कर्नाटकातील ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांची हत्या याचा साहित्य अकादमीने कुठलाही निषेध न केल्याच्या निषेधार्थ सध्या साहित्यिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
नवी दिल्ली- देशभरात सध्या गाजत असलेले दादरी प्रकरण आणि त्यापूर्वी झालेली कर्नाटकातील ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांची हत्या याचा साहित्य अकादमीने कुठलाही निषेध न केल्याच्या निषेधार्थ सध्या साहित्यिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
देशातील या धार्मिक हिंसाचाराचा आणि देशातील गढूळ झालेल्या वातावरणाचा निषेध करण्यासाठी सात साहित्यिकांनी आपले साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी साहित्य अकादमीला कळवले असून लवकरच पुरस्कार आणि त्यांची रक्कमही परत असणार असल्याचे या साहित्यिकांनी सांगितले.
देशात सध्या मोठया प्रमाणावर धार्मिक हिंसाचार माजला असून देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. शिवाय लेखक व साहित्यिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही बंधने येत असून साहित्य अकादमी मात्र याबाबत काहीही बोलण्यास तयार नाही. याचाच निषेध करण्यासाठी काश्मिरी लेखक गुलाम नबी खयाल, कन्नड लेखक व भाषांतरकार श्रीनाथ डी. एन., पंजाबी लेखक वर्यम सिंग संधू, कन्नड भाषांतरकार जी. एन.
रंगनाथ राव, हिंदी लेखक मंगलेश डबराल, लेखक राजेश जोशी व गुजराथी लेखक गणेश देवी यांनी आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर साहित्य अकादमीच्या या मौनामुळे नयनतारा सेहगल आणि अशोक वाजपेयी यांनी याआधीच आपला पुरस्कार परत केला आहे.
शिवाय ज्येष्ठ रंगभूमी कलाकार माया राव यांनीही आपला संगीत नाटक अकादमी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात सध्या प्रचंड असहिष्णुता पसरली असून या सगळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, मात्र ते तसे करताना दिसत नाहीत, अशी नाराजी राव यांनी अकादमीला पुरस्कार परत करण्यासाठी लिहिलेल्या पत्रात व्यक्त केले.
परिणामी देशातील या वाढत्या हिंसाचाराच्या घटनांमुळे साहित्यिकांमध्ये असुरक्षिततेची आणि आपल्याला कुणीही वाली नसल्याची भावना निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता देशातील साहित्यिकांच्या या भूमिकेनंतर तरी पंतप्रधान मोदी देशातील परिस्थिती सलोख्याची ठेवण्यासाठी काही करतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.