातील दुचाकींना आता रुग्णवाहिकेचा दर्जा दिला जाणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रुग्णांपर्यंत कमीत-कमी अध्र्या तासात रक्त पोहोचणार आहे.
आजही ग्रामीण भागात रक्तदानाचे प्रमाण हवे तेवढे वाढलेले नाही. परिणामी गरजेप्रसंगी रुग्णांसाठी रक्त उपलब्ध होत नाही. खासकरून अपघातग्रस्तांना रक्ताची गरज भासल्यास त्यांच्या नातेवाइकांना खासगी रक्तपेढय़ांमध्ये जावे लागते. या सगळ्या अडचणी पाहता आरोग्य विभागाने ‘फोन करा, रक्त मिळवा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत १०२ क्रमांकावर दूरध्वनी केल्यास सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांना काही मिनिटांतच रक्त उपलब्ध होणार आहे.
रक्ताच्या वाहतुकीसाठी आरोग्य विभागाने दुचाकी गाडय़ा खरेदी केल्या आहेत. या गाडय़ांना एक छोटीशी शीतपेटी बसवली जाणार आहे. त्यात ४ अंश सेल्सिअस तापमानात रक्त रुग्णांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. कमीत कमी अर्ध्या तासात रुग्णांपर्यंत दुचाकींच्या माध्यमातून रक्त पोहोचवले जाईल. वाहतूक कोंडीच्या वेळी या दुचाकींना अडथळा होऊ नये, यासाठी त्यांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या दुचाकींच्या मागील बाजूस विशेष दिवा बसवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडीप्रसंगी वाहतूक पोलिस या दुचाकींना मार्ग देण्यासाठी प्राधान्य देतील. त्यामुळे रुग्णांपर्यंत रक्त पोहोचण्यास आता विलंब होणार नाही.
ऑगस्टपासून मुंबईत जीवनअमृतसेवा उपक्रम
मंबईतही याच धर्तीवर ‘जीवन अमृतसेवा’ हा उपक्रम १ ऑगस्टपासून सुरू केला जाणार आहे. या उपक्रमामुळे मुंबईकरांनाही तातडीने रक्त उपलब्ध होऊन दिलासा मिळणार आहे. या उपक्रमाचा आढावा घेण्याबाबत नुकतीच आरोग्य विभागात बैठक झाली. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या अखत्यारीत येत असलेल्या जे. जे. रुग्णालयातील रक्तपेढीची क्षमता वाढवली जाणार आहे. रक्तक्षमता वाढवल्यानंतर तेथे रक्ताचे घटक वेगळे करण्यापासून विविध रक्तघटकांच्या निर्मितीचे कामही तेथे होईल. तसेच मुंबईतील अन्य चार ठिकाणी उच्च क्षमता असलेली रक्त साठवण केंद्रे सुरू केली जातील. तेथून रुग्णांना रक्तपुरवठा केला जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.