रॉय. हे नाव, एक कल्पना, एक संवाद, एक प्रवास, बरंच काही आणि हो एक जबरदस्त कंटाळा. इतका की हा चित्रपट पाहताना किती तरी वेळा डुलक्या लागतात. ‘रॉय’ हा दिग्दर्शक विक्रमजित सिंग याचा पहिलाच चित्रपट.
![रॉय दिग्दर्शक : विक्रजित सिंग कलाकार : अर्जुन रामपाल, रणवीर कपूर, जॅकलिन फर्नाडिस](http://prahaar.in/wp-content/uploads/2015/02/roy1.jpg)
दिग्दर्शक : विक्रजित सिंग
कलाकार : अर्जुन रामपाल, रणवीर कपूर, जॅकलिन फर्नाडिस
रॉय. हे नाव, एक कल्पना, एक संवाद, एक प्रवास, बरंच काही आणि हो एक जबरदस्त कंटाळा. इतका की हा चित्रपट पाहताना किती तरी वेळा डुलक्या लागतात. ‘रॉय’ हा दिग्दर्शक विक्रमजित सिंग याचा पहिलाच चित्रपट.
कधी कधी माणूस आपल्याच कल्पनेच्या व सादरीकरणाच्या इतका प्रेमात पडतो की त्याला काय करू व काय नको असं होऊन जातं. असंच काहीसं या ‘रॉय’च्या बाबतीत झालं आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहून आल्यावर आपल्याकडे केवळ मलेशिया पर्यटन विभागाचे बुकलेट पाहिल्याचाच काय तो आनंद राहतो.
‘रॉय’ची कथा आहे ती एका लेखकाची. हा लेखक चित्रपट दिग्दर्शकही असतो. तो एकाच चोराच्या कथानकावर चित्रपट करत असतो. त्याने त्या चोराला आपल्या वयाच्या सातव्या वर्षी पाहिलेलं असतं. त्यामुळे तो त्याच्या प्रेमात असतो. याच चोराच्या कथेचा भाग ३ असलेल्या ‘गन’या चित्रपटाच्या दरम्यान घडलेली कथा दाखवण्यात आली आहे, पण या तिस-या भागासाठीची कथा त्याच्याकडे तयार नसते.
त्याला एक निर्माता भेटतो व तो या चित्रपटावर काम करायला सुरुवात करतो. हा कबीर (अर्जुन रामपाल) मुलींच्या बाबतीतही फारच प्रसिद्ध असतो. (अशा प्रकारच्या वाक्यांसाठी काही वर्षापूर्वी बदनाम हा शब्द वापरत असत. आता ते कालबाह्य झालं आहे.) त्याचे आतापर्यंत बावीस ब्रेकअप झालेले असतात. तो त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा दुसरा भाग असतो. तर तो या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मलेशियाला जातो.
त्यामुळे प्रेक्षकांना आनंद मिळण्याची थोडी तरी सोय होते. तो मलेशियात पोहोचतो तरी त्याच्याकडे या चित्रपटाची संहिता तयार नसते. (कदाचित रॉय हा चित्रपटही याच पद्धतीने तयार करण्यात आला असावा) तिथे त्याला एक मुलगी भेटते. आयेशा अमीर (जॅकलिन फर्नाडिस) ही लंडनमधली चित्रपट दिग्दर्शिका असते. ती मलेशियावर आधारित चित्रपट बनवणार असते.
हे दोघे योगायोगाने एकाच हॉटेलमध्ये राहात असतात. त्यावेळी या दोघांच्या चित्रपटांचं चित्रीकरण सुरू असतं. त्याचा जरी अधिक तपशील मिळत नसला तरी त्यांचं प्रेमप्रकरण मात्र बहरून येतं. ‘रॉय’ म्हणजे या चित्रपटातला तो चोर (रणबीर कपूर) हादेखील तेव्हा मलेशियात असतो. तोही एका मुलीच्या प्रेमात पडतो. त्याला तिच्याकडचं एक किमती चित्र चोरायचं असतं. त्यानंतर तो ते चोरतोही. इकडे दोन्ही जोडय़ांच्या प्रेमप्रकरणात अनेक चढ-उतार येतात. कबीरचं चित्रीकरणही थांबतं. फार काही काही होतं. शेवटी प्रेक्षकांसाठी आनंदाची गोष्ट घडते, ती म्हणजे चित्रपट संपतो.
या चित्रपटात एक साधी कल्पना दिग्दर्शकाला वापरायची होती. ती म्हणजे एकाच वेळी एक लेखक व त्या लेखकाचं पात्रं हे कसं समांतर जीवन जगत असतं. या कथेत मोठी क्षमता होती. मात्र कमी वाचन व अभ्यास असणा-या उथळ माणसाने मांडलेली कथा असंच तिचं स्वरूप होऊन जातं.
