राजकारण किती निसरडे असू शकते, त्याचा प्रत्यय चिन्नम्मा ऊर्फ शशिकला मॅडम यांना आलेला आहे. सहा दिवसांपूर्वी तामिळनाडू विधानमंडळ द्रमुक पक्षाच्या आमदारांची बैठक होते, त्या बैठकीत एकमताने तामिळनाडू विधानसभेच्या नेतेपदी चिन्नम्माची निवड होते. हा ठराव मंजूर होताना मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम नेतपदी चिन्नम्माचे नाव सुचवतात. उपमुख्यमंत्री अनुमोदन देतात. लगेच मुख्यमंत्री राजभवनावर जातात, मुख्यमंत्रीपदाचा आपला राजीनामा सादर करतात. चिन्नम्मा खुशीत असते. झाले! आपले स्वप्न पूर्ण झाले!
दाक्षिणात्यांचा ज्योतिषावर फार विश्वास. मग तमाम ज्योतिषांची चिन्नम्माच्या घरी गर्दी होते. शपथ कधी घ्यायची, कोणता वेळ आणि कोणता मुहूर्त, कोणती तारीख.. चिन्नम्माच्या घरातील तिरूपती बालाजीची आरती होते. तामिळनाडूच्या सर्व वाहिन्यांवर हे सगळे साग्रसंगीत थेट प्रक्षेपण केले जाते. चिन्नम्माच्या बंगल्यावर रीघ लागते. त्यांना जेवण दिले जाते. संपूर्ण बंगला सजवला जातो, रोषणाई होते आणि ४८ तासांनी आता मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायची असे ठरवून चिन्नम्माच्या बंगल्यावर दिवाळी साजरी होते..
देशातील सर्व वाहिन्या तामिळनाडू विधानमंडळ काँग्रेस पक्षातील या अतिशय शांततेच्या मार्गाने झालेल्या सत्ताबदलाचे एवढे मोठे कौतुक करतात की, जगातील ही आदर्श अशी सत्ताबदल पद्धती, कोणाचा विरोध नाही, कुठे गटबाजी नाही, मुख्यमंत्रीपदावर बसलेली व्यक्ती स्वखुशीने सत्ता सोडायला तयार होते. हे सगळे एक विलक्षण चित्र तामिळनाडूमध्ये केवळ ४८ तास टिकले. या ४८ तासांत काय काड्या फिरल्या, कशा राजकीय सोंगट्या खेळल्या गेल्या आणि राजीनामा दिलेले मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांचे निवेदन आले.. त्यांनी चिन्नम्माच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध केला. मग चिन्नम्माने त्यांना पक्षातून काढून टाकले. २४ तास घातलेल्या रांगोळीत फसकन पाय मारावा आणि सगळी रांगोळी उद्ध्वस्त व्हावी तसे चिन्नम्माच्या बाबतीत घडले. दिल्लीहून काही काड्या फिरल्या असे म्हणतात. चिन्नम्माला शपथ दिली जाऊ नये म्हणून तामिळनाडूचे प्रभारी राज्यपाल असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आपला मुक्काम मुंबईतच ठेवला. विधिमंडळ द्रमुक पक्षाचा ठराव एकमताने झाल्यानंतर आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा राजीनामा आल्यानंतर राहिला होता फक्त शपथविधी सोपास्कार. पण काहीतरी कुठून तरी चाव्या फिरल्या एवढे नक्की आणि चिन्नम्मांचे ग्रहही फिरले. हे सगळे विधिलिखित असावे, असेही म्हटले जाते. त्याप्रमाणेच झाले. चार वर्षापूर्वी दाखल झालेला बेहिशेबी संपत्तीचा सर्वोच्च न्यायालयातील खटला एकदम समोर आला आणि अवघ्या आठ मिनिटांत निकाल होऊन मुख्यमंत्रीपदाच्या शपथेवेळी कोणती साडी नेसू, अशा विचारात असलेल्या चिन्नम्माची एकदम मस्तकात हातोडा मारल्यासारखी अवस्था झाली. तब्बल चार वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा, दहा कोटींचा दंड, सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढवायला बंदी आणि दहा वर्षे कोणत्याही सार्वजनिक कामापासून त्यांना दूर ठेवण्याचा आदेश अशी ही महाभयंकर शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने सुनावली. आठ मिनिटांत निर्णय झाला. चिन्नम्माच्या घरावर आठ मिनिटांत आभाळ कोसळले. होत्याचे नव्हते झाले म्हणतात. चिन्नम्माच्या डोळय़ांतून अश्रूच्या धारा लागल्या. काय ठरवले होते आणि काय झाले? तामिळनाडूच्या कडक उन्हात एखाद्या पांथस्थाने सावलीसाठी एखाद्या वृक्षाखाली उभे राहावे आणि तो वृक्षच त्याच्या अंगावर कोसळावा किंवा देवाच्या पायापाशी आराधना करायला जावे आणि ते मंदिरच अंगावर कोसळावे.. अशी जी काही विचित्र परिस्थिती होईल, तशी चिन्नम्माची अतिशय बिकट परिस्थिती झाली. निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा, अपिल तरी कुठे करणार? आणि अपिल करतानाही शिक्षेमध्ये सूट मिळालेली नाही. सात जणांच्या बेंचकडे चिन्नम्माला अपिल करायची जी परवानगी मिळालेली आहे, त्या काळात तुरुंगातून मोकळीक नाही. त्यामुळे तुरुंगात राहूनच आता चिन्नम्माला अपिल करून आपली कायदेशीर लढाई लढावी लागेल.
