सत्ता मिळवणे सोपे आहे. सत्ता पचवणे आणि डोक्यात शिरू न देणे, हे अधिक अवघड आहे. जगात ज्या ज्या राजसत्तांचा नाश झाला तो नाश त्या त्या राज्यांनी सत्ता आपल्या डोक्यात चढू दिली म्हणून झाला.
सत्ता मिळवणे सोपे आहे. सत्ता पचवणे आणि डोक्यात शिरू न देणे, हे अधिक अवघड आहे. जगात ज्या ज्या राजसत्तांचा नाश झाला तो नाश त्या त्या राज्यांनी सत्ता आपल्या डोक्यात चढू दिली म्हणून झाला. काही राज्यकर्ते त्यांच्याभोवती असलेल्या चमच्यांमुळे नाश ओढवून घेतात. भर्तृहरी या महाकवींनी राज्याच्या नाशाला राजा भोवती असणारे दृष्ट लोक कारणीभूत असतात, असे विश्लेषण केलेले आहे. भर्तृहरीला जी सात शल्ये सलत होती त्यात..
दृष्टांचा पगडा महिपती(राजा)गृही
हे एक शल्य होते. आज हा विषय मांडायचे कारण, दिल्लीची सत्ता नशिबाने मिळालेले अरविंद केजरीवाल यांची स्थिती ही अशीच माज आलेल्या सत्ताधीशाची झालेली आहे. ते एकदम हवेत गेले. त्यांचा ‘आप’ हा पक्ष राजकीय तत्त्वज्ञान नसलेला पक्ष आहे. या देशातील ज्या मतदारांनी हवेला भुलून मतदान केले त्यात केजरीवालांचा ‘आप’ हा एक पक्ष आहे.
केजरीवाल किंवा त्यांच्या पक्षात कालपर्यंत असलेल्या किरण बेदी हे कोणीच स्वच्छतेचे पुतळे नव्हते. पण अण्णांच्या भोवती राहून त्यांनी हवा बनवली. पुन्हा या देशातील लोकांची मानसिकता अशी की, अशा क्षणभंगूर नेतृत्वाला लोकांनी जेव्हा मानले, दगडाला शेंदूर फासले, त्याचा झाला मारुती. राजकारण करण्याची कुवत, आवाका काही नसताना केजरीवाल नामक एक थयथयाट करणारा माणूस दिल्लीचा मुख्यमंत्री होऊन गेला.
भरमसाठ आश्वासने दिली. भाजपा असो किंवा ‘आप’ असो, या मंडळींचा राजकीय वकूब कमी आहे. आवाकाही कमी आहे. आपल्याला कोणते ओझे उचलणे झेपेल, याचा अंदाज न करता मोठा बोजा उचलायला जातात. तो बोजा खाली कोसळतो आणि उचलणाराही खाली कोसळतो. केजरीवालांची स्थिती अशीच झाली आहे. त्यांच्या सरकारातील कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. इतके गोंधळलेले सरकार देशात कुठेही नाही. मोदी आणि केजरीवालमध्ये काही फरक नाही.
दोघेही हुकूमशाह आहेत. ७० वर्षापूर्वी मृत्यू पावलेला हिटलर अर्धा-अर्धा या दोघांमध्ये वस्तीला आलेला आहे. त्यामुळे यांचे वर्तन हे हुकूमशाहाचे आहे. केजरीवालही त्याला अपवाद नाही. राज्यकर्त्यांला संयमी असावे लागते. टीका पचवण्याची तयारी ठेवावी लागते. संत तुकारामांनी ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे सांगितले. मोदी आणि केजरीवाल यांना तुकाराम कोण, हे माहीत नाही. त्यामुळे दोघांच्या अंगात सत्ता भिनली. केजरीवाल तर सत्तेने एवढे माजले की, त्यांनी एक परिपत्रक काढून पत्रकारांवर बंधने आणली.
‘दिल्लीच्या केजरीवाल सरकारविरोधात बातम्या छापाल तर खबरदार..’ अशा धमक्या दिल्या. गृहखात्याला सूचना केली ‘जर सरकार विरोधातील बातम्या आल्या तर पत्रकारांवर खटले भरा.’ आता केजरीवाल सरकार किती खटले भरते बघू या.. जेवढे खटले भरायचे आहेत तेवढे भरा.. आणिबाणीत जे पत्रकार डगमगडले नाहीत ते या फडतूस केजरीवालला घाबरतील, अशा भ्रमात केजरीवाल दिसतात. असे ५६ केजरीवाल आले तरी त्यांच्या धमक्यांना कोण घाबरतोय..पण त्यांच्या सरकारची घसरण सुरू झाली एवढे
मात्र नक्की..