भारतरत्न सन्मानासाठी दरवर्षी केवळ एकाच खेळाडूची शिफारस करता येते, असा अजब नियम आपल्याकडे आहे. या देशात क्रीडा संस्कृती पुरेशी रुजलेली नाही. त्यामुळे खेळ आणि खेळाडूंचा पुरेसा आदर केला जात नाही. त्यातही क्रिकेटेतर खेळांना अधिकच सापत्न वागणूक मिळते. त्यामुळे भारतरत्न सन्मानासाठी खेळाडूंना दारे उघडल्याची घोषणा होताच, अनेक व्यक्ती आणि संघटनांकडून सुपरस्टार सचिन तेंडुलकरचे नाव पुढे केले जाऊ लागले. जणू सचिनच्या आधी या देशात क्रीडारत्ने जन्मालाच आली नाहीत! पण गेल्या वर्षी ८२ खासदारांनी ‘भारतरत्न’साठी विख्यात हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या नावासाठी खास स्वाक्षरीमोहीम घेतली. आता केंद्रीय क्रीडा खात्यानेही भारताच्या या अव्वल नागरी सन्मानासाठी ध्यानचंद यांचेच नाव पंतप्रधान कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवले आहे. पंतप्रधान कार्यालयाने शिक्कामोर्तब केल्यास मग राष्ट्रपतींच्या सहीचे सोपस्कार शिल्लक राहतील. भारत आणि हॉकीसारख्या राष्ट्रीय खेळाला जागतिक स्तरावर गाजवण्याचे श्रेय वादातीतपणे ध्यानचंद यांच्याकडे जाते. अॅमस्टरडॅम १९२८, लॉस एंजलिस १९३२ आणि बर्लिन १९३६ या ऑलिंपिक स्पर्धामध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले, यात ध्यानचंद यांचे योगदान मोठे होते. अॅमस्टरडॅम ऑलिंपिकमध्ये भारतीय संघाविरुद्ध एकही गोल होऊ शकला नाही, हा ऑलिंपिक विक्रम आजही शाबूत आहे. ‘हे हॉकी नाही, तर जादू आहे. ध्यानचंद हे हॉकीचे जादूगार आहेत’ असा उल्लेख तिथल्या स्थानिक वृत्तपत्राने केला. जादूगार हे बिरूद ध्यानचंद यांना त्यावेळेपासून लागले. १९३२मध्ये यजमान अमेरिकेवर २४-१ असा भयानक विजय मिळवून भारताने सुवर्णपदक जिंकले. त्यावेळी ‘पूर्वेकडून आलेले तूफान’ (टायफून फ्रॉम ईस्ट) असा ध्यानचंद यांचा उल्लेख झाला. बर्लिन ऑलिंपिकच्या वेळी तिथल्या रस्त्यांवर ‘हॉकीच्या जादूगाराला पाहायला ऑलिंपिक स्टेडियमकडे चला’ असे जाहिरात फलक लावले गेले होते. अंतिम सामन्यात यजमान जर्मनीला भारताने ८-१ असे पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत भारताने अवघा एक गोल खाल्ला. ध्यानचंद यांच्या हॉकी स्टिकच्या करामतीमुळे नाझी नेता अॅडॉल्फ हिटलर आणि त्याचे सहकारी प्रभावित झाले होते. ध्यानचंद यांच्या खेळाचे गारूड इतके होते, की त्यांच्या हॉकी कौशल्याला ‘ब्लॅक मॅजिक’ असेही संबोधले गेले. तीन ऑलिंपिक स्पर्धामध्ये मिळून ध्यानचंद यांनी १२ सामन्यांमध्ये ३३ गोल केले, जोदेखील आजवरचा अबाधित विक्रम ठरतो. स्टिकवरील कौशल्य आणि चपळ पाय यांच्या जोरावर ध्यानचंद यांनी कीर्तीची अनेक शिखरे सर केली. १९२६ ते १९४८ या २२ वर्षाच्या कालखंडात जवळपास ४००हून अधिक सामन्यांमध्ये खेळून त्यांनी हजारहून अधिक गोल केले. अमेरिका ते न्यूझीलंड आणि आफ्रिका ते युरोप अशी त्यांची जगभर कीर्ती पसरली होती. त्यांचा खेळ पाहायला देशोदेशीचे हॉकीप्रेमी गर्दी करत असत. अशा या प्रतिभावंताला त्याच्या सरत्या काळात पुरेसा आधार मिळू शकला नाही, हा आपला करंटेपणाच. त्यांच्या मृत्यूनंतर ही कसर काही प्रमाणात भरून काढली जातेय ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. २९ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिन देशभर राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा केला जात होताच. त्यांना भारतरत्न मिळाल्यास या अतुलनीय व्यक्तिमत्त्वाला तो चिरकालीन मानाचा मुजरा ठरेल.