राजकारण निसरडे असते असे म्हटल जाते.. राजकीय नेत्यांच्या हातात सत्ता असेपर्यंत त्यांच्याभोवती मुंगळय़ासारखी माणसं त्याची भलामण करत जमा झालेली असतात. एकदा का सत्तेपासून तो नेता दूर झाला की, कोणी म्हणता कोणीही टिकत नाही. जगाच्या इतिहासात ही उदाहरणे काही कमी नाहीत. महाराष्ट्रात बॅरिस्टर अंतुले हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. बॅरिस्टर अंतुले यांच्यामागे आम्ही कणखरपणे उभे आहोत, असे विधानमंडळ काँग्रेस पक्षाने एकमुखी सांगितले होते. १२ जानेवारी १९८२ला न्यायमूर्ती लँटिन यांनी बॅरिस्टर अंतुले यांच्यावर ठपका ठेवला. मात्र सगळे मी मी म्हणणारे आमदार असे काही झटकण पळून गेले की, ती लढाई पुढची २० वर्षे अंतुले यांना एकाकी लढावी लागली. वेळ, पैसा, बदनामी आणि कुटुंबातील मुलांचा मानसिक कोंडमारा, असे सगळे सहन करून बॅरिस्टर अंतुले आपला खटला लढले. २० वर्षानी त्यांच्या बाजूंनी निकाल लागला. पण आर्थिकदृष्टय़ा ते पिचून गेले होते. राजकारणात पुन्हा तेजतर्रार होऊन उभे राहण्याएवढे त्यांच्याजवळ वयही राहिले नव्हते आणि कर्तृत्ववान नेतृत्वाला अपयश आले. राजकारण मोठे विचित्रही आहे आणि घाणेरडेही आहे. सत्ता ही क्षणभंगूर आहे आणि विश्वस्त म्हणून ती सांभाळली नाही तर आपलेच लोक आपल्याला कसे अडचणीत आणतात याची अनेक उदाहरणे जगात आहेत. सत्ताधारी झाल्याने आपल्या नातेवाइकाला खडय़ासारखे दूर ठेवले पाहिजे, हा पहिला मंत्र ज्यांना कळला तो बचावला.
