नोव्हेंबर महिन्यात बुद्धिबळ जगज्जेतेपदासाठी विद्यमान जगज्जेता भारताचा विश्वनाथन आनंद नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन यांच्याशी लढणार आहे, त्यावेळी कार्लसनला आनंदने हरवल्यास तो क्रीडा जगतातला एक चमत्कार असेल. कारण या लढतीत कार्लसनचं पारडं सरळसरळ जड आहे.
१९५४मधील फुटबॉल वर्ल्डकपमध्ये हंगेरीचा संघ भलताच फॉर्मात होता. एकाहून एक तगडय़ा संघांना हरवत होता. वर्ल्डकप फायनलपर्यंत या संघानं सलग ३२ सामने जिंकले होते. इंग्लंडला त्यांच्याच देशात वेम्ब्ली मैदानावर ६-३ असं हरवल्यावर पुन्हा बुडापेस्टमध्ये त्या संघाला ७-१ असं तुडवून काढलं. ज्या (तत्कालीन) पश्चिम जर्मन संघाशी ते फायनलमध्ये खेळणार होते, त्या संघाला साखळी लढतीत त्यांनी ८-३ असं धुवून काढलं. त्यांचा जगद्विख्यात फुटबॉलपटू आणि कर्णधार फेरेन्क पुस्कास भलताच फॉर्मात होता. जर्मनीविरुद्धच्या लढतीत त्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं. त्यामुळे उपांत्यपूर्व आणि उपांत्य लढतींमध्ये खेळू शकला नाही. तरीही हंगेरीनं ब्राझीलला (आधीच्या १९५०मधील वर्ल्डकपचे उपविजेते) आणि उरुग्वेला (१९५०मधील वर्ल्डकपचे विजेते) ४-२ अशा समान फरकानं हरवून दाखवलं. त्यामुळे पश्चिम जर्मनीविरुद्ध अंतिम फेरीत सहज जिंकून हंगेरी जगज्जेते बनणार असाच सा-यांचा कयास होता. अंतिम सामन्यात पहिल्या आठ मिनिटांतच दोन गोलची आघाडी घेऊन हंगेरीनं आणखी एका मोठय़ा विजयाकडे वाटचाल सुरू केली होती. पण. पुढील अवघ्या दहा मिनिटांतच पश्चिम जर्मनीनं दोन गोल धडाधड झळकवत बरोबरी साधली. मग निर्धारित ९० मिनिटे संपण्यास अवघी सहा मिनिटं राहिली असताना पश्चिम जर्मनीनं तिसरा आणि अंतिम गोल झळकवला. स्वित्झर्लंडलडच्या बर्न शहरात त्या दिवशी चमत्कार घडला.
२५ जून १९८३ – मिरॅकल ऑफ लंडन
१९८३च्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजच्या संघानं सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. पहिल्या दोन वर्ल्डकपमध्ये अंतिम लढतींमध्ये त्यांच्यासमोर होते अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड. दोन्ही संघांची रया १९८३च्या वर्ल्डकपपर्यंत ब-यापैकी उतरली होती. त्यातल्या त्यात खतरनाक ठरू शकेल असा पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिजकडून उपांत्य फेरीतच पराभूत झाला होता. त्यामुळे अंतिम फेरीत भारतासारखा तुलनेनं अननुभवी आणि कमी प्रतिभावान संघ वेस्ट इंडिजसमोर उभा होता, त्यावेळी बहुतेक तज्ज्ञ आणि दर्दीमध्ये विंडीजच्या संभाव्य हॅटट्रिकचीच चर्चा होती. पहिली फलंदाजी करताना भारतीय संघ १८३ धावांमध्ये उखडला गेला, त्यावेळी तिसरं जगज्जेतेपद वेस्ट इंडिजपासून फार तर ४० षटकं दूर होतं! पण घडलं भलतंच. कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जिद्दीनं खेळला. वेस्ट इंडिजला १४० धावांत रोखून भारतानं त्यांची क्रिकेटमधली सद्दी संपवली ती कायमचीच!
