सांगली जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या आटपाडी तालुक्यासाठीची अंदाजे ९२ कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांनी दिली.
![ADHALA DAM](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/08/ADHALA-DAM-300x225.jpg)
मुंबई – सांगली जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या आटपाडी तालुक्यासाठीची अंदाजे ९२ कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांनी दिली.
योजनेला तत्त्वत: मंजुरी देत असल्याबाबतचे पत्र त्यांनी गुरुवारी मंत्रालयात सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्याकडे सुपूर्द केले. योजनेचे काम त्वरित सुरू होण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी पाणीपुरवठा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिका-यांना दिले.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून आटपाडी तालुक्यातील ५३ गावांसाठी ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना निर्माण केली जाणार आहे. यासाठी अंदाजे ९१ कोटी ९७ लाख ३७ हजार ५०० रुपये इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. आता या योजनेचे काम तातडीने सुरू करून कायमस्वरूपी दुष्काळी आटपाडी तालुक्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाईल.
या योजनेसाठी कृष्णा नदीवरील धनगाव येथे पाण्याचा स्रेत निश्चित करण्यात आला आहे. हे ठिकाण आटपाडीपासून अंदाजे ८० किलोमीटर अंतरावर आहे. तेथून लिफ्ट इरिगेशन पद्धतीने भिवघाट येथे पाणी आणले जाईल.
भिवघाट येथे जलशुद्धीकरण प्लांट बसवण्यात येणार आहे. तेथे शुद्ध केलेले पाणी पुढे गुरुत्वाकर्षणाने उतारनलिकेद्वारे आटपाडी तालुक्यातील ५३ गावांना पुरवले जाईल. आटपाडी तालुक्यात १५ वर्षानंतर असणारी अंदाजे १ लाख ८६ हजार इतकी लोकसंख्या गृहीत धरून या योजनेची आखणी केली गेली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ही योजना निर्माण केली जाईल.
आटपाडी हा कायमस्वरूपी तीव्र दुष्काळी तालुका आहे. मागील दोन वर्षापासून तर या तालुक्याने भीषण दुष्काळ अनुभवला आहे. तालुक्यातील पाण्याचे सर्वच स्रेत आटल्याने तालुक्याला सोलापूर जिल्ह्यातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. या तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची संपवण्यासाठी या योजनेला मंजुरी दिली असल्याचे सोपल यांनी सांगितले.