महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची तारीख निवडणूक आयोग कधी जाहीर करते, याकडे महाराष्ट्रातील सर्वाचे लक्ष गेले काही दिवस लागून राहिले होते. पुढे येणारा दिवाळीचा सण आणि परीक्षा टाळून ही निवडणूक घेणे, ही निवडणूक आयोगाची कसोटीच होती. अखेर गणेशोत्सव संपताच निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील व हरयाणातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करून सारे पक्ष, उमेदवार आणि मतदारांना हिरवा कंदील दाखवला.
महाराष्ट्र व हरयाणात १५ ऑक्टोबरला मतदान होईल व मतमोजणी १९ ऑक्टोबरला होईल. या दोन राज्यांतील मतदानासह महाराष्ट्र, अरुणाचल, मणिपूर, नागालँड, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा देशभराचा कार्यक्रम मोठा असल्याने ती निवडणूक दीर्घकाळ व तब्बल नऊ टप्प्यात आटोपली. पण विधानसभेच्या निवडणुकांपैकी या दोनच राज्यात निवडणुका घ्यायच्या असल्याने त्या १५ ऑक्टोबर या एकाच दिवशी होणार आहेत. निवडणुकीच्या घोषणेबरोबरच लागलीच आचारसंहिताही लागू झाली. गणेशोत्सवामुळे या निवडणुकांची घोषणा जरी काहीशी लांबणीवर पडली होती तरी सर्वच राजकीय पक्षांची तयारी आणि आपली भूमिका मांडण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत प्रथमच ‘नोटा’चा म्हणजे उमेदवाराला मतदान न करता नाकारण्याचा अधिकार मतदाराला बजावता येणार आहे. निवडणूक आयोगाने आणखी एक सुधारणा केली आहे ती म्हणजे निवडणूक आयोगाने मतदारांच्या याद्या शेवटपर्यंत अपडेट करण्याचे ठरवले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये अनेकांचे नाव नसल्याने त्यांना मतदान करता आले नव्हते. पण आता शेवटपर्यंत मतदाराला आपले नाव यादीत दाखल करून घेण्याची व्यवस्था करण्यात आल्याने अशा तक्रारींना वाव राहणार नाही. राज्यात २८८ जागांसाठी ही निवडणूक होत असून अनुसूचित जातींसाठी २९ आणि अनुसूचित जमातींसाठी २५ राखीव मतदारसंघ आहेत. महाराष्ट्रात ८ कोटी २५ लाख ९० हजार उमेदवार मतदान करणार आहेत. गेल्या वेळेपेक्षा यावेळी मतदारांची संख्या ९१ लाख ८२ हजारांनी वाढली आहे. १८ ते २४ वष्रे या वयोगटातील तरुण मतदारांची ही वाढीव संख्या आहे. लोकसभेच्या निवडणुकीतही तरुण वर्गाने मोठय़ा प्रमाणात मतदानात भाग घेतला होता. तरुण, विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थी मतदानाविषयी फारसा उत्सुक नव्हता. पण गेल्या काही वर्षात त्यांच्यातील मतदानाविषयीची उदासीनता कमी होऊन ते मतदानात मोठय़ा संख्येने उतरत आहेत, ही सुदृढ लोकशाहीच्या दृष्टीने चांगली बाब आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणेच या वेळीही मुख्य लढत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप महायुती यांच्यामध्येच होणार आहे, असे सध्या तरी चित्र आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्याप जरी जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नसला तरी ही बोलणी सुरू असून आघाडीच्या जागा लवकरच जाहीर होतील. लोकसभेतील यशामुळे आता महाराष्ट्रात होणा-या विधानसभेच्या निवडणुकीत आपण सहज यश मिळवून सत्तेवर येऊ, असे मांडे खात गर्जना करणा-या शिवसेना-भाजप युतीची हवा गेल्या काही दिवसांत विरली आहे. मोदी लाटेवर आपण सहज निवडून येऊ, असे वाटणा-या या दोन्ही पक्षांना आता वास्तवाची जाणीव होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ज्या मोदी लाटेवर भाजपच्या नेतृवाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भरघोस यश मिळाले, ती मोदी लाट आता ओसरली आहे. मोदींनी महागाई आणि भ्रष्टाचार कमी करण्याची तोंडभरून आश्वासने दिली होती, त्या आश्वासनांबाबत मोदी सरकारने महिन्याभरातच