११ फेब्रुवारी १९९० – मिरॅकल ऑफ टोक्यो
जागतिक हेवीवेट बॉक्सिंग चँपियन ‘आयर्न’ माइक टायसनला कोणू रोखू शकेल, असं वाटत नव्हतं. जेम्स ‘बस्टर’ डग्लस हा बॉक्सर त्याला आव्हान देण्यासाठी रिंगणात उतरला, त्यावेळी टायनचा रेकॉर्डच थक्क करणारा होता. कारण त्या लढतीपूर्वी टायसननं ३७पैकी ३७ लढती जिंकलेल्या होत्या. त्यांपैकी तब्बल ३३ नॉकआउट! म्हणजे ३३ प्रतिस्पध्र्यानी टायसनच्या ठोश्यांपुढे लोळण घेतली आणि काही वेळा तर त्यांचा जीव वाचवण्यासाठी रेफरीला लढत थांबवावी लागली होती! टायसननं संथ सुरुवात केली. आठव्या फेरीत टायसनच्या सुप्रसिद्ध उजव्या अपरकटनं डग्लसला हादरवलं. पण तो चिवटपणे लढत राहिला. मग दहाव्या राउंडमध्ये चमत्कार घडला. बस्टरच्या एका ठोशापुढे टायसन भुईसपाट झाला. तो उठूच शकला नाही.
नोव्हेंबर २०१३ – मिरॅकल ऑफ चेन्नई?
बुद्धिबळ जगज्जेतेपदासाठी विद्यमान जगज्जेता भारताचा विश्वनाथन आनंद आणि नॉर्वेचा आव्हानवीर मॅग्नस कार्लसन यांच्यात लढत होईल, त्यावेळी कार्लसनला आनंदनं हरवल्यास तोदेखील उपरोल्लेखित चमत्कारांच्या यादीत आणखी एक ठरू शकेल. आनंद २००७पासून जगज्जेता आहे. तब्बल पाच वेळा तो जगज्जेता ठरलाय. नॉक-आउट (२०००), टूर्नामेंट (२००७) आणि दीर्घ द्वंद्व (२००८, २०१० आणि २०१२) अशा तीन प्रकारांमध्ये जगज्जेतेपद पटकावणारा तो एकमेव बुद्धिबळपटू आहे आणि कदाचित त्याचा हा विक्रम अबाधित राहील अशीच चिन्हं आहेत. पण इतकी पार्श्वभूमी असूनही तो या लढतीसाठी फेवरिट नाही. उलट ‘डार्क हॉर्स’ आहे. कारणं अनेक. कार्लसनचं वय आहे २२ र्वष, तर आनंद आता ४१ वर्षाचा आहे. डिसेंबरमध्ये ४२चा होईल. बुद्धिबळातील दीर्घ डावांच्या प्रदीर्घ लढतीसाठी (एकूण १२ डाव आणि वेळ पडल्यास काही रॅपिड आणि ब्लिट्झ डाव) आवश्यक ऊर्जा आणि चिकाटी अर्थातच युवा कार्लसनकडे अधिक असेल. आनंदचे यापूर्वीचे (प्रदीर्घ लढतीतले) दोन प्रतिस्पर्धी त्याच्यापेक्षा लहान होते. तरीही रशियाचा व्लादिमीर क्रॅमनिक किंवा बल्गेरियाचा वेसेलिन टोपालोव यांच्यात आणि आनंदच्या वयात फार फरक नव्हता. तर गेल्या वर्षीचा त्याचा प्रतिस्पर्धी इस्रायलचा बोरिस गेलफँड आनंदपेक्षा दोन वर्षानी मोठा होता. आता कार्लसन आणि आनंद यांच्यात १९ वर्षाचा फरक आहे. हा फरक अंतिम समीकरणात निर्णायक ठरू शकतो.
