स्वतंत्र तेलंगण राज्य निर्मितीच्या निर्णयाविरोधात आंध्रप्रदेशातील सात खासदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
नवी दिल्ली – आंध्रप्रदेशचे विभाजन करुन, स्वतंत्र तेलंगण राज्याची निर्मिती करण्याच्या निर्णयाविरोधात आंध्रप्रदेशातील सात खासदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच आणखीं काही खासदार राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले आहेत.
ए.साई प्रताप, अनंथा वेंकटरमाई रेड्डी, सी.व्ही.हर्षा कुमार, वुंदावल्ली अरुण कुमार, लगाडापती राजागोपाल आणि एस.पी.वाय रेड्डी यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. लोकसभेचे सचिव टी. के. विश्वनाथन यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा दिला.
राज्यसभेतील खासदार के. व्ही. पी रामचंद्र राव यांनी राज्यसभेचे सचिव समशेर के. शरीफ यांच्याकडे आपला राजीनामा पाठवून दिला. साब्बम हरी, मागुंता रेड्डी आणि रायापती राव या तीन खासदारांनी सुध्दा राजीनामा पाठवून दिल्याचे या खासदारांनी सांगितले.
आंध्रप्रदेशचे केंद्रीय मंत्री शनिवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते आपल्या पदाचा राजीनामा देतील असे राजीनामा देणा-या खासदारांनी सांगितले.