गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी वादळी पावसाने राज्यात कहर केला असून एकाचा बळी गेला आहे.
वर्धा- गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी वादळी पावसाने विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती आणि बुलडाणा या जिल्ह्यांत कहर केला असून एकाचा बळी गेला आहे. शेकडो एकरातील पिके जमीनदोस्त झाली आहेत. तर शेकडो चिमण्यांचाही बळी घेतला आहे. त्यासोबतच घरांचीही मोठी पडझड झाली आहे.
वादळाचा कहर
वादळापासून बचावाकरिता झाडाचा आसरा घेतला असता वा-याने झाडाची तुटलेली फांदी अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना बेढोणा येथे घडली. धनराज नासरे (रा. वाढोणा) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. धनराज व प्रवीण नासरे हे बेढोणा येथे गिट्टी खरेदी करण्याकरिता गेले होते. दरम्यान वादळ आल्याने पावसापासून बचावाकरिता हे दोघेही एका झाडाखाली उभे राहिले. सोसाटय़ाच्या वा-यामुळे झाडाची फांदी तुटून या दोघांच्या अंगावर पडली. यात धनराज व प्रवीण दोघेही जखमी झाले. धनराज याच्या डोक्याला जबर इजा झाल्याने त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले. तिथे शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. तर प्रवीणवर उपचार सुरू आहेत.
पुलगाव शहरात शनिवारी मध्यरात्रीनंतर पावसाचा जोरदार तडाखा बसला. हवा आणि पावसामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळामुळे जिल्ह्यातील १३१ गावातील वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागली. ही गावे आर्वी व वर्धा विभागातील आहेत. सकाळपासूनच आकाशात ढग जमू लागल्याने पावसाची चाहूल लागली होती. या पावसामुळे वीटभट्टी, गहू, हरभरा या रबी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या तुरीचेसुद्धा नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील, आर्वी, आष्टी व वर्धा तालुक्यातही या अवकाळी पावसाने कहर केला. या भागात आलेल्या पावसामुळे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले. वर्ध्यात पहाटेपासूनच विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. दिवसा ऊन व रात्री थंडी असे वातावरण होते. शुक्रवारी दिवसभर आकाश निरभ्र होते. मात्र सायंकाळी जिल्ह्यातील काही भागांत वादळी पावसासह गारपीट झाली. घरावरील पत्रे उडून झाडावर अडकले. वादळाचा फटका बसलेल्या गावात तालुक्यातील बोरी, ठाणेगाव, जुनापाणी, सेलगाव, कांरजा, येनगाव, पिपरी, भालेवाडी, पारडी, सारवाडी या गावांचा समावेश आहे.
चिमण्या मृत्युमुखी
पावसामुळे गहू चणा व संत्रा पिकाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. घरात शिरलेल्या पाण्यामुळे शेतक-यांनी घरात ठेवलेला शेतमाल ओला झाला. शेतातील नुकसानीसह घरात असलेले उत्पन्न ओले झाल्याने शेतक-यांना दुहेरी नुकसानीचा सामना करावा लागला. तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत ब्राह्मणवाडा येथे मोठे नुकसान झाले. गावात सायंकाळी ७ ते ८ च्या सुमारास पावसाने हजेरी लावली. वा-यामुळे येथील शाळेवरील छत उडाले व भिंतीही पडल्या. अनेक सखल भागात गुडघ्यापर्यंत पाणी घरात साचले.
गारपीट व वादळी पावसाचे रूप इतके भयानक होते की गावातील मोठे वृक्ष उन्मळून पडले. रस्त्यावर झाडे कोसळल्यामुळे गावाचा संपर्क तुटला होता. पावसामुळे शेतात उभ्या केलेल्या हरितगृहाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. गारपिटीमुळे दोन वासरे दगावली, पक्षी मृत्युमुखी पडले. या गारांच्या मा-याने अनेक चिमण्या मृत्युमुखी पडल्या. पाऊस गेल्यावर गावक-यांनी त्याची पाहणी केली असता झाडाच्या खाली चिमण्यांचा सडा पडल्याचे चित्र होते.
अमरावती, बुलडाणा जिल्हय़ातही पाऊस
अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातही शुक्रवारी सायंकाळी पाऊस झाला. दोन दिवसांपासून जिल्ह्यांत ढगाळ वातावरण आहे. कधी थंडी तर कधी तप्त ऊन असा खेळ सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यात साखरखेर्डा, डोणगाव, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, देऊळगाव मही तालुक्यात रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला, तर अमरावती शहरातही सायंकाळी तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला.
नागपूर शहरात झालेल्या पावसामुळे शहरातील वीज आणि दूरध्वनी सेवा कोलमडली. तर नागपूर-काटोल मार्गावर मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्यामुळे त्यावरील वाहतूर विस्कळीत झाली होती. वादळी वा-यामुळे शहरातील जाहिरातींचे फलकही उडून गेले.
गुहागरमध्ये अवकाळी पावसाने धावपळ
थंडीचे दिवस संपून उन्हाळा सुरू होण्याचे दिवस असतानाच शुक्रवारी सकाळी गुहागरमध्ये अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली.
नुकत्याच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी वर्ग आपल्या परीक्षेसाठी जात असताना अनपेक्षितपणे या पावसाला सामोरे जावे लागल्याने त्यांचीदेखील एकच धावपळ उडाली.
गुहागर आगार परिसरातदेखील पावसाळ्याप्रमाणे पाणी साचले होते. तालुक्यातील काही ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली तर गुहागरमध्ये पावसाने दमदार हजेरी लावत जवळपास अर्धा तास पाऊस या ठिकाणी कोसळत होता.
सध्या काजू, आंबा यांना मोहोर तसेच काही ठिकाणी आंबा, काजू यांच्या बागा फुलल्या आहेत. परंतु, अवकाळी पडलेल्या या पावसाने या पिकांवर देखील धोका निर्माण झाला आहे. तसेच बागायतदारांवर संकट निर्माण झाले आहे.
पावसाच्या हजेरीमुळे आंबा, काजू आदी पिकांना नुकसान पोहोचण्याची भीती तालुक्यातील बागायतदारांमध्ये निर्माण झाली आहे. एकूणच गुहागर तालुक्यात अनपेक्षितपणे पडलेल्या या अवकाळी पावसाने नागरिकांसह शेतकरी वर्ग तसेच विद्यार्थी वर्गाचीही मोठय़ा प्रमाणात धावपळ उडाली आहे.