समाजात अवयवदानाबाबत अजूनही अनेक गैरसमज आहेत.याची दखल घेऊन प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण केंद्र, मुंबई (झेडटीसीसी) माध्यमातून एक मदत गट अवयवदानाबाबत जनजागृती करणार आहेत.
मुंबई- समाजात अवयवदानाबाबत अजूनही अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे अवयवदानाची प्रक्रिया थंडावत चालल्याचे चित्र आहे. याची दखल घेऊन प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण केंद्र, मुंबई (झेडटीसीसी) माध्यमातून एक मदत गट (सपोर्ट ग्रुप) तयार करण्यात आला आहे. या गटाच्या माध्यमातून ज्या मृत रुग्णांचे अवयवदान करण्यात आले आहेत, त्यांचे नातेवाईक अवयवदानाबाबत जनजागृती करणार आहेत.
अवयवदानाबाबत अद्याप आवश्यक तेवढी जनजागृती होत नाही. मागील वर्षभरात शहरातील ज्या मृत रुग्णांचे अवयवदान झाले. त्यांच्या नातेवाइकांचा सत्कार करण्यासाठी झेडटीसीसीच्या वतीने गुरुवारी केईएम रुग्णालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात उपस्थित नातेवाइकांनी त्यांचे अनुभव डॉक्टरांना सांगितले.
रुग्णाच्या मेंदूने काम करणे थांबवल्यानंतर त्याचे अवयवदान करण्यास काहीच हरकत नसते. मात्र अनेकदा संबंधित रुग्णांचे शरीर पूर्णपणे मृत होईपर्यंत पोलिस अवयवदान करू देत नाहीत. अवयवदानाबाबत पुरेशी जागरूकता नसल्यानेच असे प्रकार घडत असल्याचे मत या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नातेवाइकांनी व्यक्त केले. याची गंभीर दखल घेऊन एक रुग्णांच्या नातेवाइकांचा ‘जीवन प्रवाह’ हा मदतगट तयार केला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी मृत रुग्णांच्या नातेवाइकांची झेडटीसीसीच्या डॉक्टरांसोबत एक बैठक झाली. या बैठकीत या नातेवाइकांनीच ‘अवयवदाना’बाबत एक विशेष गट तयार करण्याचा मानस दाखवला. या सपोर्ट ग्रुपला ‘जीवन प्रवाह’ असे नाव दिले जाणार आहे. या सपोर्ट ग्रुपच्या गटाच्या माध्यमातून हे नातेवाईक अवयवदानाबाबत जनजागृती करणार असल्याचे झेडटीसीसीच्या डॉ. सुजाता पटवर्धन यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत मागील वर्षी ४३ मूत्रपिंड, १८ यकृत, २ फुफ्फुस तर गेल्या तीन महिन्यांत आतापर्यंत १६ मूत्रपिंड, ९ यकृत दान करण्यात आल्याचे झेडटीसीसीच्या सुजाता अष्टेकर यांनी सांगितले.
अवयवदानाबाबत समुपदेशन
कला आणि रुग्ण सेवेकरिता समर्पित ‘राजहंस प्रतिष्ठान’च्या वतीने रविवार, ३१ मार्च रोजी देहदान, अवयवदान, रक्तदानाचे महत्त्व आणि जेनेरिक औषधे या विषयावर समुपदेशनाच्या कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विनायक जोशी, सुजाता अष्टेकर, डॉ. सुहास पिंगळे आणि आमदार सुभाष देसाई आदी मंडळी सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम गोरेगाव पूर्व, जयप्रकाशनगर येथील जिमखान्याच्या प्रांगणात संध्याकाळी ६ वाजता होणार असून, या वेळी लोकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुहास कबरे यांनी केले आहे.