अल कायदा या दहशतवादी संघटनेने आता आपला मोर्चा भारताकडे वळवला आहे. अलकायदाचा मोहोरक्या आयमन अल जवाहिरीने भारतात अल कायदाची शाखा सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे.
दुबई – अल कायदा या दहशतवादी संघटनेने आता आपला मोर्चा भारताकडे वळवला आहे. अल-कायदाचा मोहोरक्या आयमन अल जवाहिरीने भारतात अलकायदाची शाखा सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे.
भारतीय उपखंडात जिहादचा झेंडा फडकवून इस्लामिक शासन पसरवणार असल्याचे जवाहिरीने म्हटले आहे. जवाहिरीचा एक ५५ मिनिटांचा व्हिडीओ प्रसारीत झाला असून, त्यात त्याने ही घोषणा केली आहे.
बर्मा, बांगलादेश, आसाम, गुजरात, अहमदाबाद आणि काश्मीरमधल्या मुस्लिमांसाठी भारतीय उपखंडात अलकायदाची शाखा स्थापन करत आहोत. अलकायदाची ही शाखा भारतीय उपखंडातील मुस्लिमांची अन्याय आणि जुलूमातून सुटका करेल असे जवाहिरीने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
भारत सरकारने गुप्तचर यंत्रणांना या व्हिडीओची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दहशतवादविरोधी तज्ञांच्या मते आयसिस आणि अलकायदामध्ये विस्तारावरुन स्पर्धा सुरु आहे.
इराक, सीरियामध्ये वर्चस्व निर्माण करणा-या आयसिसचा मोहोरक्या अबू बकर अल बगदादीने स्वत:ला खलिफा म्हणजे मुस्लिमांचा प्रमुख म्हणून जाहीर केले आहे. सर्व मुस्लिमांनी आपल्याशी एकनिष्ठ रहावे असे त्याने आवाहन केले आहे. या स्पर्धेतून हा व्हिडीओ प्रसारीत झाला असावा असा तज्ञांचा एक अंदाज आहे. अलकायदाने भारतामध्ये विस्ताराचे प्रयत्न सुरु केले तर, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारसाठी एक आव्हान असेल.