अहमदनगर शहरात महापालिकेच्या वतीने बस सेवा पुरवणा-या प्रसन्न पर्पल या ठेकेदार कंपनीने विविध अडचणी व सातत्याने होणारा तोटा यामुळे एक जुलै पासून शहरातील बस सेवा बंद करण्याची नोटिस महापालिका प्रशासनाला दिली आहे.
अहमदनगर- शहरात महापालिकेच्या वतीने बस सेवा पुरवणा-या प्रसन्न पर्पल या ठेकेदार कंपनीने विविध अडचणी व सातत्याने होणारा तोटा यामुळे एक जुलै पासून शहरातील बस सेवा बंद करण्याची नोटिस महापालिका प्रशासनाला दिली आहे. गेले काही दिवस महापालिका व ठेकेदार कंपनी यांच्यात सुरू असलेल्या वादंगामुळे नागरिकांच्या दृष्टीने अतिशय उपयक्त ठरलेली ही बस सेवा बंद होण्याची शक्यता आहे.
प्रसन्न पर्पल कंपनीचे अहमदनगर येथील व्यवस्थापक दीपक मगर यांनी मनपा प्रशासनाला पाठवलेली नोटिस प्रशासनाने महापौर व स्थायी समिती कडे पाठवली आहे. फेब्रुवारी २०११ मध्ये मोठा गाजावाजा करीत प्रसन्न पर्पल कंपनीने शहरातील नागरिकांसाठी बस सेवा सुरू केली. शहरात बस स्थानकासाठी जागा उपलब्ध करून देणे, तसेच एसटी बस स्थानक परिसरात रिक्षाचालकांकडून होणारी अडवणूक थांबवण्याची मागणी कंपनीने केली आहे. माळीवाडा बस स्थानक परिसरातून शहर बस सेवेच्या बस गाडया बाहेर काढताना रिक्षाचालकांकडून सातत्याने अडचणी निर्माण केल्या जातात. वारंवार या संदर्भात तक्रारी करूनही पोलिस, आरटीओ, जिल्हा प्रशासन व मनपाने या अडचणी दूर करण्यासाठी कारवाई केलेली नाही. या एकूणच सर्व प्रकारांमुळे कंपनीला सातत्याने मोठा तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच प्रसन्न पर्पलने बस सेवा बंद करण्याची नोटिस दिली होती.
मात्र महापौर व प्रशासनाने अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिल्याने मे व जून महिना कंपनीने तोटा सहन करीत बस सेवा सुरूच ठेवली. २१ जून रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कंपनीने मागितलेल्या आर्थिक सवलती स्थायी समितीने फेटाळून लावल्याने अखेर प्रसन्न पर्पल कंपनीने एक जुलै पासून शहरातकील बस सेवा बंद करणार असल्याची नोटिस महापालिकेला दिली आहे.