लोकपाल विधेयकावरून गेली दोन वष्रे अण्णा हजारे यांनी आंदोलने आणि आंदोलनांच्या घोषणा करून वेळोवेळी आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचे काम केले आहे. दिल्लीत वर्षापूर्वी त्यांनी केलेल्या उपोषणामुळे त्यांना अखिल भारतीय पातळीवर प्रसिद्धीही मिळाली होती.
लोकपाल विधेयकावरून गेली दोन वर्षे अण्णा हजारे यांनी आंदोलने आणि आंदोलनांच्या घोषणा करून वेळोवेळी आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचे काम केले आहे. दिल्लीत वर्षापूर्वी त्यांनी केलेल्या उपोषणामुळे त्यांना अखिल भारतीय पातळीवर प्रसिद्धीही मिळाली होती. त्यांना पोलिसांनी उपोषणापूर्वी सकाळी केलेली अटक, अटकेनंतर संध्याकाळी झालेला त्यांच्या सुटकेचा आदेश, अण्णांनी सुटका करून घेण्यास दिलेला नकार व नंतर सुरू केलेले उपोषण यामुळे त्या वेळी सारे वातावरण ढवळून निघाले होते. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि छायाचित्रकार यांचा अण्णांभोवती गराडा पडला होता. टीम अण्णांमधील त्यांचे सहकारी, विशेषत: अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांनी आपल्यावरही प्रसिद्धीचे प्रकाशझोत पाडून घेण्यासाठी त्यावेळी खूप धडपड केली. अण्णांच्या उपोषणानंतर सरकारने जनलोकपाल विधेयक आणण्याचे ठरवले. पण, या विधेयकाच्या मसुद्यातील मुद्दे आणि अटींबाबत घोळ सुरूच राहिला व अण्णा सरकारला अधूनमधून इशारे देतच राहिले. दरम्यान, अण्णांवरील प्रसिद्धीच्या झगमगाटामुळे घुसमट वाढल्याने अरविंद केजरीवाल यांचे अण्णांशी बिनसू लागले. त्यातच केजरीवाल यांनी राजकारणात उतरून राजकीय पक्ष काढण्याचा निर्णय घेऊन आम आदमी पक्षाची स्थापना केली. मात्र, राजकीय पक्ष स्थापण्याला अण्णांचा सक्त विरोध होता. त्यामुळे दोघांमध्ये मतभेद वाढत गेले. अण्णांनी आपल्या जुन्याच आंदोलनाची वाट कायम ठेवली तर केजरीवाल यांनी राजकीय वाटचाल सुरू केली. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. त्याबद्दल अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांचे अभिनंदनही केले होते. अण्णांनी मात्र संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लोकपाल विधेयकासाठी शिंग फुंकले. त्यांनी या वेळी दिल्ली न गाठता राळेगणसिद्धीमधूनच या विधेयकासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाने पुन्हा अण्णांकडे सर्वाचे लक्ष गेले. अण्णा आणि केजरीवाल या दोघांमध्ये मतभेद असताना व दोघांचीही रस्सीखेच चालू असताना या दोघांचेही कार्यकर्ते एकमेकांना पाण्यात पाहत होते. गुरुवारी आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी अण्णांच्या आंदोलनात घुसण्याचा प्रयन केल्याने नव्या टीम अण्णांमध्ये नाराजी नाराजी पसरली आहे. ‘आप’च्या कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर अण्णांच्या कार्यकर्त्यांचा विश्वासच उरलेला नाही. अण्णांचे समर्थक डॉ. विश्वंभर चौधरी यांचे म्हणणे असे की, ‘आप’चे कार्यकत्रे अण्णांचे हे आंदोलन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. चौधरी यांच्याकडून असा आरोप होत असतानाच दुसरीकडे ‘आप’चे नेते कुमार विश्वास यांना राळेगणमध्ये धक्काबुक्की करण्यात आली, असा आरोप करण्यात येत आहे. या आरोपप्रत्यारोपांमुळे टीम अण्णा आणि केजरीवाल यांचे कार्यकत्रे याच्यामधील दरी आणखी वाढत आहे, हे स्पष्ट झाले आहे. टीम अण्णा आणि टीम केजरीवाल यांच्यामधील धुसफूस आणि धक्काबुक्की पाहता राळेगणमध्ये अण्णांच्या भेटीस येणारे केजरीवाल अकस्मात आजारी पडणे पटणारे नाही. त्यांचा हा आजार राजकीय वाटतो. केजरीवाल यांच्याऐवजी ‘आप’चे नेते कुमार विश्वास आपल्या काही सहका-यांसह राळेगणमध्ये आले. पण, त्यांचे स्वागत अण्णांच्या कार्यकर्त्यांनी ‘आप’ विरोधी घोषणांनी व धक्काबुक्कींनी केले. या वेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना