छत्तीसगडमधील माओग्रस्त भागातील मतदारांनी धमक्यांना न घाबरता मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने निराश झालेल्या माओवाद्यांनी बैठका घेतल्याचे गुप्तचर विभागाने म्हटले आहे.
रायपूर- लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वच मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने अनेक ठिकाणी विक्रमी मतदानाची नोंद झाली. छत्तीसगडमधील माओग्रस्त भागात माओवाद्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. प्रत्यक्षात मात्र या भागातील मतदारांनी धमक्यांना न घाबरता मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने निराश झालेल्या माओवाद्यांनी बैठका घेतल्याचे गुप्तचर विभागाने म्हटले आहे.
विशेषतः दक्षिण छत्तीसगडमध्ये मतदानावर बहिष्कार टाकावा यासाठी माओवाद्यांनी आदिवासी मतदारांना धमक्या दिल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र येथील मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार यामुळे नक्षलवादी निराश झाले आहेत.
माओवाद्यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करूनही अनेक आदिवासी नागरिकांनी न घाबरता आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे माओवाद्यांच्या काही प्रमुख नेत्यांनी दंडकारण्य या माओग्रस्त भागात नुकतीच बैठक घेतल्याची माहिती गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी सांगितले. बस्तर लोकसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर बस्तर, दंतेवाडा, कोंडागाव आणि नारायणपूर येथेही माओवाद्यांच्या नेत्यांनी आदिवासींसोबत बैठका घेतल्याचेही गुप्तचर विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.
दरम्यान, या बैठकांमागील कारणे शोधण्यासाठी पोलिस अत्यंत दुर्गम भागात जाऊ शकले नाहीत. मात्र खब-यांनी दिलेल्या माहितीनुसार विविध भागात किती मतदान झाले याचा आढावा घेण्यासाठी माओवाद्यांनी बैठकांचे सत्र सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदान प्रक्रियेत सहभाग का घेतला असा सवाल माओवाद्यांकडून आदिवासी नागरिकांना केला जात आहे. मतदानाची टक्केवारी ज्या क्षेत्रात जास्त झाली आहे, तेथे माओवाद्यांनी पुन्हा लक्ष केंद्रित करून लोकांचा विश्वास मिळवावा, असे आदेश प्रतिबंधित माओवादी गटाने दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रतिसादामुळे माओवादी यापूर्वीच निराश झाले आहेत. त्यावर लोकसभा निवडणुकीतही आदिवासींनी सहभाग घेतल्यामुळे माओवाद्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
बस्तर आणि कोंडागाव या ठिकाणी ५९.४० आणि ७०.२९ टक्के मतदान झाले आहे. २००९च्या लोकसभा निवडणुकीत येथे ४७.३३ आणि ५७.२० टक्के मतदान झाले होते.