दिवसेंदिवस वाढत्या तंत्रज्ञानाचा वापर रेल्वेकडून होत असल्याने आता तिकीट तपासणीसांच्या हातातील आरक्षण तक्ता कालबाह्य होणार आहे.
मुंबई – दिवसेंदिवस वाढत्या तंत्रज्ञानाचा वापर रेल्वेकडून होत असल्याने आता तिकीट तपासणीसांच्या हातातील आरक्षण तक्ता कालबाह्य होणार आहे.
पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्यांच्या गांडय़ांमध्ये आरक्षण यादीऐवजी तळहातावर मावेल एवढे छोटे यंत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात ‘परे’च्या टीसींकडे पीआरएस (प्रवासी आरक्षण सेवा)च्या अत्याधुनिक यंत्रणेकडून मिळणारी यादी यंत्रावर दिसणार आहे.
लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमध्ये गाडी सुटण्यापूर्वी साधारण दोन तास अगोदर प्रवासी यादीचा तक्ता तयार होतो. त्यात, आरक्षित तिकिटांची यादी दिली जाते. ही यादी डब्यांबाहेरही पाहायला मिळते. मात्र, पावसात या यादींप्रमाणे टीसींकडील मोठी कागदी यादी खराब होण्याची भीती असते. या यादीचा गोंधळ संपुष्टात आणण्यासाठी डिजिटल इंडियाअंतर्गत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
या नव्या तंत्रानुसार टीसींना नव्या मशीन्सवर प्रवाशांची यादी पाहता येईल. यादीत झालेला अंतिम बदलही त्यात दिसतील. त्यातच रिकाम्या जागांची माहिती भरून प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना तात्काळ सामावून घेण्याची माहितीही पुरवली जाऊ शकेल.
ही प्रणाली येत्या काही दिवसांत कार्यान्वित होणार आहे. त्यात, सर्वात प्रथम राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेससारख्या महत्त्वाच्या गाडय़ांमध्ये सुरुवात केली जाणार असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर अन्य सर्व मार्गावर या तंत्राचा अवलंब केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे.
पेपरलेस मोबाईल तिकिटांसाठी इस्रोतर्फे उपग्रहाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या रेल्वेमार्ग मोजणीचा फायदा यात होणार आहे. संपूर्ण मार्गाचे आरेखन या पद्धतीने झाल्याने जवळपास सर्वच ठिकाणी पीआरएसतर्फे तात्काळ माहितीची देवाण-घेवाण शक्य होणार आहे.