त्यामुळे केवळ येता-जाता दारू पिणं व सिगारेट ओढणं, संबंध ठेवणं व पैशांच्या चुराडा करणं एवढंच चित्रपटसृष्टीचं स्वरूप या चित्रपटातून दिसून येतं. या चित्रपटाची मांडणी करताना एकाच वेळेस अनेक प्रकारच्या शैली वापरण्याच्या दिग्दर्शकाच्या हव्यासापोटी या चांगल्या कथेचं अगदी मातेरं झालं आहे. तो स्वत: अमेरिकेत राहून आला आहे.
त्यामुळे साहजिकच त्याने पाहिलेल्या अनेक पाश्चिमात्त्य चित्रपटांच्या मांडणीतल्या शैली त्याने वापरण्याचा प्रयत्न केला. त्यातून धड काहीच हाती लागत नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यावर कडी म्हणजे या चित्रपटात वेळोवेळी येणारी गाणी, ती का? त्याचं स्वरूप काय आहे, त्याचा या कथेच्या सादरीकरणात नेमका काय उपयोग आहे, याचाही काहीच अर्थबोध होत नाही.
क्लासिक चित्रपट करणे किंवा कलात्मक चित्रपट करणं हा काही खेळ नाही. इकडून तिकडून आणलेल्या कल्पनांच्या आधारावर हे घडून येत नाही. अशा प्रकारच्या चित्रपटांच्या पटकथेला मोठी तयारी लागते. प्रेक्षकांना जर काही कळू द्यायचं नसेल तर त्या कथानकाला एक वेग असावा लागतो. दोन्ही पात्रांमधली गुंतागुंत ही दाखवता येऊ शकते, मात्र तशी तयारी करावी लागते.
या सा-या गोष्टींपासून ‘रॉय’ हा कोसो दूर राहिलेला पाहायला मिळतो. त्यामुळे या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत वाया गेल्याचं दिसून येत आहे.
अभिनयाच्या बाबतीत सांगायचं तर केवळ दारू पिणं, नाचणं व सिगारेट ओढणं, चेहरा ओढल्यासारखं करणं या गोष्टींना जर अभिनय म्हणत असतील तर तो अर्जुनने चांगला केलाय. प्रत्येक तणावाच्या प्रसंगात ती सिगारेट त्याच्या मदतीला धावून आली आहे. म्हणजे ती पेटवताना खाली वाकावं लागतं, त्यामुळे चेह-यावर नेमके कोणते भाव येतात तेही लपून राहतं.
त्याच्या आयुष्यात येणा-या प्रत्येक प्रसंगातलं त्याचं वागणं हे त्याच्या पात्राच्या स्वभावाच्या विचित्र वाटतं. मुळात या चित्रपटातल्या कोणत्याही पात्रांना खास असं व्यक्तिमत्त्व नाही. ते कधी काय करतात व कधी काय करतील याचा काही एक नेम नाही. बरं हे एखाद्या योजनेच्या निमित्ताने सुरू आहे व नंतर त्यात काही बदल होणार आहे असंही नाही. त्यातल्या त्यात रणबीरने आपलं काम फारच मन लावून केलं आहे.
चित्रीकरण करताना कलाकारांकडून जे काम करवून घेतलं जातं ते नेमकं कुठे जोडायचं, याचा अधिकार हा दिग्दर्शकाकडे असल्याने त्याचा थेट दोष रणबीरकडे जात नसला तरी ही भूमिका स्वीकारण्याचा दोष शेवटी त्याच्याच माथी बसतो. जॅकलिन फर्नाडिसने आपल्या भूमिकेत चष्मा घालून थोडा बदल करायचा प्रयत्न केला आहे. त्यापेक्षा ती एका प्रसंगात उगाचच नाचायला लागते ते मात्र खटकतं.
या चित्रपटाच्या एकंदरीतच सा-या टीमवर्कमध्ये दोष आहे. म्हणजे एका बाजूला हा चित्रपट मलेशियात चित्रित केल्याचं कथानकातून दिसतं, पण यातलं एक गाणं जे मुळात मलेशियात घडतं ते कुठे तरी भारतात चित्रित केल्याचं दिसतं. म्हणजे या गाण्यात जी जमीन दाखवली आहे तिथे भारतात आढळणारे घाणेरडे व कसेही लावलेले पेव्हर ब्लॉक दिसून येतात. मलेशिया हा कितीही लहान देश असला तरी अशा प्रकारचे पेव्हर ब्लॉक ते लावत असतील हे मनाला पटत नाही. मेकअप असो की या चित्रपटासाठीच्या गाडय़ा असो. किंवा मग समुद्रात घडलेले प्रसंग असोत, सगळंच काही ना काही बिनसल्यासारखं झालं आहे. विक्रमजित सिंग याने हा केवळ स्वत:साठी तयार करण्यात आलेला चित्रपट आहे, त्यामुळे रॉय पाहण्याची राय काही देता येणार नाही.