चिन्नम्माची कहाणी आणखी वेगळी आहे. ती सत्तेत कधीही नव्हती. ना मंत्री होती, ना मुख्यमंत्री होती. पण आपली प्रिय मैत्रीण जयललिता यांच्या सगळय़ा पापात ती वाटेकरी होती, असा कोर्टाचा निष्कर्ष आहे. पण गंमत अशी आहे की, बेहिशेबी संपत्तीच्या आरोपाखाली त्यावेळच्या मुख्यमंत्री जयललिता यांना तुरुंगवास झाला. ही संपत्ती जमवण्याच्या कट-कारस्थानात त्यांची सख्खी मैत्रीण म्हणून चिन्नम्माचा सहभाग होता. याकरिता चिन्नम्मालाही तेव्हा शिक्षा झाली होती. जयललितांना उच्च न्यायालयाने निर्दोष सोडून दिले. तामिळनाडूच्या निवडणुकीत त्यांनी आपला पक्ष पुन्हा सत्तेवर आणला. खुद्द पंतप्रधान तामिळनाडूत ठाण मांडून बसले होते, पण अम्मांनी भाजपाला आस्मान दाखवले. त्या पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. शशिकला त्यांच्याच घरात राहात होत्या. त्यांच्यावरील खटला सर्वोच्च न्यायालयात होता. त्या मुख्यमंत्री होत आहेत, असे स्पष्ट झाल्याबरोबर एकदम खटल्याचा निकालच लागला आणि त्यांना आता जेलची हवा खावी लागली. सत्तेवर नसताना बेहिशोबी संपत्ती जमवल्याचा आरोप सिद्ध होऊन एवढी जबरदस्त शिक्षा झालेले जगातील हे पहिले उदाहरण आहे. सत्तेवर असताना पदे सोडावी लागली. खटले दाखल झाले. त्यात दोषी ठरलेल्यांना तुरुंगात जावे लागले. त्याची उदाहरणे सर्वासमोर आहेत. स्पेक्ट्रम घोटाळय़ातील मंत्री ए. राजा यांना तुरुंगात राहावे लागले. करुणानिधींची कन्या राज्यमंत्री कनमोळी यांना तुरुंगाची हवा खावी लागली. स्वतंत्र क्रीडा कार्यभारमंत्री सुरेश कलमाडी यांना जेलमध्ये राहावे लागले. ही अलीकडची उदाहरणे. अंतुले यांचा खटला २० वर्षे चालला. अशोक चव्हाण यांचा आदर्शचा खटला अजून चालू आहे. हिमाचलचे माजी मंत्री वीरभद्रसिंग यांचा खटला बरीच वर्षे सुरू आहे. केंद्रीय मंत्री सुखराम यांच्या घरी सापडलेल्या बेहिशेबी संपत्तीमुळे त्यांचाही खटला अनेक वर्षे सुरू आहे. पण ही सगळी उदाहरणे ते ते लोक सत्तेत होते त्या काळात त्यांच्या हातून जे काही घडले त्या आरोपाखाली त्यांना झालेल्या या शिक्षा आणि खटले आहेत. पण चिन्नम्मा सत्तेत नव्हती. सत्तेत नसताना झालेली ही पहिली शिक्षा असावी. आता तामिळनाडूत ज्या काही वावडय़ा उठल्या आहेत, त्यामध्ये जयललितांची सख्खी मैत्रीण म्हणून जयललितांबरोबर राजकारणात वावरणा-या चिन्नम्मा या सगळे दोन नंबरचे व्यवहार स्वत:च करायच्या. असे सांगतात की, मुख्यमंत्र्यांकडून विशिष्ट काम मंजूर करून घ्यायचे असेल तर ‘तोडपाणी’ करायला चिन्नम्मा मध्यस्त होती. त्यामुळे मुख्यमंत्री जयललिता असली तरी आणि जयललितांचा रूबाब असला तरी तेवढाच किंवा कांकणभर सरस रूबाब चिन्नम्माचा होता. असे सांगतात की, मुख्यमंत्री म्हणून जयललितांनी एकदा नेसलेली साडी पुन्हा कधीही नेसली नाही. खरे-खोटे बघायला कोण गेलेय. पण हाच प्रचार चिन्नम्माच्या बाबतीतही झाला आणि सांगणारे सांगतात की, जयललिता अम्मा असो, किंवा चिन्नम्मा असो यांच्या साडय़ा साध्यासुध्या कधीच नव्हत्या. कांजीवरमशिवाय त्यांची साडी नसायची. श्रीमंतीच्या प्रदर्शनाची दोघींनाही कमालीची हाव होती. दागिन्यांची हाव होती आणि या श्रीमंतीचे प्रदर्शन करताना, सार्वजनिक जीवनात वावरताना, या दोघींनी सातत्याने प्रचंड खर्च केला. त्याची रसभरीत वर्णने त्या त्या वेळी आलेली आहेत. अम्माने जमा केलेला पैसा अनेक उद्योगांत गुंतवला. त्या उद्योगांची समभाग वाटणी चिन्नम्मापाशी केली. त्यामुळे सत्तेत न राहताही गडगंज पैशांची मालकीण म्हणून चिन्नम्मालाही आरोपी करण्यात आले होते. पैशाची हाव घात करू शकते, त्याचा प्रत्यय दोघींना अटक झाली तेव्हा आलेला होता. आता तर चिन्नम्माला झालेली शिक्षा इतकी जबरदस्त आहे की, तिचे सगळे राजकारणच संपलेले आहे. सहा वर्षे निवडणूक बंदी म्हणजे २०१९ चा विषय संपला. तामिळनाडूची निवडणूक लढायला चिन्नम्माला २०२६ ची वाट बघायला लागेल. आठ मिनिटांतल्या निकालाने चिन्नम्माच्या राजकीय चिंधड्या झाल्या.