पावसामुळे लांजा तालुक्यातील वेरळ घाटात निसरडय़ा रस्त्यावरून घसरून खासगी आरामबस दरडीवर आदळल्याने आरामबसमधील दोघे ठार झाले.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2014/11/Accident-1.jpg)
रत्नागिरी – गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या पावसामुळे लांजा तालुक्यातील वेरळ घाटात निसरडय़ा रस्त्यावरून घसरून खासगी आरामबस दरडीवर आदळल्याने आरामबसमधील दोघे ठार झाले.
दक्षिण रत्नागिरीतील राजापूर आणि लांजा तालुक्याला अवकाळी पावसाने चांगलाच दणका दिला. गुरुवारी सायंकाळी सोसाटय़ाच्या वा-यासह राजापूर व लांजा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसाचे आगमन होताच महावितरणची बत्ती गुल झाल्याने दोन्ही तालुके अंधारात बुडाले होते.
वेरळ घाटीत आदिनाथ ट्रॅव्हल्सची खासगी आरामबस पाचल ते मुंबई अशी जात असताना निसरडय़ा रस्त्यावरून घसरून दरडीवर आपटली. या दुर्घटनेत बसमधील दोघे जण बसखालीच अडकल्याने त्यांचा अपघातस्थळीच मृत्यू ओढावला. या वर्षीच्या हंगामापासून मान्सूनचा हंगाम अनिश्चित राहिला.
मान्सूनचा हंगाम संपल्यानंतरही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले होते. अवकाळीच्या दणक्याने या वर्षीचा हंगाम संकटात सापडला असताना आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या हजेरीने आंबा हंगाम अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास राजापूर आणि लांजा तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. राजापुरातील वरची पेठ आणि नवीन डेपो परिसरात प्रारंभी रिपरिप सुरुवात करणा-या पावसाने सोसाटय़ाच्या वा-यासह मुसळधार हजेरी लावली.
लांजातील वेरळ घाटीत पावसामुळे निसरडय़ा झालेल्या रस्त्यावर आरामबस घसरून दरडीवर आदळली. या घटनेत प्रवासी किरकोळ जखमी झाले. मुसळधार पाऊस सुरू होताच महावितरणची बत्तीही गुल झाल्याने दोन्ही तालुके अंधारात बुडाले होते.
सात वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस तासभर कोसळत होता. विजांच्या लखलखाट व ढगांच्या गडगडाटात पावसाने हजेरी लावल्याने दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थांची भंबेरी उडाली होती. अवकाळी पावसाच्या हजेरीने आंबा हंगाम पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.