यंदा पावसाने पाठ फिरवल्याने भातपीक कमी होणार आहे. उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे. अनेक शेतक-यांना वर्षभर पुरेल इतका भात उपलब्ध होत असतो. यंदा हे प्रमाण राहणार नाही. त्यामुळे वर्षभराची चिंता या शेतक-याला लागून राहणार आहे. एकीकडे अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा उत्पादनात घट झाली. त्याचा फटका आंबा बागायतदारांना बसला. आता पावसाने पाठ फिरवल्याने भातपिकावर परिणाम झाला. त्यामुळे दोन्हीकडून शेतक-यांचे हाल सुरू झाले आहेत.
राज्यात यंदा सर्वत्र निराशाजनक पाऊस झाला. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी हे प्रमाण खूपच कमी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही तीच अवस्था असून, यावर्षी गतवर्षीपेक्षा निम्म्याहून कमी पाऊस झाल्याने यंदाची जिल्ह्यातील परिस्थिती खूपच भयावह होण्याची शक्यता आहे.
भातपीक धोक्यात आले असून, अनेक ठिकाणी जलाशयातील पाण्याची पातळी समाधानकारक नाही. परिणामी यंदा रत्नागिरी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवेळी पावसाने आंबा तर पाऊस नसल्याने भातपीक धोक्यात आले आहे.
साधारणत: ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी तीन हजाराहून अधिक मिमी पावसाची नोंद झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यात हे प्रमाण नोंदले गेले आहे. यावर्षी ही सरासरी पावसाने गाठली नाही. जवळपास १७०० मिमीपर्यंत पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिल्याने जिल्ह्यात सर्वत्र निराशाजनक चित्र बनले आहे. अनेक भागांमध्ये भातपिकावर परिणाम होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात सुरुवातीला दमदार पाऊस झाला. जुलै, ऑगस्ट महिन्यात हे प्रमाण कमी झाले. सुरुवातीच्या पावसावर शेतक-यांनी पेरणी, लावणीची कामे पूर्ण केली. त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे. गेल्या दोन महिन्यांत सरीवर पाऊस झाला असला तरी तो पिकाला पुरेसा ठरला नाही. त्यातच उन्हाचे प्रमाण वाढल्याने भातपिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला. कीटकनाशकांच्या फवारणीने हा प्रादुर्भाव कमी होत असला तरी यंदा भात उत्पादन कमी राहणार आहे.
भात हे जिल्ह्यातील मुख्य पीक आहे. जिल्ह्यात जवळपास ७० हजार हेक्टर क्षेत्रावर हे पीक घेतले जाते. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने भातपीक कमी होणार आहे. उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे. अनेक शेतक-यांना वर्षभर पुरेल इतका भात उपलब्ध होत असतो. यंदा हे प्रमाण राहणार नाही. त्यामुळे वर्षभराची चिंता या शेतक-याला लागून राहणार आहे. एकीकडे अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा उत्पादनात घट झाली. त्याचा फटका आंबा बागायतदारांना बसला. त्यानंतर आता पावसाने पाठ फिरवल्याने भातपिकावर परिणाम झाला. त्यामुळे दोन्हीकडून शेतक-यांचे हाल सुरू झाले आहेत.
शेतक-यांच्या अशा हालांकडे पाहण्यास सध्याच्या सत्ताधा-यांना वेळ नाही. राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चित्रही फारसे वेगळे नाही. जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या मासिक सभेतही रत्नागिरी जिल्हा दुष्काळी जिल्हा जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत युतीची सत्ता आहे. राज्यात भाजपाचे सरकार आहे. रत्नागिरीतील परिस्थितीबाबत अजूनही पालकमंत्र्यांकडून आढावा घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरीवर्गामध्येही नाराजीचे वातावरण आहे.
पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिल्याने जिल्ह्यातील जलाशयांतील पाण्याची पातळीही समाधानकारक नाही. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापासूनच पाण्याच्या नियोजनावर भर देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्ह्यातही जागृती होणे आवश्यक आहे.
शासकीय पातळीवरून यासंदर्भातील नियोजनाबाबत फारशी गांभीर्याने दखल घेतली गेलेली दिसत नाही. जिल्ह्यातील प्रश्नांकडे लक्ष देण्यास सध्याच्या सत्ताधा-यांना वेळ नाही. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी बैठक घेण्याची आवश्यकता होती. प्रत्यक्षात मात्र त्याबाबत अजूनही कोणतीही पाऊले उचलली गेलेली नाहीत.
आंबा नुकसानीसंदर्भातील कोणतीही ठोस भूमिका शासनाकडून घेतली गेलेली नाही. त्यामुळे आंबा बागायतदारांमधील नाराजी अधिकच वाढली आहे. अशावेळी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शेतक-यांना या सरकारकडून खरंच दिलासा मिळेल का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. पाऊस न झाल्याने जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत तात्काळ आढावा घेऊन त्यावर मार्ग काढणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यातील भातपिकाचे किती नुकसान होणार आहे, याचाही आढावा प्रशासकीय यंत्रणांनी घेण्याची आवश्यकता आहे. जलाशयातील पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन भविष्यातील पाणी नियोजनाबाबत पावले उचलण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणेने काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. सरकारकडूनही जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन शेतक-यांना सहाय्य करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.