राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप बुधवारी वाजले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी ही घोषणा केली.
मुंबई- राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप बुधवारी वाजले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी ही घोषणा केली. यापुढील पावसाळी अधिवेशन १८ जुलै पासून मुंबई विधान भवन येथे होईल.
गेल्या ९ मार्च २०१६ पासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली होती. २३ दिवस अधिवेशनाचे काम चालले. या अधिवेशनात एकूण १३ हजार ७३० तारांकित प्रश्न देण्यात आले होते. त्यापैकी ५८ प्रश्नांना तोंडी उत्तरे देण्यात आली. ६२ लक्षवेधी सूचना देण्यात आल्या होत्या.
तसेच महत्त्वाची २० विधेयक या अधिवेशनात मांडण्यात आल्याचे हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. स्वतंत्र विदर्भ, मराठवाडय़ावर वादग्रस्त वक्तव्य करणारे माजी महाधिवक्ते श्रीहरी अणे यांचा राजीनामा, भाजपा कार्यकर्ता गणेश पांडे यांचे विनंयभग प्रकरण, लातूरला रेल्वेने पाणी, आरोग्य खात्याचा २९७ कोटी रुपयांचा औषध घोटाळा अशा काही घटनांवर काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधी पक्षाने सुरुवातीपासूनच घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजले.