खिशात पैसे खुळखुळणा-या तरुणांभोवती तंबाखू, सिगारेट अशा प्रकारच्या व्यसनांचा फास कायम असलेला दिसतो. त्यामुळे कॅन्सर, मानसिक आजार आणि वंध्यत्व या गंभीर आजारांची टांगती तलवार या व्यसनाधीन तरुणांवर कायम असल्याचे आतापर्यंत नेहमीच दिसून येते. व्यसनाधीनतेच्या विळख्यापासून सुटका मिळावी, म्हणून सरकार आपल्या परिने गेली अनेक वष्रे त्यावर उपाययोजना शोधत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी या पदार्थाच्या विक्रीवर बंदी आहे. परंतु हा तात्पुरता उपाय झाला. आता असे तात्पुरते उपाय शोधत बसण्यापेक्षा या पदार्थाच्या विक्रीवर सरकारने ‘कायमची बंदी’ आणणेच अधिक हितावह ठरेल..
काही गोष्टींवर सुरुवातीलाच ताबा मिळवला तर त्या गोष्टी थांबवणे शक्य असते. एकदा वेळ निघून गेली की मग त्यावर ताबा मिळवणे बरेच वेळा कठीण जाते. व्यसनाबाबतही अगदी असेच म्हणता येईल.
एखादी गोष्ट वारंवार आपण करत राहिलो की मग त्याची आपल्याला सवय होते आणि मग त्या सवयीचे व्यसनात रूपांतर होते. तेव्हा सुरुवातीलाच कोणत्याही चुकीच्या सवयीवर नियंत्रण ठेवले, तर पुढे होणा-या त्रासापासून वाचता येऊ शकते.
तंबाखूचे व्यसनही त्यापैकीच एक आहे. तंबाखू खाऊन नंतर पुढील आयुष्यात कॅन्सरसारख्या भयंकर रोगाशी लढण्यापेक्षा तो न खाणे केव्हाही चांगले.
अनेकदा गंमत म्हणून केलेल्या एखाद्या कृतीचे नंतर सवयीत रूपांतर होऊन, त्याचे व्यसन कधी लागते हेही कळत नाही. तारुण्यात अशी अनेक व्यसने गमतीजमतीच्या रूपाने अनेकांच्या आयुष्यात येत असतात आणि त्यातूनच मग अनेक तरुण या भयंकर व्यसनांच्या अधीन होतात. खिशात पैसे खुळखुळणा-या तरुणांच्या भोवती व्यसनांचा फास कायम स्वरूपी दिसतो. मग तो तरुण कोणत्याही वर्गातला असो.
समाजात दारू, सिगारेट, तंबाखू किंवा गुटखा या घातक गोष्टींचे व्यसन लागलेल्या अनेक व्यक्ती पाहायला मिळतात. ही व्यसने जडलेला माणूस आतून पोकळ होऊ लागतो, परिणामी अनेक वेळा त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन या व्यक्तींना अनेक भयंकर असाध्य आजारांना सामोरे जावे लागते. अशा व्यसनांमुळे शरीरावर तर अपायकारक परिणाम होतातच, शिवाय कौटुंबिक आणि सामाजिक समस्या निर्माण होतात. स्वत:चे हाल, घरच्यांचे हाल या सगळया गोष्टींना व्यसनाधीन व्यक्तींना सामोरे जावे लागते.
भारतासारख्या देशात तंबाखूचे सेवन हा एक गंभीर आरोग्यविषयक प्रश्न झालेला आहे. तंबाखूपासून बनवलेली विडी ओढणे, तंबाखूपासून बनवलेली मशेरी लावणे, सिगारेट पिणे, तंबाखूचा वापर करून बनवलेले पान खाने हे सारे गंभीर प्रकार इथे दिसून येतात.
कमालीची गोष्ट अशी की तंबाखू, सिगारेट किंवा गुटखा यांच्या अतिसेवनामुळे कॅन्सर किंवा त्यासारख्या अनेक भयंकर रोगाला सामोरे जावे लागते हे माहीत असतानाही अनेक लोक या व्यसनाला बळी पडतात ही गोष्ट मनाला ब-याच वेळा खटकत राहते. ‘तंबाखू खाणे आरोग्यासाठी धोकायदायक आहे,’ असे तंबाखूच्या पाकिटावरही अगदी ठळक अक्षरात लिहिलेले असते. सिगारेटच्या पाकिटावरही तशा प्रकारची सूचना छापील असते, पण तरीही अशा जीव वाचवणा-या अतिमहत्त्वाच्या सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. असे का?