रेटिंगमधील तफावत तर आणखी चिंताजनक आहे. कार्लसननं चार महिन्यांपूर्वीच गॅरी कास्पारॉवचा २८५२ रेटिंग गुणांचा विक्रम मागे टाकला. त्याचं सध्याचं रेटिंग आहे २८७०. आनंदचं सध्याचं रेटिंग आहे २७७५! तब्बल ९५ गुणांचा फरक. आनंदनं मार्च २०११मध्ये २८१७ रेटिंगपर्यंत मजल मारली होती. तो त्याचा वैयक्तिक विक्रम. कार्लसनचा वैयक्तिक विक्रम आहे २८७२ गुणांचा. सहसा २६०० किंवा २७०० पेक्षा अधिक एलो गुण असलेल्या बुद्धिबळपटूंच्या द्वंद्वात रेटिंगमधील फरक हा फारसा निर्णायक फॅक्टर ठरत नसला, तरी कार्लसनव्यतिरिक्त सध्या जगात केवळ एकच बुद्धिबळपटू (आर्मेनियाचा लेव्हॉन अरोनियान २८०१) २८०० एलो रेटिंगच्या वर आहे यातून कार्लसनचा झपाटा दिसून येतो. त्यामुळे आनंद आणि कार्लसन यांच्यातील रेटिंग फरक दुर्लक्षण्याइतका कमीदेखील नाही.
२००८मध्ये आनंदनं तिसऱ्यांदा जगज्जेतेपद पटकवलं. पण यानंतरच्या पाच वर्षामध्ये त्याला केवळ एक स्पर्धा जिंकता आलीये. याचं एक प्रमुख कारण म्हणजे या काळात त्याला तीन जगज्जेतेपदांच्या लढतीत खेळावं लागलं होतं. त्यामुळे काही वेळा तयारीच्या कारणास्तव तो स्पर्धेत खेळायचा नाही, तर काही वेळा प्रतिस्पध्र्याला डावपेच कळू नये यासाठी आनंदला वेगळी आणि त्यालाही फारशी परिचित नसलेली डावपेचं वापरावी लागायची. या भानगडीत त्याचा फॉर्म घसरला. त्याच दरम्यान कार्लसनचा उदय झाला हा योगायोग नाही. २००९पासून कार्लसननं तब्बल १५ स्पर्धा जिंकल्या आहेत. या २०११मध्ये त्याला माजी जगज्जेता गॅरी कास्पारॉवचं मार्गदशर्न लाभलं. त्यातून सध्याचा जबरदस्त फॉर्मातला कार्लसन घडला हाही योगायोग नाही.
रॅपिड किंवा ब्लिट्झ वगळता पारंपरिक प्रकारात दोघंही परस्परांशी १९ डाव खेळलेत. त्यात आनंदनं सहा, कार्लसननं तीन जिंकलेत, तर ११ डाव बरोबरीत सुटलेत. या दोघांमध्ये सुरुवातीला आनंद ६-० असा आघाडीवर होता. पण नंतरच्या लढतींमध्ये ११ डाव बरोबरीत सुटले, तर कार्लसननं तीन जिंकले. २०११पासून आनंद कार्लसनला हरवू शकलेला नाही. आणखी एका बाबतीत आनंद वरचढ ठरतो. कार्लसनला जगज्जेतेपदाच्या लढतीचा अनुभव अजिबात नाही. उलट तयारी, प्रत्यक्ष लढत सुरू झाल्यानंतरची तयारी आणि मानसिकता, प्रसंगी मागे पडल्यानंतरही हिंमत न हारता खेळत राहून प्रतिस्पध्र्याला गाठून नंतर मागे टाकणं या डावपेचांमध्ये आनंद वाकबगार आहे. जगज्जेतेपदाच्या लढतीचं स्वत:चं एक समीकरण असतं. त्याची जाण कार्लसनपेक्षा आनंदलाच अधिक आहे.
वरील शेवटचा फॅक्टर सोडल्यास बाकीचे कार्लसनच्या पारडय़ात वजन टाकणारे आहेत. त्यामुळेच ही लढत सुरू होण्यापूर्वी कागदावर काही निकषांवर एकतर्फी दिसते. आनंदच्या लाखो चाहत्यांचं (अस्मादिकांसकट) मन या लढतीचा एकतर्फीपणा मानायला तयार नाही. पण कार्लसनची ताकद दुर्लक्षिण्यासारखी नाही याचं भान राखावंच लागेल. त्यामुळेच बर्न, लंडन किंवा टोक्योप्रमाणे चेन्नईदेखील एक चमत्कार ठरू शकतो. तसं झाल्यास आनंदसाठी जणू फायनल फ्रंटियर पार केल्यासारखंच ठरेल.