पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पद्दूचेरी या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज सायंकाळपर्यंत अपेक्षित आहे.
कोलकाता- पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी सायंकाळपर्यंत अपेक्षित आहे.
या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचे सरकार पुन्हा एकदा ‘रायटर हाऊस’मध्ये स्थानापन्न होईल, असा दावा पक्षातर्फे व्यक्त करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे विविध वाहिन्यांनीसुद्धा मतदानानंतरच्या मतदान चाचणीत ममता बॅनर्जीचाच पक्ष दणदणीत बहुमत मिळवेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
चेन्नई- तामिळनाडू विधानसभेच्या निवडणूक निकालात मुख्यमंत्री अम्माच्या बाजूंनी गुरुवारी अनुकूल निकाल येण्याची शक्यता कमी असून, द्रमुकचे नेते करुणानिधी यांना बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अम्मांच्या लोकप्रियतेमध्ये मोठी घट झाल्यामुळे हा सत्ताबदल अपेक्षित आहे. तामिळनाडूमध्ये एक डाव अम्माचा तर एक डाव करुणानिधीचा अशा पद्धतीनेच गेली काही वर्षे निकाल लागत आहे. द्रमुकच्या कार्यालयात मोठा उत्साह गेले काही दिवस जाणवत असून, ‘अ’ द्रमुकची कार्यालये चिंताक्रांत चेहरे घेऊन बसली आहेत.
थिरुअनंतपुरम- छाप-काटय़ाच्या खेळाप्रमाणे केरळमधील सत्तांतराचा लंबक एकदा या बाजूला तर एकदा त्या बाजूला सरकत असतो. काँग्रेसच्या हातात असलेल्या राजवटीविरोधात गुरुवारच्या मतदानात मतदार डाव्या कम्युनिस्ट पक्षाला उचलून धरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यास कॉम्रेड अच्युतानंद यांच्या नावाला मात्र पॉलिट ब्यूरो अजून मान्यता देत नसल्यामुळे डावे विजयी झाले तरी नेतृत्व कोणाकडे? हा प्रश्न कायम आहे.
गुवाहाटी- लागोपाठ दोन वेळा विजयी झालेल्या काँग्रेसचे मुख्यमंत्री तरुण गोगई यांच्यापुढे भारतीय जनता पक्षाने मोठे आव्हान उभे केले असून, कदाचित निसटत्या बहुमताने भाजपाच्या बाजूने निकाल लागू शकतो. कदाचित भाजपा आणि काँग्रेस यांची रस्सीखेच गुरुवारच्या मतदानात दिसण्याची शक्यता आहे. वाहिन्यांचे अंदाज भाजपाच्या बाजूने असले तरी भाजपाला ही लढत इतकी सोपी नाही. सध्या आसाम विधानसभेत भाजपाचे फक्त पाच सदस्य आहेत.
पद्दूचेरी- एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखाली पद्दूचेरीमधील सरकारला मतदार पुन्हा एकदा आपला कौल देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ठिकाणी भाजपाचे कोणतेही आव्हान रंगास्वामींसमोर नाही. त्यामुळे एकतर्फी निवडणूक असल्याचे आजचे चित्र आहे.