चार राज्यातील विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता नव्या जोमाने कामाला सुरुवात करा, असे सांगत कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षातील नेत्यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आदेश बुधवारी दिले.
नवी दिल्ली – चार राज्यातील विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता नव्या जोमाने कामाला सुरुवात करा, असे सांगत कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षातील नेत्यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आदेश बुधवारी दिले. पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
पक्ष शिस्त आणि एकतेच्या अभावामुळे चार राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असून काँग्रेसची धोरणे, कार्यक्रम सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात अपयश आल्याच्या कारणचाही यात समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसला अनेकवेळा निवडणुकीत यशापयश मिळाले आहे. मात्र आपल्या क्षमतेनुसार लोकांना अधिक चांगल्या सुविधा देणे हे आपले महत्त्वाचे कर्तव्य आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. नावाचा उल्लेख न करता त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपच्या विचारधारेविरोधात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आवाज उठवावा, असे त्या म्हणाल्या.
पंतप्रधानांची मोदी, केजरीवाल यांच्यावर टीका
कोणत्याही व्यक्तीसाठी कणखर नेतृत्व असा उल्लेख नेमका कोणत्या गोष्टीसाठी करण्यात आला आहे, हे स्पष्ट करायला हवे, असे सांगत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव घेता जोरदार टीका केली. तसेच पूर्ण होणारी आश्वासनेच द्यावीत, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे अरविंद केजरीवाल व आम आदमी पक्षावरही टीका केली.