राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना आपल्या सोबत येण्याचे आमंत्रण दिले आहे.
मुंबई– राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्याबरोबर विविध पक्षांमध्ये आघाडी आणि हातमिळवणीस सुरुवात झाली. आघाडी आणि महायुतीकडून जास्तीजास्त जागांवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाता आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना आपल्या सोबत येण्याचे आमंत्रण दिले आहे.
विधानसभेच्या २८८ जागांसाठी १५ ऑक्टोबर होणा-या निवडणुकांसाठी पवारांनी आघाडीमध्ये येण्यासाठी आमंत्रण दिल्याचा दावा आठवले यांनी केला आहे. राज्यसभेचे खासदार असलेले आठवले सध्या भाजप-शिवसेना यांच्या महायुतीमध्ये आहेत.
पवारांनी आज(गुरुवारी) सकाळी फोन केला आणि महायुतीमधून बाहेरपडून राष्ट्रावादीसोबत येण्याचा प्रस्ताव दिल्याचे आठवले यांनी पीटीआयला सांगितले.
मात्र महायुती सोडण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा सूरु असला तरी आयपीआयला किमान १० जागा मिळतील असे त्यांनी पवारांना सांगितले. अनेक वर्ष राष्ट्रवादीसोबत असलेल्या आठवले यांनी २०११मध्ये पक्षाशी आघाडी तोडली होती.
दरम्यान, या घडामोडी संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी कोणतीही कल्पना नसल्याचे स्पष्ट केले.