कोकण रेल्वे प्रशासनाने लोकांचे हित लक्षात घेऊन स्थानकाला मंजुरी द्यावी अन्यथा येत्या 10 सप्टेंबरला तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खासदार डॉ. निलेश राणे यांनी दिला आहे.
चिपळूण – कोकण रेल्वे महामंडळाने असुर्डे रेल्वेस्थानक बांधण्यास मंजुरी दिली नाही, या स्थानकाच्या बांधकामासाठी आपण खासदार निधीतून 78 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने लोकांचे हित लक्षात घेऊन स्थानकाला मंजुरी द्यावी अन्यथा येत्या 10 सप्टेंबरला तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार डॉ. निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कोकण रेल्वेमार्गावर असुर्डे परिसरातील 40 गावांतील ग्रामस्थांना रेल्वेची सेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने जिल्हा नियोजन समिती सदस्य संदीप सावंत सातत्याने प्रयत्न करत आहेत. असुर्डे येथे रेल्वे स्थानकासाठी आपण खासदार निधीतून 78 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सुरुवातीला कोकण रेल्वे प्रशासनाने असुर्डे रेल्वे स्थानकाला मंजुरी दिली होती. त्यानंतर या स्थानकाच्या इमारतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले आणि यासंदर्भातील निधी रेल्वे प्रशासनाने जमा करावा, असेही सांगण्यात आले. या स्थानकामुळे चिपळूण व संगमेश्वर तालुक्यांतील 40 हून अधिक गावांतील 50 हजार ग्रामस्थांचा प्रश्न सुटणार आहे. पण कोरे प्रशासनाने आरवली ते असुर्डे या दोन स्थानकांमध्ये अवघे 10 किमी अंतर असल्याने आता स्थानकाची परवानगी नाकारली आहे. मात्र, जनतेच्या हितासाठी हे स्थानक झाले पाहिजे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा निलेश राणे यांनी दिला.
रेल्वे स्थानकाबाबत अॅड. गोडबोले यांचा सल्ला घेण्यात आला आहे. रेल्वेमार्गावर अजूनही 22 स्थानकांची मागणी आहे. मग असुर्डे येथील स्थानकाला परवानगी का नाकारली आहे, जनतेचे हित लक्षात घेऊन आपल्या नेतृत्वाखाली 10 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता रेल रोको आंदोलन करण्यात येईल. आपण लोकांसाठी उभे राहणार असून, त्यांच्या न्याय्य हक्कासाठीच लढणार आहोत, असे राणे यांनी सांगितले.
कालुस्ते-गोवळकोट पुलाचे काम रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांमुळे रखडले आहे, असा आरोप करत आपला कुणाशी वाद नाही. मात्र, जनतेच्या विकासकामाच्या आड कोणी येत असेल तर आपण जनतेच्या बाजूने उभे राहू. आपले पद लोकांसाठीच आहे. त्यामुळे आपण नेहमीच जनतेबरोबरच राहणार, असे ते म्हणाले. या वेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संदीप सावंत, रामदास राणे, राजेश वाजे आदी उपस्थित होते.
खासगी वाहतूकदारांना न्याय देणार
गेले अनेक दिवस जिल्ह्यातील खासगी प्रवासी वाहतूक बंद आहे. याबाबत पोलिस अधीक्षक व वाहतूकदार यांच्यामध्ये नेमके कोणते प्रश्न आहेत, याची आपण माहिती घेणार आहोत. खासगी वाहतूकदारांना व्यवसाय करणे गरजेचे असल्यामुळे त्यांना आपल्या माध्यमातून योग्य तो न्याय देणार असल्याचे खा. डॉ. निलेश राणे यांनी सांगितले.