आम आदमी पार्टी महाराष्ट्रात सर्व ४८ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले.
अकोला- दिल्लीत चमत्कार घडवणा-या आम आदमी पार्टी अर्थात ‘आप’ने महाराष्ट्रात सर्वच्या सर्व ४८ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू असून राज्यात सर्व जागा लढवणार असल्याचे राज्य समन्वयक अंजली दमनिया यांनी बुधवारी रात्री उशीरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करुन ‘आप’ने बहुमतही सिद्ध केले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांमुळे आम आदमीकडे लोकांचा कल वाढत आहे. त्याचाच भाग म्हणून पक्षाकडे १५ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज मागवले असता आजमितीस ७३ हजार लोकांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी अर्ज केले आहेत, असे दमानिया यांनी सांगितले. तसेच इच्छुकांना उमेदवार म्हणून नावाची शिफारस करण्यासाठी किमान ६०० शिफारशी आवश्यक आहेत. असेही दमानिया यांनी स्पष्ट केले.
लोकसभा उमेदवारांच्या निवडीची पहिली फेरी वेबसाइटच्या माध्यमातून होणार आहे. www.aapmaharashtra.org या वेबसाइटवर ‘आप’ने अर्जाचा नमुना दिला आहे. इच्छुक उमेदवारांचे जे अर्ज येतील त्यांची छाननी करून वेबसाइटवर टाकण्यात येतील. भ्रष्टाचाराचे आरोप असल्यास त्वरीत अर्ज मागे घेण्यात येतील. मात्र आरोप खोटे सिद्ध झाल्यास त्या उमेदवाराचा पुन्हा विचार करण्याचे पक्षाने ठरवले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच दिवसेंदिवस पक्षाचे सदस्य वाढत आहेत. राज्यात ९,८४० सदस्य झाले असल्याचे दमानिया यांनी सांगितले.