सर्वाना घर देण्याचे महत्वाकांक्षी ध्येय २०२२ पर्यंत गाठण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.
मुंबई- सर्वाना घर देण्याचे महत्वाकांक्षी ध्येय २०२२ पर्यंत गाठण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. त्यादृष्टीने आदिवासींसाठीच्या २५ हजार घरांपैकी १० हजार घरे पूर्ण झाली आहेत. घर बांधणी अनुदान वाटपातील गैरव्यवहार रोखण्यासाठी ही रक्कम थेट बँकेत जमा करण्यात येणार आहे.
आज विविध वृत्त वाहिन्यांवरून ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा कार्यक्रम प्रसारित झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. ‘सर्वांसाठी परवडणारी घरे’ या विषयाचा दुसरा भाग रविवारी प्रसारित झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विविध भागातून आलेल्या जनतेच्या प्रश्नांना उत्तरे दिली. देविदास साळुंखे यांनी विचारलेल्या शबरी घरकुल योजनेविषयी प्रश्नास उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, शबरी घरकुल योजना ही अत्यंत महत्वाची योजना असून आदिवासी क्षेत्राअंतर्गत येणा-या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी आहे.
२५ हजार घरे तयार करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला असून त्यातील १० हजार घरांचे काम पूर्ण झाले आहे. मोठय़ा प्रमाणात आदिवासी समाजाला घरे मिळावी हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. आदिवासी समाजाचा एकही व्यक्ती आता बेघर राहणार नसल्याचे ते म्हणाले. ओंकार आगळे यांनी घरकुलासाठी मिळालेला निधी संगनमताने अन्य कामासाठी वापरला जाऊ नये यासाठी सरकारच्या काय उपाययोजना आहेत? हा प्रश्न विचारला होता.
त्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, घरकुल निधीत गैरव्यवहार थांबविण्यासाठी शासन प्रयत्नशील असून घरकुलाचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. तसेच होणारा खर्च कशा पद्धतीने होतो आहे हे पाहण्यासाठी आम्ही विशेष यंत्रणाही उभी करीत आहोत. या पद्धतीवर शासनाचे संपूर्ण नियंत्रण असल्याने गैरव्यवहारास आळा बसण्यासाठी नक्कीच मदत होईल, असेही ते म्हणाले.