धक्काबुक्की केली. उपोषण स्थळी येणा-या कुमार विश्वास यांनी कुठलेही राजकीय वक्तव्य करू नये, असे बजावले असताना त्यांनी राजकीय वक्तव्य केले आणि नव्या टीम अण्णातील अनेक जण दुखावले गेले. अण्णांचे समर्थक विश्वंभर चौधरी यांच्या म्हणण्याप्रमाणे आम आदमी पक्षाला सरकारकडून संसदेत मांडले जाणारे लोकपाल विधेयक आता मंजूर व्हायला नको आहे. सरकारकडून मांडल्या जाणा-या या विधेयकात अण्णांचे ७५ मुद्दे आहेत. चौधरी यांचे मत असे की, सरकारने मांडलेल्या विधेयकात अण्णांचे बहुसंख्य मुद्दे असल्याने त्यांनी हे स्वीकारावे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मेधा पाटकर आणि किरण बेदी यांनीही अण्णांना तसे सांगितले आहे. मात्र, आम आदमी पक्षाकडून हे विधेयक न स्वीकारण्याबाबत अण्णांना सल्ला दिला जात आहे. त्यांना हे विधेयक आता मंजूर व्हायला नको आहे. लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत त्यांना हा विषय भिजत ठेवायचा आहे. हा विषय निकालात निघाला तर त्यांच्याकडे प्रचाराला मुद्दाच राहणार नाही. चौधरी यांचे हे म्हणणे खरे असेल तर केजरीवाल हे दुहेरी डाव खेळत आहेत, असेच म्हणावे लागेल. केजरीवाल हे गेल्या वर्षी या विधेयकासाठी अण्णांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून उभे राहिले. अण्णांबरोबर त्यांनी प्रसिद्धीचे झोत अंगावर घेतले, भाषणे दिली. पण त्यांना नंतर राजकीय महत्त्वाकांक्षेने पछाडले. अण्णांचा विरोध असतानाही त्यांनी आम आदमी या राजकीय पक्षाचे स्थापना केली व निवडणुकाही लढवण्याचे ठरवले. म्हणजे त्यांनी प्रकाशझोतात येण्यासाठी अण्णांचा वापर करून घेतला. ज्या लोकपाल विधेयकाच्या मागणीच्या शिडीवरून ते चढले, भ्रष्टाचाराच्या मुद्दयासाठी त्यांनी लोकपाल विधेयकाचा आधार घेतला तो मुद्दा त्यांना आता पुढील निवडणुकीसाठी काही काळ शीतपेटीत ठेवायचा आहे. पण पुढे केजरीवाल यांना तो वापरायचा आहे. म्हणजे लोकपाल विधेयकाच्या मागणीवर पुन्हा दिल्लीची निवडणूक झाली तर ती निवडणूक व नंतर लोकसभेची निवडणूक लढायची आहे व ते करताना ‘टीम अण्णा’ला बाजूला सारायचे आहे. केजरीवाल यांच्या या डावपेचांमुळेच अण्णांच्या कार्यकर्त्यांत संताप खदखदत असून त्याचेच पर्यवसान शुकवारच्या धक्काबुक्कीत झाले. यामुळे या दोघांमधील दरी आणखी रुंदावत जाणार आहे. एकीकडे अण्णांच्या टीममध्ये फूट वाढत असताना राळेगणमध्ये अण्णांनी विधेयकासाठी सुरू केलेल्या उपोषणाची स्थितीही फारशी चांगली आहे, असे म्हणता येणार नाही. गेल्या वेळी दिल्लीत अण्णांच्या उपोषणाने जी हवा निर्माण केली होती, खळबळ उडवून दिली होती व देशभर वातावरण ढवळून निघाले होते तसे या वेळी राळेगणमध्ये घडलेले नाही. अण्णांना नेहमी साथ देणा-या महत्त्वाच्या व्यक्तींनी या वेळी बाजूलाच राहणे पसंत केले आहे. खरे म्हणजे या वेळी या उपोषणाची काही गरज नव्हती. सरकार लोकपाल विधेयकाबाबत गंभीर आहे व हे विधेयक या अधिवेशनात मंजूर होणार आहे, असे दिसून येत असता व विधेयकाच्या मसुद्यात अण्णांच्या मुद्दयांचा समावेश करण्यात आलेला असताना आता उपोषणाची गरज नव्हती. किरण बेदी यांचेही असेच मत होते. अण्णांच्या या आंदोलनामुळे आम आदमी पक्ष आणि टीम अण्णा यांच्यातील वाद चव्हाटयावर आले असून आंदोलनाऐवजी एकमेकांवर टीका करण्यातच प्रत्येकाला आनंद होत आहे. यामुळे आंदोलनात संभ्रमता, फूट तर दिसतच आहे पण हे आंदोलन मूळ उद्देशापासूनच भरकटले आहे, हेही स्पष्ट दिसते.
[EPSB]
भावबंध आणि निर्बंध
समलिंगी संबंधांना कायदेशीर ठरवणारा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून समलिंगी संबंध ठेवणे, हा गुन्हा ठरवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने फक्त समस्त समलिंगी वर्ग हादरला नसून व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा समंजस नागरिकही या निर्णयाने नाराज आणि संतप्त झाला आहे.
[/EPSB]