गेल्या २४ वर्षापासून नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्त भूमिहीन झाल्याने आता हक्काच्या मागणीसाठी अखेरचा लढा देण्यासाठी एकत्र आले आहे.
नवी मुंबई- गेल्या २४ वर्षापासून नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्त भूमिहीन झाल्याने आता हक्काच्या मागणीसाठी अखेरचा लढा देण्यासाठी एकत्र आले आहे. नवी मुंबईमधील २९ गावांतील तरुणांची मोट बांधून आगरी-कोळी युथ फाऊंडेशन या संघटनेच्या माध्यमातून १४ मार्च रोजी बेमुदत स्वरूपाचे उपोषण आणि धरणे देण्याचा निर्धार करत एल्गार पुकारला आहे.
एक महिन्यापूर्वी राज्य शासनाला मागण्यांचे निवेदन देऊन देखील अजून याची दखल घेतली नसल्याने आता अखेरचा लढा, असा नारा देत तरुणांची फौज या लढाईत उतरली आहे. राजकारणविरहित होत असलेल्या या आंदोलनापासून भाजपाने अंग काढले असले तरी इतर सर्व पक्षांनी सक्रिय पाठिंबा या आंदोलनाला दिला आहे.
आगरी-कोळी युथ फाऊंडेशन या संस्थेच्या चळवळीत नवी मुंबई शहरातील उच्चशिक्षित तरुण जोडल्याने राजकीय पक्षांना या आंदोलनाची दखल घ्यावी लागली आहे. या संघटनेचे अध्यक्ष निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने सुमारे चाळीसपेक्षा अधिक बैठक घेऊन आंदोलनाची रूपरेषा समजावून सांगितली जात आहे.
आता होळीचा हंगाम सुरू झाल्याने अखेरची बैठक माजी मंत्री गणेश नाईक यांच्या बोनकोडे गावामध्ये घेऊन आंदोलनाचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले. गावावर बैठकांना उदंड प्रतिसाद मिळाल्याचा दावा या संघटनेने पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.
विशेष म्हणजे महिलांचा अधिक प्रतिसाद लाभत असल्याने राजकीय जोडे बाहेर कडून तरुण या चळवळीत एकत्र येत असून कल्याण-डोंबिवली, मीरा- भाईंदर,कळवा, पनवेल व उरणमधील गावक-यांनीदेखील या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिल्याने नवी मुंबई बाहेरील भूमिपुत्रदेखील या लढय़ात सामील होणार आहेत.
रंगपंचमी संपल्यावर हजारो भूमिपुत्र किल्लेगावठाण येथे एकत्र जमून सिडको मुख्यालयाकडे कूच करणार आहेत. यामध्ये सामील झालेले आंदोलनकर्ते धरणे आंदोलन केल्यावर बेमुदत उपोषणाला आरंभ करणार असून भाजप युवा नेते वैभव नाईक यांनी या आंदोलनाला या अगोदरच पाठिंबा घोषित केल्यावर आता भाजपाने मात्र या आंदोलनाला पाठिंबा नसल्याची भूमिका घेतली आहे.
दरम्यान माजी मंत्री गणेश नाईक यांनी निर्धार मोर्चात सर्वाना या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले असल्याने राष्ट्रवादीचे तरुण देखील या आंदोलनात सक्रिय झाले आहेत. शिवसेनेचे विजय चौगुले यांनी देखील सक्रिय पाठिंबा घोषित केला असून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रकाश बाविस्कर यांनी पाठिंबा दिला असून माथाडी कामगार नेते आमदार नरेंद्र पाटील हे माथाडी कामगारांना घेऊन या आंदोलनात सक्रिय होणार आहेत.
काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष निशांत भगत हे सुरुवातीपासूनच या आंदोलनात सहभागी आहेत. भाजपाचा अपवाद वगळता सर्वच पक्षांनी आगरी-कोळी युथच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने हे आंदोलन चांगलेच आक्रमक होण्याची शक्यता आहे. आगरी कोळी युथच्या टीम गावावर आंदोलनाचा गजर करत आहेत.
याला महिला आणि तरुणांचा उत्तम प्रतिसाद लाभत असल्याने आता यापूर्वी आंदोलनात सक्रिय असलेल्या ज्येष्ठांनी या आंदोलनाकडे तटस्थ भूमिकेमधून बघून आगामी रणनीती आंदोलनाच्या यशावर आपली भूमिका जाहीर करण्याची अपेक्षा आहे. या आंदोलनाचे पडसाद आता शेजारच्या पनवेल-उरणमध्ये देखील उमटत असून या परिसरातील जमीन देखील सिडकोने संपादित केली आहे.