राज्य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून लागू होण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई- राज्य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून लागू होण्याची दाट शक्यता आहे. ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची चर्चा होती. मात्र, या काळात असलेले उत्सव, परीक्षा आणि निवडणूक कर्मचा-यांच्या प्रशिक्षणामुळे आचारसंहितेची तारीख पुढे ढकलण्याची विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना केल्याचे माहीतगाराने सांगितले. याला निवडणूक आयुक्तांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते.
विधानसभा निवडणूक कधी घोषित होते याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता ऑगस्टच्या दुस-या किंवा तिस-या आठवड्यात लागू होण्याचे संकेत मिळत होते.
त्यानुसार महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसाठी एकाच वेळी आचारसंहिता लागू होणार होती. मात्र राज्यात सण, परीक्षा आणि पावसामुळे ती १ ते १० सप्टेंबर दरम्यान लागू करावी अशी विनंती करण्यात आली. त्यातच विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक कर्मचा-यांचे प्रशिक्षण सुरू आहे. ते २८ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. ही बाबही मुख्यमंत्र्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निदर्शनास आणली.
या सर्व बाबींचा आयोग गांभीर्याने विचार करत आहे. महाराष्ट्राबरोबरच हरियाणा आणि दिल्ली विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतली जाण्याची दाट शक्यता आहे.