तंबाखूमधील निकोटीन खूपच घातक व मारक असते. तंबाखू मग तो खाण्याचा असो की, विडी सिगारेटमधून ओढण्याचा यात निकोटीनचे हे अंत्यत घातक, मारक रसायन असते, जे तोंडापासून ते लहानमोठया आतडयांपर्यंत कॅन्सरचे कारण बनते. हे सगळे समोर असताना अनेक जण अजूनही तंबाखूच्या आहारी जाताना दिसतात.
जगभरात दरवर्षी सात कोटींहून अधिक नागरिक तंबाखूसेवनामुळे होणा-या रोगांमुळे मृत्युमुखी पडतात. यापैकी एकटया भारतात तीन चतुर्थाश मृत्यू होत असून, लाखो लोक अद्यापही त्याचे दुष्परिणाम भोगत आहेत. जगभरात तंबाखूमुळे सर्वाधिक म्हणजे ८५ टक्के मृत्यू दक्षिण आशियात होतात. यापैकी ७५ टक्के मृत्यू एकटया भारतात होतात.
जगभरातील ११५ देशांमध्ये तंबाखूचे सेवन केले जाते. तंबाखूमुळे एकूण ११३ रोग होत असल्याचे निदान झाले आहे. तंबाखूमुळे कॅन्सर आणि हृदयरोग बळावत असल्याचे अनेक डॉक्टरांचे म्हणणे आहे. असे असतानाही आजही या व्यसनांना अनेक तरुण बळी पडताना दिसतात.
अनेकदा सार्वजनिक ठिकाणी विडी, सिगारेट, गुटखा अशा पदार्थावर विक्रीसाठी बंदी आणल्यामुळे या व्यसनांचे प्रमाण तात्पुरते कमी होताना दिसते. आज राज्य सरकारने गुटखा बंदी केलेली आहे. पण तरीही अजून सर्रासपणे छुप्या पद्धतीने राज्यात गुटखा विक्री चालूच आहे.
आज अनेक रेल्वे स्टेशन्स, बार, शाळा यांच्या बाहेर अगदी सर्रासपणे ‘नेहमीच्या गिऱ्हाईकाला’ गुटखा विक्री होत असल्याचे आढळते. तेव्हा सरकारने या पदार्थावर कायमची बंदी आणण्याची आवश्यकता आहे, असेच मत सर्वसामान्यांतून नेहमी व्यक्त होताना दिसते.
व्यसन कोणतेही असो, त्याचा आपल्या शरीरासह मनावर विपरीत परीणाम झाल्याशिवाय राहात नाही. कोणतीही नशा केल्याने त्याचे गंभीर परिणाम कालांतराने भोगावेच लागतात. तंबाखू किंवा विडी ओढणे म्हणजे मरणाला आमंत्रण देणे होय. अखेरीस एकच सांगू शकतो की माणसाने ठरवले तर तो काहीही करू शकतो, हे अनेक वेळा सिद्धही झालेले आहे. पण त्यासाठी मनाची जबरदस्त तयारी असणे आवश्यक असते. तंबाखूचे व्यसन सोडणे हे त्याहून काही वेगळे नाही.
कोणतेही व्यसन सोडणे हे मनाच्या खंबीरतेवर अवलंबून असते आणि ती खंबीरता मिळवण्याकरिता मनाचा निश्चय महत्त्वाचा असावा लागतो. तंबाखू खाण्याची सवय सोडण्यासाठी मनाचा निर्धार पक्का करा. तंबाखू स्वत: खाऊ नका व इतरांनाही खाऊ देऊ नका, विडी, सिगारेट ओढणा-यांच्या संपर्कात राहू नका. योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या सवयींचा इतरांवर परिणाम होतो हे कदापिही विसरू नका. तेव्हा आजपासून संकल्प करू या की अशा प्रकारच्या व्यसनांना आपण किंवा आपल्या मित्रपरिवारापैकी कोणी बळी पडणार नाही.