स्वतंत्र तेलंगणच्या मुद्यावरून आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची दाट शक्यता आहे.
हैदराबाद- स्वतंत्र तेलंगणच्या मुद्यावरून आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची दाट शक्यता आहे. दोन दिवसांपासून आंध्र प्रदेश सरकारविना आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
लोकसभेत स्वतंत्र तेलंगण विधेयक मंजूर झाल्यानंतर आंध्रचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. दिल्लीत अरुण केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळे आता आंध्रप्रदेशमध्येही राष्ट्रपती राजवट लागू होण्याची दाट शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल- मे महिन्यात होणा-या लोकसभेच्या निवडणुकीसोबत आंध्रप्रदेशचे विभाजन झालेल्या तेलंगण आणि सीमांध्र येथे विधानसभा निवडणुका घेणे शक्य होणार नाही. विभाजनामुळे आंध्रप्रदेशात सीमांध्र येथे १७५ आणि तेलंगणसाठी ११९ आमदारांचे स्वतंत्र दोन विधीमंडळ निर्माण होणार आहेत.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या स्वाक्षरीसाठी हे तेलंगण विधेयक राष्ट्रपती कार्यालयात पाठवले आहे. स्वाक्षरी झाल्यानंतर त्याची अधिसूचना काढून ते राजपत्रात प्रसिद्ध केले जाईल. त्यात तारखेसह २९ वे राज्य घोषित करण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेला काही कालावधी लागणार आहे. तोपर्यंत या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल.