मागील तीन वर्षापासून राज्यातील अनेक भागांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
अकोला- मागील तीन वर्षापासून राज्यातील अनेक भागांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत.
या शेतक-यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचा तसेच संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यांना आधार देण्यासाठी अकोल्यातील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे.
या महाविद्यालयाने आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांचे पदवीपर्यंतचे शिक्षण, निवास व भोजनाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला असून, त्यांना रोजगाराभिमुख शिक्षणही मोफत देण्यात येणार आहे. शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांचा शिक्षण, निवास आणि भोजनाचा खर्च उचलण्याचा प्रस्ताव प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचा-यांपुढे ठेवला.
सर्वानीच सहमती दर्शवल्यानंतर ‘शिवाजी’ने हा उपक्रम सुरू केला आहे. या शैक्षणिक सत्रात अशा सात मुली व पाच मुलांना महाविद्यालयात प्रवेश दिला आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहात मुलींच्या निवासाची व्यवस्था करण्यात येत असून, शिक्षणाचा खर्च महाविद्यालयाने, तर भोजनाचा खर्च प्राचार्य व प्राध्यापकांनी उचलला आहे.