लोकांच्या तोंडाला पाने पुसली. रेल्वे भाडेवाढ, साखरेच्या दरात वाढ करून या सरकारने महागाईला गती देण्याचे काम केले. ही महागाई कमी करण्याबाबत पंतप्रधान मोदी, त्यांचे सहकारी मंत्री किंवा अन्य भाजप नेते अवाक्षर काढण्यास तयार नाहीत. देशाबाहेरील काळा पैसा आणण्याबाबतही या सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे काहीही केले नाही. भ्रष्टाचाराबाबत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारविरुद्ध नेहमी आक्रमक असणा-या भाजपच्या राज्यातील अनेक मंत्र्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मोदी सरकारच्या १०० दिवसांच्या निष्क्रिय व निष्फळ कारकिर्दीचा नुकताच जाहीर पंचनामा झाला. एकीकडे मोदी सरकारबाबत लोकांचा भ्रमनिरास होत असताना महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप महायुतीतही बेबनाव वाढत आहे. पूर्वी शिवसेना भाजपच्या मोठय़ा भावाची भूमिका घेत होता व भाजपला नेहमी दुय्यम वागणूक देत होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला महायुतीत घेण्यासाठी भाजपचे नेते नितीन गडकरी प्रयत्न करत असताना त्या प्रयत्नामुळे संतप्त झालेले उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना काय वागणूक दिली, याचा ताजा इतिहास भाजप नेते विसरले नाहीत. पण मोदी लाटेनंतर सर्व परिस्थिती बदलली आहे व लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला राज्यातील ‘स्वबळा’चा साक्षात्कार झाला आहे. या साक्षात्कारामुळे भाजपने शिवसेनेकडे अध्र्या जागांची मागणी केली असून भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री पदावरही दावा केला आहे. भाजप-शिवसेना युतीलाही त्यांच्यातील मतभेद व वाद मिटवून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. महायुतीतील रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष आणि राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष हे रोज दंड थोपटून बंडाची भाषा करत आहेत. महायुतीची ही परिस्थिती असताना दुसरीकडे आघाडीतील काँग्रेस मात्र आत्मविश्वासाने निवडणुकीत उतरला आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर काँग्रेसच्या प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी सोपवून काँग्रेस पक्षाने सर्वाआधी प्रचारात आघाडी घेतली आहे. काँग्रेस कार्यकत्रे निवडणूक जिंकण्याच्या जिद्दीने काम करत आहेत. नारायण राणे यांनी झंझावाती प्रचारास सुरुवात केली असून महाराष्ट्रात काँग्रेसने कोणत्या योजना यशस्वीपणे राबवल्या, महाराष्ट्राने किती प्रगती केली आहे, हे राणे लोकांना सांगत आहेत. हे सांगतानाच मोदी खोटे दावे करून आणि खोटी आश्वासने देऊन लोकांची कशी दिशाभूल करत आहेत, हेही राणे दाखवून देत आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मोदी सरकारविरुद्ध आघाडी उघडली असून मोदींमुळे महाराष्ट्रासह देशात विजेची टंचाई असल्याचे स्पष्ट केले आहे. मोदी हे हुकूमशहा असून त्यांची एकाधिकारशाही देशाला धोकादायक आहे, हेही ते लोकांच्या निदर्शनाला आणून देत आहेत. त्याचबरोबर आघाडी सरकारमुळे महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे, याची ग्वाहीही ते देत आहेत. आघाडी सरकारची महाराष्ट्रातील कामगिरी पाहता आघाडीलाच यश मिळेल, यात दुमत नाही.
[EPSB]
कठोर कायद्याची आवश्यकता
कुठलेही व्यसन हे वाईटच असते. दारू, चरस, गांजा, अफू, विविध प्रकारचे मादक पदार्थ, तंबाखू, सिगारेट, विडी ही सर्व व्यसने आरोग्याला घातक असतातच; परंतु या व्यसनात आरोग्याबरोबरच पैशाची, वेळेची आणि व्यसनाधीन माणसाच्या कुटुंबाच्या स्वास्थ्याचीही हानी होतेच परंतु त्याच्या कुटुंबाचीही वाताहत होते.
[/EPSB]