गावात दुष्काळ पडल्याने मुंबईत जाऊन काहीतरी काम मिळेल आणि कुटुंबाची गुजराणही होईल, या विचाराने लातूरहून मुंबईत विस्थापित झालेल्या वाघमारे कुटुंबावर सोमवारी दु:खाचा मोठा डोंगर कोसळला.
ठाणे- गावात दुष्काळ पडल्याने मुंबईत जाऊन काहीतरी काम मिळेल आणि कुटुंबाची गुजराणही होईल, या विचाराने लातूरहून मुंबईत विस्थापित झालेल्या वाघमारे कुटुंबावर सोमवारी दु:खाचा मोठा डोंगर कोसळला. ज्या पाण्याच्या शोधत हे कुटुंब लातूरहून ठाण्यात वास्तव्यास आले होते, त्याच पाण्यात पडून त्यांच्या एक वर्षाच्याही नसलेल्या चिमुकलीचा करुण अंत झाला.
लातूरच्या ग्रामीण भागातील अहमदपूर गावात राहणाऱ्या दयानंद वाघमारे यांनी गावाकडे दुष्काळ पडल्याने एक महिन्यापूर्वी ठाणे शहरात येऊन आसरा घेतला होता. ठाण्याच्या वर्तकनगर भागातील भीमनगर परिसरात एका छोटय़ाशा झोपडीत ते पत्नी आणि दोन मुलींसह राहत होते.
ठाण्यात छोटी-मोठी कामे करून ते कुटुंबाची गुजराण करत होते. मात्र सोमवार त्यांच्यासाठी काळा दिवस ठरला. सोमवारी कधी नव्हे, ते वाघमारे यांच्या घरी भरपूर पाणी आले. त्यामुळे वाघमारे यांची पत्नी शांताबाई यांनी बदल्या, टब, डब्बे अशा मिळेल त्या साधनांमध्ये पाणी भरून ठेवले आणि ११.३० च्या सुमारास त्या अंघोळीला गेल्या.
यावेळी त्यांच्या दोन्ही मुली झोपल्या होत्या. मात्र त्या अंघोळ करून बाहेर येताच त्यांची लहान मुलगी परी त्यांना एका पाण्याच्या टबमध्ये उलटी निपचित पडलेली दिसली. यावर धास्तावलेल्या शांताबाई यांनी त्वरित तिला बाहेर काढून तिचे पोट दाबले. यावेळी परीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांनी तिला तातडीने ठाणे सिव्हिल रुग्णालयात नेले.
मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने वाघमारे यांच्यावर आभाळच कोसळले आहे. सोमवारी ही घटना घडल्यानंतर मंगळवारी वाघमारे कुटुंबाने पुन्हा गावची वाट धरली आहे. दयानंद यांना संपर्क साधला असता आपण परिवारासह ठाणे सोडून लातूर येथे परत चालल्याचे त्यांनी सांगितले.
मंगळवारी होता परीचा वाढदिवस
दरम्यान, वाघमारे कुटुंबाचे शेंडेफळ असलेल्या परीचा मंगळवारी पहिला वाढदिवस होता. यासाठी वाघमारे कुटुंबाने तयारीही केली होती. मात्र वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच परीने दुर्दैवीरीत्या या जगाचा निरोप घेतला.
परीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर वाघमारे हे आपल्या मूळ गावी परतणार होते. मात्र या घटनेनंतर त्यांनी ताबडतोब आपल्या मूळ गावाची वाट धरली. या घटनेने ठाणेकरही हेलावून गेले आहेत.