खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या सारसनमध्ये मागील काही दिवसांपासून अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे.
खोपोली – खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या सारसनमध्ये मागील काही दिवसांपासून अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. ठाणेन्हावे येथील धरणातून येणारे पाणी शुद्ध नसल्याने ग्रामस्थांना अनेक आजारांचा सामना करावा लागत असून ग्रामपंचायतीच्या उदासीन कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सुमारे दोन कोटी रुपये खर्च केलेल्या पाणी योजनेला पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा बसविली नसल्याने ग्रामस्थांना नाईलाजाने अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. काही ग्रामस्थ पिण्याचे पाणी विकत घेत असून ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत स्थानिकांमध्ये संताप आहे. धुळीवंदनाच्या दिवशी या संतापाचा उद्रेक झाला आणि संतापलेल्या सारसन ग्रामस्थांनी प्रभारी सरपंच नितीन देशमुख यांना चांगलेच धारेवर धरले. ग्रामस्थ आक्रमक झाल्याने प्रभारी सरपंचांची पाचावर धारण बसली होती.
साजगाव ग्रामपंचायतीत भारत निर्माण योजनेतून सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून पाणी योजना तयार करण्यात आली असून या योजनेसाठी तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे व आ. सुरेश लाड यांनी निधी मिळवून दिला होता. पाणी योजनेचे काम सुरू असताना त्यात राजकारण झाल्याने या योजनेचे काम काही दिवस ठप्प होते. मात्र पाणीपुरवठा कमिटीने पाठपुरावा केल्याने ६ वर्षानंतर या योजनेचे काम अखेर पूर्ण झाले. पाणी योजना पुर्णत्वास आल्यानंतर ढेकू, साजगाव व सारसन या गावांना या योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या योजनेचे काम सुरू असताना काहींनी राजकारण केल्याने पाणी शुद्ध करण्याची कोणतीच यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे ठाणेन्हावे येथील तलावातून येणारे अशुद्ध पाणी तीनही गावातील ग्रामस्थांना प्यावे लागत होते. साजगाव येथे पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा बसविण्यात आल्याने ढेकू व सारसनमध्येच अशुद्ध पाणी येत आहे.
साजगाव ग्रामपंचायतीचे आíथक बजेट मोठे असून ग्रामपंचायतीने सारसनमध्येही पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. ग्रामपंचायतीच्या प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक दिवसांपासून सारसनमध्ये येणारे अशुद्ध पाणीच ग्रामस्थांना प्यावे लागत आहे. अशुद्ध पाण्यामुळे विविध आजारांचा सामना करावा लागत असल्याने काही ग्रामस्थ पिण्याचे पाणी विकत घेत असल्याचे चित्र सारसनमध्ये पहायला मिळत आहे. साजगाव ग्रामपंचायतीचे सदस्य सध्या राजकीय डावपेचांमध्ये व्यस्त आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्यामध्ये अधिक वेळ घालवत असलेल्या सदस्यांना ग्रामस्थांच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे संतापलेल्या सारसन ग्रामस्थांनी प्रभारी सरपंच नितीन देशमुख यांना धुळीवंदनाच्या दिवशी चांगलेच धारेवर धरले होते.
उपसरपंचाने पाणी पळवले
सारसन गावाला पूर्वी साजगाव येथील बोअरवेलमधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. नितीन देशमुख यांनी उपसरपंचपदाची सुत्रे स्विकारल्यानंतर सारसन गावाला होणारा पाणी पुरवठा बंद करून साजगावला सुरू केला. त्यामुळे उपसरपंचाने सारसनचे पाणी साजगावला पळवले अशी चर्चा सारसनमध्ये सुरू असून पाणी योजनेची शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत साजगाव येथील बोअरवेलवरून सारसनला पुन्हा पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
ग्रामपंचायतीच्या निधीतून सारसन येथे पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा बसविण्यात येणार आहे. तसा ठरावही घेण्यात आला असून सारसन ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यामुळे कायमचा निकालात निघणार आहे. सारसन ग्रामस्थांना केला जाणारा पाणी पुरवठा अशुद्ध असल्याने अन्य काही पर्याय वापरून किमान शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करता येईल का? या दृष्टीनेही चाचपणी सुरू आहे. आणखी काही महिने हा प्रश्न कायम राहणार असून पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा बसविल्यानंतर सारसनमध्ये असलेला हा प्रश्न सुटेल. – अनंतकुमार बापू सुळ, ग्रामविकास अधिकारी, साजगाव.